Wednesday, August 11, 2021

एप्रिल २००४ ची काश्मीर मधील एक थरारक अनुभव

२३ फेब्रुवारी २००३ मध्ये माझे लग्न झाले. तेव्हा हनिमून ला सिमला ला फिरायला गेलो. दरवर्षी कुठे तरी जायचे असे आमचे ठरले. सौ. तेव्हा बॉम्बे हॉस्पिटल ला MD करत होती व तिथेच हॉस्टेलमध्ये राहायची. त्यामुळे आमच्या भेटीगाठी पण फार कमी व्हायच्या. तेव्हा तिला स्टायपेंड ७-८ हजार असेल त्यात तिचा जेवणाचा व इतर खर्च भागायचा आणि माझा पगार अंदाजे २०००० रुपये होता. त्यात मोटर सायकल च्या लोन चा हप्ता जायचा. त्यामुळे आम्ही पैसे अत्यंत जपून वापरायचो. पुढच्या वर्षी फिरायला जाण्यासाठी या वर्षापासूनच दर महिने पैसे साठवायचो. आत्ता गम्मत वाटते. फिरायला जायचे म्हणजे ऑफ सिझन / सिझन सुरु होण्याच्या आधी आम्ही जायचो. या वेळेत किमती ४०% किंवा त्याहून कमी असतात. खूप पैसे वाचतात , तसेच पर्यटक जास्त नसल्यामुळे आपल्याला चांगले अटेन्शन मिळते आणि निवांत फिरता येते. 

२००४ साली काश्मीर ला जाण्यासाठी आम्ही सिमल्यावरून आल्या आल्या पैसे साठवायला सुरुवात केली.  आर्यन चा जन्म होईपर्यंत आम्ही साध्याच हॉटेलमध्ये राहायचो . काटकसर करायचो. जेमतेम budget ट्रिप असायची. दिवसाचे खर्च करण्याचे लिमिट ठरलेले असायचे. शॉपिंग फारच कमी. अर्थात ती त्या वेळेची गरज होती. आत्ता खूपच पॉश ठिकाणी राहतो पण ती मज्जा नाही. 

JKTDC (Jammu Kashmir Tourism Development Corporation) च्या मुंबई च्या एका अधिकाऱ्याच्या बायकोची डिलिव्हरी सौ. ने केली होती. त्याने सांगितले कि आप काश्मीर घुमने आओ , मै आपको सब प्लॅन करके देता हू. 

त्या प्रमाणे एप्रिल २००४ ला आम्ही दोघे मुंबई - दिल्ली - श्रीनगर अश्या इंडियन एअर लाईन्स च्या विमानाने श्रीनगर ला पोहोचलो. अगदी वेगळेच वातावरण , अत्यंत सुंदर आणि स्वच्छ प्रदेश , स्वच्छ हवा , सर्वत्र निसर्गाची उधळण , अत्यंत देखणे काश्मिरी पुरुष आणि बायका बघायला मिळाल्या. कडेकोट मिलिटरी बंदोबस्त आम्हाला विमानतळापासूनच बघायला मिळाला. तिथे सुरु असलेल्या अतिरेकी कारवायांमुळे हे शापित सौन्दर्य आहे हे ठळकपणे जाणवले. आपण मुंबई मध्ये मोकळेपणाने फिरतो , राहतो , आपण २४ तास सुरक्षित असतो याचे भाग्य काय असते हे तिथे जाऊन प्रकर्षाने जाणवले. 


JKTDC च्या एका हॉटेल मध्ये ज्याला Tourist Reception Centre (TRC) म्हणतात त्या ठिकाणी आम्हाला एक खोली बुक करून दिली होती. लाकडी हॉटेल आणि खूप थंडी असल्यामुळे त्यात हिटर ची व्यवस्था असायची त्यामुळे रूम गरम राहायचा. हा आमचा पहिलाच अनुभव , नाहीतर आपण हॉटेलमध्ये गेलो कि पहिल्यांदा AC लावतो. 



लालचौक , पहलगाम , हजरतबल दर्गा , गुलमर्ग , सोनमर्ग, चश्मेशाही गार्डन , ट्युलिप गार्डन , शंकराचार्य मंदिर वगैरे सर्व ठिकाणी आम्ही बघितली.


स्थानिक पोशाख 

गोंडोला केबल कार , गुलमर्ग 

फोटो काढताना नेहमीप्रमाणे वरचा भाग कट झाला 

बर्फामध्ये 


जवाहर टनेल (रस्त्याच्या दुतर्फा झाडे , त्यामुळे त्याचे नाव टनेल )

दल लेक मध्ये शिकारामध्ये राहिलो नाही, पण बोटीतून एक राउंड मारला , मज्जा आली. प्रचंड थंडी असायची. तिथून क्रिकेटबॅट , शाल, saffron घेतली. इतर काही मोजकीच खरेदी केली.  TRC च्या जवळ एक वैष्णव ढाबा होता , तिथे शाकाहारी जेवण गरम गरम मिळायचे आणि स्वस्त आणि उत्तम quality. शिवाय ढाब्यावरचे जेवण खाण्याचा आनंद काही औरच असतो. 

रोज फिरण्यासाठी एक अम्बॅसॅडर गाडी बुक केली होती. तोच ड्राइवर आम्हाला रोज फिरवून आणायचा. अंधार पडण्याआधी आम्ही TRC ला परत यायचो. कारण संध्याकाळ नंतर थोडी भीती वाटायची. जागोजागी पोलिस , आर्मी चे बंदूकधारी जवान दिसायचे. कडेकोट बंदोबस्त सर्वत्र होता. ते दिवस चांगले होते. मोबाईल होता पण व्हाट्सएप वगैरे प्रकार नव्हते. वायफाय नव्हताच. त्यामुळे रात्री रूम वर येऊन बातम्या बघितल्या कि काश्मीर मध्ये कुठे हल्ले झाले ते कळायचे. शिवाय  बारामुल्ला, अनंतनाग जिथे खूप दहशतवादी हल्ले होतात हे आपण ऐकतो ते भारत पाकिस्तान बॉर्डर ला आहे हे तिथे जाऊनच कळले. त्यामानाने श्रीनगर जी राज्याची राजधानी आहे ती तुलनात्मक दृष्ट्या सुरक्षित वाटायची. अर्थात तिथे देखील तुरळक हल्ले होतातच, पण आम्हाला तसा काही अनुभव आला नाही. जो थरारक अनुभव आला तो पुढे सांगतो. 

लाल चौक हा श्रीनगर मधील मुख्य भाग. १९४८ मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी तिथे राष्ट्रध्वज फडकावला होता. नंतर १९९० मध्ये अतिरेक्यांनी तिथे तिरंगा फडकावण्यास मनाई केली आणि तसे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मग National Security Guards च्या संरक्षणात झेंडा वंदन झाले. त्यानंतर मात्र दरवर्षी झेंडा वंदन आणि अतिरेक्यांच्या झेंडावंदनाला धमक्या चालूच असायच्या . त्यामुळे या भागाला महत्व आहे. 

लाल चौक परिसरात ३ layer security पाहिली. एक म्हणजे रस्त्यावर गस्त घालणारे बंदूकधारी पोलीस/ सैनिक. त्यानंतर आजूबाजूच्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरी मधून रस्त्यावर बंदूक रोखणारे सैनिक / पोलीस आणि इमारतीच्या गच्चीवरून रस्त्यावर निगराणी ठेवणारे सशस्त्र सैनिक / पोलीस. एवढा कडेकोट बंदोबस्त असायचा. 

मिलिटरी चा कॉन्व्हॉय जेव्हा सैनिकांना घेऊन जायचा तेव्हा मुख्य रस्ता सर्वसामान्यसाठी पूर्णपणे बंद करायचे. त्यातून सैनिक जायचे. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने त्या सैनिकी गाड्या एका मागोमाग एक जायच्या. मुख्य रस्त्यावरून आपल्याला बाजूच्या रस्त्यावर गाडी थांबवायला लागायची मग कमीतकमी २ तास तिथे थांबून राहायचे. गाडीतुन उतरायचे नाही. त्यावेळेला रोड वर पूर्ण बंदोबस्त असायचा. आम्ही आमच्या अम्बॅसॅडर मधूनच त्या वीर जवानांना सलाम करायचो. हि मुव्हमेंट कधी व्हायची ती वेळ कोणालाच माहीत नसायची .  

रस्त्यात गाडी अडवली तरी विचारल्याशिवाय बोलायचे नाही. सांगितल्याशिवाय गाडीतून उतरायचे नाही व आपले दोनीही हात पुढच्या सीट च्या वर ठेवायचे जेणेकरून लांबून येणाऱ्या जवानाला आपले हात दिसतील अश्या अवस्थेमध्ये बसायचे. हा नियम आमच्या ड्राइवर ने आम्हाला पहिल्या दिवशीच सांगितला होता आणि रोज तो सांगायचा. हे सैनिक सिव्हिलिअन लोकांना अजिबात त्रास देत नाहीत असे त्याने सांगितले. त्या ड्राइवर चे नाव मी विसरलो. 

स्थानिक लोक पर्यटकांना खूप मान देतात , कारण त्यांचा उदार निर्वाह हा पर्यटनामुळे चालतो. त्यावेळेच्या आतंकवादी परिस्थितीला कंटाळले होते. कारण पर्यटन बरेच प्रमाणात कमी झाले होते.  

तो आमचा श्रीनगरमधील शेवटचा दिवस. त्या दिवशी आम्ही पहलगाम पाहायला गेलो. दिवसभर फिरलो खूप मज्जा आली. निसर्गाचा आनंद उपभोगला. 
पहलगाम ला नदी किनारी फोटोग्राफी 

तिथून दुपारी ३ वाजताच जेवून निघालो कारण संध्याकाळच्या आत मुक्कामी श्रीनगर ला पोहोचायचे होते. रात्री भीती वाटायची म्हणजे सुरक्षित वाटायचे नाही. खूप थंडी होती. वाटेत एक नदी लागली , मग पुन्हा गाडीतून उतरलो आणि थोडा वेळ तिथे रमलो. 

ड्राइवर च्या मदतीने आमचे फोटो काढले जात होते. तेव्हा कॅमेराने फोटो काढायचे. त्यात ३६ फिल्म चा कोडॅक कंपनी चा रोल टाकायचा आणि मग तो फोटो लॅब मध्ये डेव्हलोप करायचा. त्यामुळे मोजकेच फोटो काढायचो. सेल्फी वगैरे प्रकारचं नव्हते. मोबाइलला कॅमेरा नव्हता असला तरी खूपच कमी पॉवर चा. 

आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. संध्याकाळी ६ पर्यंत श्रीनगर ला रूम वर पोहोचायचे मग फ्रेश होऊन वैष्णव ढाब्यावर जेवायला जायचे आणि संध्याकाळी ८ वाजता परत रुम वर येऊन टीव्ही  बघणे आणि मग झोपणे हा कार्यक्रम. संध्याकाळनंतर तर तुफान थंडी असायची , दिवसापण खूप थंड असायचे. अम्बॅसॅडर गाडीत लेग स्पेस चांगली होतो त्यामुळे माझे पाय आरामात मावत होते. गाडीत हिटर चालू होता पण तरीपण मी थंडी वाजते असे म्हणून बायकोला चिकटून बसलो होतो. रस्ता मोकळाच होता , त्यामुळे गाडी सुसाट चालली होती. कुठे थांबायचा प्रश्नच नव्हता. 

अचानक मागून खूप वेगाने आर्मी च्या २ जिप्सी गाड्या सायरन वाजवत आल्या. मी लगेच ड्राइवर ला म्हटले कि गाडी बाजूला घे त्यांना जाऊदे.  तो बोलला कि साहेब अभि हमारी चेकिंग होगी. इस हालत मे क्या करना है मैने आपको बताया है, वैसे करो. घबरानेकी जरुरत नाही. आर्मी वाले सिव्हिलिअन्स को तक्लीफ नही देते.  मी बोललो अरे हमने क्या किया है. त्याने गाडी बाजूला लावली . आम्ही काचा खाली केल्या व पुढल्या सीट वर हात वरती ठेवले जेणेकरून त्या जवानांना दिसतील. आत्ता मनात विचार आला कि समजा जवानांच्या वेशात हे अतिरेकी असतील तर ? तर काय करायचे ? म्हणजे काय action घ्यायची. या विचाराने घाबरलो. मी काय करणार , जे काय करायचे ते तेच करतील. 

अश्या संमिश्र विचारात आणि statue सारखे आम्ही बसून राहिलो. एका गाडीतून ३ जवान तीनही बाजूने बंदूक रोकुन आले. त्यांनी माझ्या आणि ड्राइवर च्या मानेला बंदुकीची नळी लावली आणि आम्ही आर्मी चे आहोत असे जोरात सांगितले. आणि गाडीतून उतरण्याचा आदेश दिला. बायकोला त्यांनी सांगितले की मॅडम आप गाडीमे बैठो , मगर हिलने का नाही. चेकिंग हो राहा है और हम इंडियन आर्मी से है. च्यायला बायकोला नीट सांगितले आणि आम्हाला ते ओरडले. 

मी अतिशयोक्ती करत नाही पण बंदुकीची नळी एवढी थंड असते कि भीतीने माझ्या पायातील त्राण गेले , म्हणजे शरीराला वजनच नाही असे वाटले. घशातील आवाज तोंडापर्यंत येताच नव्हता. ते कोऑर्डिनेशन कधीच गेले होते. नवीन लग्न झालेली बायको सोबत होती. इथले निर्जन ठिकाण. आजूबाजूला कोणीच ओळखीचे नाही, घरी काय कळवायचे ? 
यांनी माझा खोटा एन्काऊंटर केला तर ?
गोळी लागल्यावर खूप दुखेल का ?
मानेत गोळी न मारता पायात गोळी मारली तर चालेल असे याना सांगू का ?
मला सोडा अशी विनंती करू का ?
मी काय केले असे विचारू का ?
मेल्यावर स्वर्ग दिसेल का ? 
म्हणजे मला अल्प आयुष्य होते तर. 
हे पुढे काय करणार ?
आमच्याकडे तर याना द्यायला पैसे पण नव्हते . असे अनेक प्रश्न त्या एका मिनिटामध्ये मनात आले. आत्ता हसायला येते. 

त्यांनी त्याच अवस्थेमध्ये मला व ड्राइवर ला गाडीच्या मागे डिक्की कडे नेले. चित्रपटाप्रमाणे आमचे दोन्ही हात डोक्यावर होते आणि मानेला बंदुकीची नळी जोरात दाबलेली. तो जवान काहीतरी बोलला पण माझे लक्षच नव्हते. पण ड्राइवर पोटावर गाडीच्या डिकीवर हात वरती करून टेकला,  मग मी पण तसेच केले. ५ मिनिटांपूर्वी आम्ही  मज्जेत होतो. अचानक सर्वकाही बदलले. 

त्यांनी झडती घ्यायला सुरुवात केली. एवढ्या जोराने तो मला तपासत होता कि काही विचारू नका. त्यात ती गाडी म्हणजे बर्फासारखी थंड होती. 

बायको गाडीत निवांत बसली होती. मागे काय चालले आहे तिला अजिबात कल्पना नव्हती. मी जस्ट माझ्या समोर पोजिशान मध्ये असलेल्या जवानाकडे पहिले आणि मला देव सापडला. त्याच्या छातीवर त्याचे नाव लिहिले होते "पाटील ". मी जवळपास जोरातच ओरडलो , अहो पाटीलसाहेब मी मुंबई चा आहे. या ठिकाणी कोणी मराठीत बोलेल याची त्यांना सुद्धा कल्पना नव्हती. पाटील पण लगेचच माझ्याकडे बघून ओरडले , अरे उनको छोड दो , वो मेरा गाव वाला है. पाटीलसाहेब माझ्या जवळ आले. माझ्यापण जीवात जीव आला. थोड्यावेळापूर्वीची परिस्थिती लगेचच बदलली. आम्ही सर्वजण नॉर्मल उभे होतो. थंड झालेले रक्त आणि शरीर पुन्हा गरम व्हायला लागले.

पाटील म्हणजे २२ वर्षाचा साताऱ्याचा तरुण मुलगा . तो बोलला , अहो राव आधी  सांगायचे नाही का .मी काय या प्रश्नाला उत्तर देऊ ?  ज्याच्या मानेला बंदूक असते तो सर्व प्रकारचे ..णे विसरतो.  आमच्या गाडीचे पेपर तपासून झाले. त्यांचा मुख्य अधिकारी पण आला. २५ एक वर्षाचा NDA पास आऊट सेकंड लेफ्टनंट होता. ६ फूट उंची , मस्त बॉडी, गोरा, लाल लाल गाल आणि हँडसम. खरी परिस्थिती समजल्यावर तो आम्हाला सॉरी बोलला. मी म्हटले कि तुम्ही विचारायला तर पाहिजे ना. तो बोलला कि हि आमची तपासणी करायची पद्धत आहे. इथे चालत फिरता सामान्य दिसणारा माणूस अचानक बंदूक , हातबॉम्ब वापरतो, त्यामुळे आम्हाला कायम सतर्क राहावे लागते. त्याने आम्ही कुठे राहतो त्याचा पत्ता आणि फोन नंबर घेतला आणि  वायरलेस वर काहीतरी कळवले.  हे सर्वकाही साधारण १० मिनिटामध्ये झाले. 

याने सांगितले कि जवळच तेथील लोकसभा उमेदवार मेहबूबा मुफ्तीच्या सभेत आत्ताच ग्रेनेड हल्ला झालाय आणि अनेक जण जखमी झालेत. ते अतिरेकी पांढऱ्या अँबेसेडर गाडीने याच रस्त्यावरून गेलेत त्यामुळे तुमचा आम्ही पाठलाग केला. 

पाटीलशी बोललो . त्याची हि पहिलीच पोस्टिंग होती. हा मराठी पट्ठ्या अजिबात घाबरत नाही असे बोलला. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत , कोणाच्या बापालाही घाबरत नाही. छाती अभिमानाने फुलली , अंगावर काटा आला. त्या ऑफिसर ने आम्हाला सांगितले कि लवकर हॉटेल वर  पोहोचा  कारण पूर्ण काश्मीरमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. आणि आज रूम वरच जेवा , बाहेर जाऊ नका. पाटीलसाहेबाना प्रेमाने मिठी मारली. माझ्या गाडीचा दरवाजा बंद होईपर्यंत तो थांबला. आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात बघितले. माझ्या डोळ्यात कृतन्यता आणि अभिमान होता तर त्यांच्या डोळ्यात एका मराठी बांधवाला मदत केल्याचा आनंद. या सर्वाना दीर्घायुष्य लाभो अशी मी मनातली मनात प्रार्थना केली आणि निघालो. 

खरे सांगतो , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले , शाहू महाराज यांच्या पुण्यभूमी महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ,आपले भाग्यच आहे. 

गाडीत बसल्यावर मागे काय काय झाले ते बायकोला सांगितले . तिचा विश्वासच बसला नाही. ती बोलली मला कोणी काहीच त्रास दिला नाही. तुला घरी खूप लाडावून ठेवले आहे. जरा काय झाले कि तू कौतुक करत बसतोस. असो... मी आपला निमूटपणे गाडीत बसलो. श्रीनगर मध्ये खूपच शांतता होती. तणाव स्पष्टपणे जाणवत होता. त्या रात्री आम्ही रूम वरच जेवलो. रात्री बातम्या लावल्यावर त्या हल्ल्यानंतरची दृश्य पहिली आणि खूप भीती वाटली. 
 
दुसऱ्या दिवशी आम्ही जम्मूला विमानाने निघालो. श्रीनगर - जम्मू - दिल्ली - मुंबई असा इंडियन एरलाईन्स प्रवास होता. जम्मू ला वैष्णोदेवीला जाऊन मग मुंबई ला जाणार होतो. श्रीनगर एअरपोर्ट ला लाकडाच्या ४-५ शवपेट्या पहिल्या. भागातील शहिद सैनिकांचे शव विमानाने त्यांच्या गावी पाठवत होते.  त्या एअरपोर्ट ला हे नित्याचेच होते. त्या पेटीवर त्यास सैनिकाचे नाव , रेजिमेंटचे नाव आणि आणखीन काही माहितीचा बोर्ड लावला असायचा. 

पूर्ण काश्मीर फिरून आल्याचा आनंद निवळला. अश्या अनेक सैनिकांच्या हौतात्म्यामुळे आपण सुरक्षित आहोत. या बदल्यात याना काहीच मिळत नाही. आपण आपले मुंबई मध्ये बसून ओरडतो कि पाकिस्तान बरोबर युद्ध करा पण देशासाठी जीव देणाऱ्याचा आणि आपला काहीच संबंध नसतो. 

चेक इन केल्यावर आम्ही बोर्डिंग गेट जवळ थांबलो. तिथे दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या गेट वर एक जवान होता. त्याला सॅल्यूट केले आणि विचारले कि घरी चाललात काय ? तो म्हणाला कि मेरे साथी को लेके जा राहा हू. मी म्हटले क्या हुवा ?  तो शांतपणे म्हटलं कि हम दोनो ३ साल से एकसाथ सेंट्री कि ड्युटी कर रहे है. कल रात को ड्युटी पर थे. मेरे बाजूमे खडे साथी को किसीने दुरसे गोली मारी और वो भाग गया.अभी उसको लेकर  उसके घरवालो को सौपने जा राहा हू. उसका सामान और कुछ यादे घरवालोंको बताऊंगा और फिर वापस यहा ड्युटी आऊंगा.  २६ वर्षाचा बिहारमधील जवान मृत्युमुखी पडला होता . इधर ऐसा हि है. कभी किसका नंबर आयेगा मालूम नाही. आप सिव्हिलिअन्स को ये नाही समझेगा. हे बोलताना त्याच्या चेहेऱ्यावर काहीच हावभाव नव्हते. मी देखील निरुत्तर स्तब्ध झालो.  आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. 

 
 खरंच ......    युद्ध नको बुद्ध हवा. 

विशाल फुलपगार 
११ ऑगस्ट २०२१