Sunday, June 28, 2020

पाठकगुरुजी - काही गंमतीशीर आठवणी


पाठकगुरुजी - काही गंमतीशीर आठवणी 

पाठक गुरुजी विषयी प्रचंड आदर बाळगून त्यांच्यासोबत झालेल्या काही आठवणी येथे उल्लेखित करतो. "जगन्मित्र" या त्यांच्यावरील पुस्तकात काही आठवणी आल्या आहेत, पण सगळ्यांनीच ते पुस्तक वाचले असेल असे नाही. या त्या त्या वेळी झालेल्या घटना/ संवाद असून, त्यातून कोणाचा अपमान करण्याचा/ होण्याचा किंवा माझ्या उध्दटपणाचा हेतू नाही.


गुरुजींचा जन्म नवसाने झाला. लहानपणी ते राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या सान्निध्यात वाढले. महाराज त्यावेळी खूपच प्रसिद्ध संत होते. पाचलेगावकर महाराज याना सर्प सिद्धी होती.


त्यांच्याकडे अनेक प्रकारचे विषारी/ बिन विषारी सर्प होते. आणि विशेष म्हणजे ते सर्प महाराजांच्या आज्ञेत असायचे.  गुरुजींना लहानपणी "बटु" या टोपण नावाने बोलावत असत. आणि निश्चितच गुरुजी लहानपणी खूपच मस्तीखोर होते. "वासुकी" नावाचा एक विषारी साप महाराजांकडे नवीनच दिला होता व अजून तो महाराजांना वश नव्हता , म्हणून त्याला एका टोपलीत ठेवले होते. आणि पाचलेगावकर महाराजांनी स्पष्ट ताकीद दिली होती की वासुकी ला कोणीही स्पर्श करू नये. हात लावायचा नाही, असे म्हटल्यावर गुरुजींची उत्सुकता वाढली. महाराज असताना भीती कसली आणि मला काय होणार? असा विचार करून बटुने वासुकी असलेल्या टोपलीत हात घालून त्याला काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा वासुकीने naturally गुरुजींना दंश केला. विष चढायला लागल्यावर बटुच्या अंगाची आग आग व्हायला लागली त्यामुळे गुरुजी तडफडू लागले. मग सगळे जण घाबरले. सर्वानी पाचलेगावकर महाराजांकडे धाव घेतली व त्यांना घडलेला प्रकार सांगितला.  महाराजही भडकले , मी नाही म्हटलो होतो मग बटु ने का हुशारी केली? आत्ता त्याला थोडा वेळ तडफडू दे. मग थोड्या वेळाने महाराजांनी ते विष उतरवले. 

त्यावेळी महाराजांकडे खूप साप असायचे आणि त्याची सर्वानाच सवय होती त्यामुळे कदाचित गुरुजींनी न घाबरता ते धाडस केले असावे. शिवाय गुरुजी हे महाराजांचे लाडके होते हे निश्चितच. देशाच्या प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी या एकदा पाचलेगावकर महाराजांना भेटायला आल्या होत्या त्यावेळी महाराजांनी त्यांच्याही हातात सर्प दिला होता व गुरुजी त्यावेळी तिथे हजर होते. हि गोष्ट मला गुरुजींनीच सांगितली आहे. 

काही जण गुरुजींकडून उपासना घेत, पण ती करत नसत. गुरुजींनी विचारले असता, मग शाळेतल्या मुलांसारखे कारण सांगत. Busy असतो, कामावरून उशिरा घरी येतो, वेळ मिळत नाही, घर छोटे आहे वगैरे. मग गुरुजी वैतागत आणि म्हणत वेळ नसताना आणि छोटे घर असताना पण मुले झालीच ना? त्याला कसा वेळ मिळाला? मग सांगितलेली उपासना का नाही करत?  सर्व जण निरुत्तर व्हायचे. 

एकदा माझ्या स्वप्नात गुरुजी ४-५ वेळा सलग आले. मग मी त्यांना भेटायला माहीम मुक्तिधामच्या घरी गेलो. म्हणालो अहो, माझ्यासारख्या तरुणाच्या स्वप्नात तुम्ही यायला पाहिजे का कोणीतरी सुंदर मुलगी यायला पाहिजे? तुम्ही मला स्वप्नात येऊन कशाला  त्रास देता? आपण रोज सकाळी १० वाजता बोलतो , अनेकदा भेटतो ना?  मग ते खूप हसले, आम्ही दोघेही हसलो. विशेष म्हणजे नंतर ते कधी विशेष माझ्या स्वप्नात आले नाही. बहुधा मी केलेली गम्मत त्यांनी खूप गंभीरपणे घेतली असावी.

एकदा काय झाले, त्यांचा एक जुहूचा भक्त होता, खूप श्रीमंत. तो त्यांना प्लाझा, दादर येथे हिंदी चित्रपट बघायला घेऊन गेला. का ते कारण माहित नाही. चित्रपटाचे नाव "सत्या". आम्हाला कळल्यावर आम्ही हैराण झालो की  "सत्या" हा मारधाड असलेला चित्रपट बघायला गुरुजी का  गेले? म्हणजे नेणाऱ्याची पण कमालच आहे. दुसऱ्या दिवशी भेटलो आणि त्याना विचारले, चित्रपट कसा वाटला? ते बोलले की मला काही कळले नाही. छान एअर कंडिशन चालू झाला आणि मी गाढ झोपून गेलो. 

धुळे येथे नोकरीत असताना कोणीतरी त्यांना गम्मत म्हणून बिअरची बाटली दिली आणि ह्याने सर्दी जाते असे सांगितले. ते तीन चार दिवस सकाळ संध्याकाळ एक बूच भर बिअर औषधासारखे प्यायचे.  नंतर खूपच वास येऊ लागला म्हणून त्यांनी ती बाटली फेकली. 

गुरुजींनी स्थापित केलेल्या जय गुरुदेव आश्रम ट्रस्ट , गाणगापूर मध्ये त्यांनी माझी आधी विश्वस्त आणि मग विश्वस्त -खजिनदार पदावर नेमणूक केली. मी त्यांना गमतीने म्हणालो कि बघा, अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रस्ट चा कारभार केलात, आत्ता मात्र मी त्याची चौकशी करणार आणि काही गडबड आढळली तर शोधून काढणार. खरे म्हणजे गुरुजींचा कारभार अत्यंत स्वच्छ, त्यामुळे असा काही विषय नव्हता , पण मी गम्मत केली. त्यांनी लगेचच उत्तर दिले कि बघ, आश्रमाची इमारत बांधून झाली, ट्रस्ट च्या नावाने पुरेश्या फिक्स डिपॉजिट बँकमध्ये आहेत, त्या व्याजावर आश्रमाचा सर्व खर्च निघेल, सर्व कामकाज चालेल अशी व्यवस्था मी करून ठेवलीय. तुम्हाला नवीन काही करायचे नाही.  तुम्हाला फक्त आश्रम मेंटेन करायचा आहे. पैशाची चिंता आपल्याला नाही. तुम्हाला कारभार सोपवून मी जाईन. आगे तुम आश्रम सम्भालो और दत्त महाराज सम्भालेंगे.

त्यांच्या सर्व अपत्यांची लग्न झाल्यावर सर्वानी आपआपला संसार थाटला. मग माहीमला फक्त गुरुजी आणि त्यांच्या पत्नी माई असायच्या. दोघांचा संसार आणि संवाद उत्तम. अगदी made for each इतर. कधीतरी गुरुजी माईला डिवचयाचे असेल तर मला डोळा मारायचे, आणि म्हणायचे  आता बघ. मग काहीतरी कारण काढून ते माईची खोड काढायचे आणि थोडासा वाद झाला कि बोलायचे कि सखाराम पंतांनी (माईच्या वडिलांचे नाव सखाराम दीक्षित होते) हे काय माझ्या गळ्यात बांधले. मग माई खूप भडकायची आणि aggressive व्हायची. व बोलायची, माझ्या वडिलांना काहीच बोलायचे नाही. मग मात्र गुरुजी बॅकफूट वर जायचे आणि compromise करायचे.  मी त्यांना म्हणायचो की, का हो तुम्ही उगाच खोड्या काढता. ते म्हणायचे,  बघ आम्ही दोघे इथे एकटेच असतो . दुपारी काय टाइम पास म्हणून तिला थोडे भडकावतो. त्यात आमचा अर्धा तास जातो. मग पुन्हा शांत झाल्यावर नेहमीच रुटीन चालू.  गुरुजी कधीच TV बघत नसत.

गुरुजी दर गुरुवारी सकाळी १० नंतर माटुंगा येथील पणशीकर मध्ये पेढे आणायला जायचे आणि  संध्याकाळी येणाऱ्या लोकांना वाटायचे. मग तिथून काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जायचे आणि भाजी वगैरे काही किरकोळ खरेदी करून परत यायचे. मला ती वेळ नक्की माहित असायची. ते बाजारात गेले कि मी सकाळी ११ वाजता माईला फोन करायचो आणि विचारायचो, गुरुजी आहेत का? ती म्हणायची कि अरे ते आत्ताच बाहेर गेलेत. मग मी म्हणायचो, हो मी त्याना आत्ताच माटुंग्याला गजरा खरेदी करताना पाहिले, बहुधा तुमच्यासाठीच घेतले असतील. गुरुजी परत आल्यावर माई त्यांना विचारायची, अहो गजरा कुठे आहे. ते म्हणायचे,  मी कुठे गजरा घेतला आणि तुला कोण बोलले. मग माझे नाव सांगितल्यावर ते मला फोन करायचे आणि खोटे खोटे ओरडायचे, अरे का माझ्या म्हातारीला छळतोस. आत्ता तिला सांग खरे काय ते आणि मला फोन द्यायचे. मी माईला परत सांगायचो, बघा जे मी पहिले ते मी तुम्हाला सांगितले. नंतर तुम्ही बोलू नका की मुलांनी तुम्हाला सावध केले नाही म्हणून. मग गुरुजी म्हणायचे की काशीसाठी गजरा घेतला  (काशी विश्वेश्वरासाठी ). अश्या अनेक गमती व्हायच्या.

बैल पोळा हा सण गुरुजी आणि माई घरी साजरा करायचे. झाले असे की  एकदा माईनी आम्हाला विचारले कि उदया बैल पोळा आहे. जर तुम्ही उदया आलात तर तुमची मी बैल समजून पूजा करिन आणि मग तुम्हाला जेवायला देईन.  त्यातला "जेवायला देईन" हा अतिशय महत्वाचा catchword आम्ही ऐकला आणि माईच्या हाताचे जेवण खायची संधी कोण सोडणार असा विचार करत दुसऱ्या दिवशी आम्ही (म्हणजे मी , पंकजभाऊ, संजय, सुभाष) आम्ही  माहीम मुक्तिधामच्या घरी संध्याकाळी पोहोचलो. अंदाजे ७.३० ला आमच्या चौघांचे माईने खरचं औक्षण केले. आमच्या कपाळावर गंध लावला आणि खरेच बैलाची पूजा करून मान सन्मान देतात त्याप्रकारे आमचा मान सन्मान झाला. नंतर पोटभर जेवलो. खूप मज्जा आली. हा बैल पोळा नंतर आमचा वार्षिक कार्यक्रम ठरलेलाच असायचा. माई पुढच्या प्रवासाला जाई पर्यंत हा बैल पोळा आम्ही दरवर्षी साजरा करायचो. मला माहित नाही की इतर ठिकाणीपण असाच बैलपोळा साजरा करतात का पण हि एक ठळक गमतीशीर आठवण आयुष्यभर पुरेल. आणि हो कोणत्याही बैलांपेक्षा आम्ही नक्कीच देखणे होतो.      

गुरुजींना काही भक्त मंडळींनी अमेरिकेला बोलावले. तिथे त्यांनी अनेकांच्या घरी पूजा सांगितल्या आणि मिळालेली सर्व दक्षिणा त्यांनी आश्रमाच्या ट्रस्ट ला दिली आणि त्याने गाणगापूर आश्रमाच्या बांधकामाला खूप गती आली हे मात्र खरे. गुरुजी जवळपास दोन तीन महिने अमेरिकेला होते.



अमेरिकेत पूजा सांगताना गुरुजी 
मग त्यादरम्यान आम्ही माईला भेटायला जायचो. गप्पा मारायचो. मग आम्ही एक आयडिया केली. आम्ही माई ला फोन करून सांगायचो की गुरुजी आमच्या स्वप्नात आले आणि सांगितले की माई तुम्हाला उदया मसालेभात , डाळ बाटी वगैरे खायला देईल. तुम्ही तिच्याकडे घरी जाऊन जेवून या. मग आम्ही चौघे मित्र दर आठवड्याला माईला फोन करायचो आणि माहीमला तिच्याकडे जेवायला जायचो. गुरुजींनी सांगितले म्हटल्यावर माई खूप जेवण करायची.  माई नेहमी बोलायची की हे माझ्या स्वप्नात येऊन मला का नाही सांगत ? 

एरवी पण ती आम्हाला खूप खायला दयायची , लाड करायची. ती गुरुजी परत आल्यावर तिने गुरुजींना हा प्रकार सांगितला. गुरुजींनी आम्हाला सगळ्यांना बोलावले आणि माईला सांगितले, मी कोणाच्याच स्वप्नात गेलो नव्हतो. पोरांनी तुला फसविले. काय रे पोरांनो... मग माई त्यांनाच ओरडली आहो, ती माझी मुले आहेत तुम्ही  त्यांना काही बोलू नका.

त्याच दरम्यान गुरुजी ज्या दिवशी अमेरिकेतून येणार होते त्या रात्री आम्ही माईना घेऊन विमानतळावर गेलो. कोणाच्यातरी ओळखीने आम्ही डायरेक्ट आतमध्ये गेलो होतो. तसेच श्री. कोकणे, गुरुजींचे भक्त, तेव्हा एअरपोर्ट मॅनेजर होते त्यामुळे ते सोबत होते. मी माईना म्हटले कि मला असे कळले आहे की  गुरुजीनी अमेरिकेत दुसरे लग्न केले आणि ते आत्ता त्या बाईना सोबत घेऊन येत आहेत. ती बोलली मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही मला काही सांगू नका. आम्ही म्हटले, आमचाही गुरुजींवर पूर्ण विश्वास आहे पण त्या गोऱ्या बायकांवर नाही. जो पर्यंत गुरुजींना तिने एकटे येताना बघितले नाही,  तो पर्यंत ती खूप टेन्शन मध्ये होती. नंतर घरी आल्यावर आम्ही गुरुजींना सांगितले तेव्हा आम्ही खूप हसलो होतो. गुरुजी बोलले, तुम्ही माझ्या म्हातारीला खूप गुंडाळून ठेवले आहे.

पाठकगुरुजी आणि माई 
गुरुजींबरोबर आम्ही मित्र कुठे बाहेर जाणार असेल तर माई गुरुजींना दम दयायची. म्हणायची अहो, तुम्ही माझ्या पोरांना घेऊन जाताय. त्याना वेळेवर खायला द्या. नाहीतर तुम्ही पण उपाशी आणि माझी पोरे पण उपाशी राहतील. आम्हाला पण माई सांगायची, तुम्हाला भूक लागली की तुम्ही लगेच जेवून घ्या. गुरुजींना जास्त भूक लागत नाही. तुम्हाला पण उपाशी ठेवतील. एकंदरीत तिला आमची कायम काळजी असायची हे खरे.

गुरुजींचे लग्न त्यांच्याच गावातील आणि त्यांच्या घराजवळ ५ मिनिटावर राहणाऱ्या प्रतिभा दीक्षित (आता प्रतिभा पाठक / माई ) यांच्याशी झाले. त्यावेळी दीक्षित हे सरकारी नोकरीत होते व त्यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. पाठक कुटुंब मात्र गरिबीत होते. दीक्षितांकडे नोकर चाकर, गाई वगैरे खूप काही होते. लग्न व्हायच्या आधीपर्यंत माई फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खायच्या. लग्नाआधी चहा तर कधीच घेतला नव्हता. लग्न झाल्यावर मात्र त्यांच्याकडे फक्त दोन साड्या आणि त्यापण आलटून पालटून घालायच्या आणि पैशाची कमतरता अश्या वाईट परिस्थितीत त्यांनी संसार सुरु केला. मग एवढ्या श्रीमंत घराच्या मुलीने एका गरीब मुलाशी का लग्न केले असावे हा प्रश्न मी दोघांनाही वेगवेगळा आणि एकत्र विचारला. कारण दोघांमधील synergy आणि प्रेम बघून दोघेही destined to be married होते हे मात्र निश्चित. झाले असे की गुरुजींचे वडील आणि माईचे वडील हे एकाच गुरूंचे शिष्य (निजामपूरचे नित्यानंद सरस्वती महाराज). त्या गुरूंनीच सांगितले, या दोघांचे लग्न लावा. माई खूप श्रीमंत घरच्या होत्या, त्यामुळे गुरुजींनी ३ वेळा माई ना नकार दिला. पण त्यांच्या वडिलांनी खूपच हट्ट धरला मग गुरुजींनी माईना स्वतःची आर्थिक परिस्थिती सांगितली आणि मगच त्यांनी लग्न केले.
पण तरी पण " कुछ तो गडबड है ". मला वाटते कि हा प्रेम विवाहचं असावा. पण आत्ता आणि तेव्हाही मला काही पुरावा सापडला नाही.  




गुरुजींना भेटायला येणारी माणसे रात्री उशिरापर्यंत चालू असायची त्यामुळे आम्हाला बोलायला privacy मिळायची नाही. मग आम्ही रात्री  पंकजभाऊच्या गाडीने बांद्रा , बॅण्डस्टॅण्डला समुद्र किनारी जायचो आणि juice प्यायचो, समुद्रकिनारे फिरायचो. रात्री उशिरा शांततेत समुद्राचा आवाज, आमच्या गप्पा आणि समुद्र किनारी walk हे खूपच आनंदि वातावरण असायचे. 

त्याचे असे झाले कि आम्ही गुरुजींना म्हटले कि आज रात्री आम्ही १०. ३० ला तुमच्याकडे येतो मग आपण बॅण्डस्टॅण्ड ला जाऊया, तिथे चालूया, juice पिऊ आणि मग आम्ही तुम्हाला १२ वाजेपर्यंत पुन्हा घरी सोडतो.  त्यावेळी पंकजभाऊ कडे land-cruiser गाडी होती. ठरल्या वेळेला आम्ही चौघे मित्र त्यांना घ्यायला पोहोचलो. बघतो तर काय, गुरुजी शर्ट-पॅन्ट घालून तय्यार होते. एरवी ते कायम धोतर आणि सदरा घालायचे. आम्हाला आश्चर्य वाटले. ते म्हणाले अरे वा तुमच्या तरुण पोरांबरोबर रात्री आणि ते पण बॅण्डस्टॅण्डला मी म्हातारा वाटू नये म्हणून असे कपडे घातले. आम्ही सगळेच खूप हसलो. अनेकदा असे आम्ही रात्री गेलोय. खूप मज्जा यायची. गोल्डन दिवस होते ते. 

मला तर ते "Tallest are the foolest and you are not exeption to that" असे ते नेहमी म्हणायचे. हा त्यांचा माझ्या बाबतीत आवडता जोक/ dialogue होता.  तसे त्यांच्याकडे काही मागितले आणि त्यांनी दिले नाही असे कधीच झाले नाही , पण देताना ते म्हणायचे कि "तुमच्या पोरांच्या बापाचे आम्ही देणे लागतो त्यामुळे तुमचा हट्ट पुरवणे मला भागच आहे."

आयुष्याच्या शेवटी मात्र ते आयकॉन या डोंबिवली मधील हॉस्पिटलच्या ICU मध्ये २/३ वेळा ऍडमिट झाले. खरे म्हणजे गुरुजींना आजारी बघायची आम्हाला सवयच नव्हती. त्यामुळे exactly काय चाललेय काय कळायचेच नाही. तेव्हा माहित नव्हते की ते त्यांचा इथला प्रवास आत्ता संपवत आहेत.  शिवाय गुरुजी कधीतरी आपल्यातून जातील असे आम्हाला कधीच वाटायचे नाही आणि असा विचारपण यायचा नाही. मी त्यांना गमतीने म्हणायचो, काय हो तुम्ही सारखे सारखे इथे ऍडमिट होताय? काय भानगड आहे. तुम्हाला इथली कोणी नर्स आवडली आहे का? तर सांगा मला. ते खूप हसायचे,म्हणायचे, अरे तरुणपणात चुकलो नाही आत्ता काय करणार? यात काही अपमान किंवा उद्धटपणा नसायचा. आमचे रिलेशन उत्तम असल्यामुळे असे बोलायला काही वावगे नव्हते आणि दोन मित्रांमध्ये थट्टा मस्करी चालतेच.

गुरुजींना मी नेहमी म्हणायचो की तुम्ही म्हणता कि दत्त महाराज वाचवतील/ सांभाळतील. अहो पण ते वेळेवर येतील ना ? उशीर झाला तर काय फायदा ? ते खूप हसायचे आणि म्हणायचे,  जो विश्वाचा संसार चालवतो तो वेळ कसा चुकवेल. कधीतरी ते कोणाला तरी सांगायचे अरे वर्षाला एक तरी श्री गुरुचरित्र पारायण करून महाराजांवर मेहेरबानी करा.

आठवणी असंख्य आहेत , त्यातल्या थोड्या आज लिहिलेल्या . बाकीच्या नंतर कधीतरी सांगतो.

विशाल फुलपगार


दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s



Friday, June 26, 2020

कोरोना आणि आमचे कुटुंब



माझी पत्नी एका मुंबई महानगरपालिका (मनपा) रुग्णालयात स्त्रीरोग शास्त्र व प्रसूती विभागात डॉक्टर आहे. हा विभाग म्हणजे १२ महिने कायम गर्दीचा विभाग त्यामुळे कामाचा प्रचंड लोड. 

साधारण फेब्रुवारी २०२० मध्ये कोरोना आजाराविषयी थोडीफार माहिती मिळायला लागली आणि मार्चमध्ये त्याचे गंभीर परिणाम जगभर दिसायलाच लागले. मार्च २०२० अखेरीस महाराष्ट्र सरकारने व नंतर भारत सरकारने संपूर्ण लॉक डाउन घोषित केला. सर्वत्र भीतीचे / अनिश्चिततेचे वातावरण होते. सर्वजण आपापल्या घरी कैद झाले. तुम्ही , मी आपण सर्व घरी थांबलो. एक अदृश्य अनामिक भीती आपल्या सर्वांच्या मनावर दडपण आणत होती. फेस मास्क, सोशल डिस्टंसिन्ग ,सानिटीझर हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालले होते. 

अख्खा देश थांबला . रस्ते भरदिवसा सुनसान झाले. परंतु याच वेळी शासन , महापालिका , रुग्णालय , राशन इत्यादी यंत्रणा जीवाची पर्वा ना करता दिवस रात्र काम करू लागल्या. पोलिसाची गस्त , नाकाबंदी वाढली. शासनाने दैनंदिन दूधपुरवठा , भाजीपाला , अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले. सर्व धार्मिक स्थळे , बंद झाली. आणि मंदिरातील देव आत्ता पोलीस , डॉक्टर, रुग्णालय /महापालिका कर्मचारी , राशन कर्मचारी , नर्स , वॉर्डबॉय , ऍम्ब्युलन्स कर्मचारी यांच्या रूपात सर्वत्र दिसू लागले. आज आपण हॉस्पिटल विषयी बोलूया. 

युरोप , अमेरिकेत कोरोना मुळे होणारे मृत्यू विविध न्यूज चॅनेलने अगदी आपल्या हॉल मध्ये आकडेवारीनिशी आणून ठेवले. असे वाटले कि आत्ता जग संपलेच. पण लक्षात ठेवा कोणी कितीही घाबरवले तरी Nature has his own way to balance and counterbalance Universe.  

शेवट कोणीही आजारी पडले तरी आपल्याला हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरकडे तर जावे लागतेच. आणि वैद्यकीय सेवा / पोलीस सेवा / डिफेन्स सेवा तर २४ तास चालू असतेच , मग काहीही संकट येवोत.माझी पत्नी एका मनपा रुग्णालयात डॉक्टर असल्याने मी माझ्या नजरेतून लिहितो. 

कोरोना हा आजार असा कि त्याला अजूनपर्यंत काही औषध / ट्रीटमेन्ट नाही, श्वासातून पसरतो आणि त्याची लागण झाल्याचे जवळपास १४ दिवसांनी कळते. खोकला , ताप आणि श्वास घ्यायला त्रास हि प्रमुख लक्षण. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला कि मग ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लावावा लागतो. व बहुतेक वेळा मृत्यू हा फुफ्फुस निकामी झाल्यामुळेच होतो. 

अर्थात ताप येणे हे काय भारतीयांना नवीन नाही. वर्षातून अनेकदा आपल्या सगळ्यांना ताप येत असतोच आणि बहुतेक वेळा आपण तो अंगावरच काढतो. खूप जास्त झाले तर मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. ताप येणे आणि कसेतरीच होणे हा आपला राष्ट्रीय आजार आहे असे म्हणायला हरकत नाही. पण श्वास घेण्यास त्रास होणे , ICU मध्ये बेड उपलब्ध होणे म्हणजे गंभीर. आपल्याकडे शासकीय रुग्णालयात ICU मध्ये बेड उपलब्ध होणे आणि व्हेंटिलेटर मिळणे म्हणजे मे महिन्यात कोकण रेल्वे चे टिकीट मिळण्यासारखेच आहे. (कधीच मिळत नाही.)

भारत देश म्हणजे खरंच luck च्या भरवश्यावर चालणारा देश. जे काही प्लांनिंग झाले आहे त्यातले बरेचसे  ब्रिटिश शासनाने केले आहे आणि अर्थात आपण त्यात थोडीफार भर टाकली. शेतीप्रधान देश आहे , आपण अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत असे आपण अभिमानाने सांगतो, पण शेतकरी कधीच सुखी , संपन्न नव्हता. विज्ञानाने प्रचंड प्रगती केली तरीपण त्याचा फायदा सामान्य जनतेपर्यंत फारच कमी पोहोचला. वैद्यकीय क्षेत्राकडे तर आपण खूपच दुर्लक्ष केले तरीदेखील आपल्या हुशारीने जगातील सर्वोत्तम डॉक्टर भारतीयच आहेत. आपण उत्कृष्ट डॉक्टर , इंजिनीअर निर्माण केले पण वर्ल्ड क्लास हॉस्पिटल / कंपनी निर्माण करू शकलो नाही. 

असो , मनपा रुग्णालयात काम करत असल्यामुळे पत्नीला कामावर जाणे भागच होते आणि तिने पण टाळले नाही. अजूनपर्यंत एकही सुट्टी घेतली नाही.  या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये जे काही सर्वांचे होईल ते आपलेपण होणार हे आम्ही जाणले. रुग्णालयात देखील सुरुवातीला तणावाचे वातावरण होते. कारण कुठल्याही प्रकारचे इन्फेकशन व्हायला/ पसरायला हि सर्वोत्कृष्ट जागा. आणि एकदा रुग्णालय कर्मचाऱ्याला झाला कि मग त्यांच्या कुटुंबियांना लागण व मग इतरत्र पसरायला लागतो. आणि अनेकांच्या बाबतीत असे घडलेही. 

सुरुवातीच्या काळात facemask , PPE  kit चा तुटवडा होता. मग आम्ही मित्र मैत्रिणींना आवाहन केले. २-३ डिस्ट्रिब्युटर शी बोलून त्यांचे बँक अकाउंट  डिटेल्स सर्वाना दिले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कोणी २ , कोणी १० असे करत करत एका महिन्यात जवळपास २०० PPE  kit  रुग्णालयाला डोनेट केले. डिस्ट्रिब्युटर ते PPE Kit रुग्णालयात आणून द्यायचे. अर्थात मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्यामुळे सुरुवातीला १६८० रुपयाला मिळणारा PPE Kit  शेवटी शेवटी ९५० रुपयांपर्यंत मिळाला आणि आत्ता तर अजूनच स्वस्त मिळवितो. याबाबत प्रत्येक डोनारला रिसीट दिली व रुग्णालयाकडून acknowledgement लेटर मिळवून दिले. त्यावेळी क्लेरिकल  स्टाफ कमी येत असल्यामुळे थोडे मागे पुढे झाले, पण पर्याय नव्हता. थोड्या उशिराने का होईना पण सर्वाना acknowledgement लेटर  मिळवून दिले. दुकाने बंद असल्यामुळे Facemask चा तुटवडा होता , मग आमच्या कॉलोनी मधील एका टेलर कडून कापडाचे ट्रिपल लेअर मास्क शिवून घेतले व ते रुग्णालयात वाटले. असे दोन महिन्यात जवळपास १२-१५ डझन facemask दिले. कालांतराने शासनाने PPE चा पुरवठा सुरळीत केले मग मात्र donation थांबवले. 

याव्यतिरिक्त घरातून बाहेर जाणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझी पत्नी , मग ती येताना , किराणा माल , भाजी वगैरे घेऊन यायची. येण्याजाण्यासाठी ती स्वतःची गाडी वापरायची. मग तिच्या गाडीत आम्ही फ्रुटी/ अमूल लस्सी / appi / facemask  ठेवायचो. मग रस्त्यावर उन्हातान्हात अविरत सेवा देणाऱ्या पोलीस बांधवाना द्यायचो. हे आपण सहजच करू शकत होतो,  म्हणून केले त्या काही विशेष नाही आणि कौतुक तर अजिबातच नाही. 

हळूहळू हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली होती. शिवाय प्रसूतिगृहामध्ये नियमित गर्दी तर होतीच म्हणजे PPE Kit घालणे आलेच. आत्ता हे PPE Kit म्हणजे प्लास्टीक चे कपडे घालणे म्हणजे विचार करा काय भयानक अवस्था होत असेल. 

PPE Kit घातलेले डॉक्टर 
एकदा PPE Kit घातले कि ६ तास नो टॉयलेट आणि गरमीने हैराण व्हायला होते. असे असतानाही सर्व डॉक्टर्स , नर्स , वॉर्डबॉय , सफाई कर्मचारी, आपले काम चोख करत होते. प्रत्येकाच्या घरी लहान मुले किंवा म्हातारे आई वडील होतेच , पण काय करणार. 

कोरोनाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रवेश केला. आत्ता स्टाफ , डॉक्टरांनाही कोरोना होऊ लागला होता. मग त्यांच्या संपर्कातील व्यक्तीही quarantine होऊ लागल्या. बायकोच्या सोबत काम करणाऱ्या काही डॉक्टरांना , बघितलेल्या रुग्णांना याची लागण झाली. मग बायकोही स्वतःहून १४ दिवस वेगळी राहिली. त्यादरम्यान तिचे जेवणाचे हाल झाले. त्या दिवसात ती गाडीने मुलाला भेटायला २-३ दिवसांनी यायची व रस्त्याच्या पलीकडे गाडी उभी करून मग मोबाईलवर आमच्याशी बोलायची. इतरवेळी विडिओ कॉल वर संपर्क असायचा. मग १४ दिवसांनी कोरोना टेस्ट केली आणि ती नेगेटिव्ह आल्यावर घरी आली. अनेक कोरोना रुग्ण , डॉक्टरच्या संपर्कात असूनही तिला कोरोना झाला नाही. किंवा कदाचित होऊनही गेला असेल माहित नाही. घरी येताना दारातच ती sanitize होऊन आत यायची आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये अंघोळीला जायची. 

तिच्या ज्या सहकारी डॉक्टरांना कोरोना झाला त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले , कोणाही नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नव्हती. खरे म्हणजे मानसिक दृष्ट्या हा काळ कसोटीचा असतो. आणि मला वाटते कि खंबीर मन (विलपॉवर ) आणि सक्षम रोग प्रतिकारक शक्ती यावर तुमची रिकव्हरी अवलंबून आहे. कारण या आजाराला काही उपचारच नाही. 

असो , डॉक्टरांचा परिवार म्हणून आम्हाला काही सामाजिक त्रास झाला नाही हे मुद्दामून नमूद करावेसे वाटते. अनेकांना वाईट अनुभव आला पण आम्हाला नाही. सुरुवातीला आम्हाला पण कोरोनाची भीती वाटायची. पण नंतर आम्ही नवराबायकोने व्यायाम करून शरीर सुदृढ बनवण्याकडे जास्त लक्ष दिले. कामवाली नसल्यामुळे सर्व घराची कामे स्वतःच करायला लागलो. कौटुंबिक संवाद सुधारला. एकमेकांबरोबर वेळ मिळाला. खरे म्हणजे घरातील कामे माझ्या आईने न तक्रार करता केली. कारण तिच्यावर घराचा बराचसा भार होता. त्यामुळेच पत्नी हॉस्पिटलमध्ये निर्धास्तपणे काम करू शकली.

आणि महत्वाचे म्हणजे टीव्ही वरील बातम्या बघणे बंद केले. त्यामुळे मानसिक दृष्ट्या पण सुदृढ झालो. खरे म्हणजे भारतीय न्यूज चॅनेल बघणे सर्वानीच बंद करायला हवे. हे लोक माहिती कमी देतात आणि जास्त घाबरवतात. न्यूज बघितल्यावर असे वाटायचे आत्त्ता कोरोना माझ्या घशात शिरतोय कि काय. 

पत्नीच्या काही सहकारी डॉक्टर / त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला पण सर्वजण सुखरूप बरे झाले. काही ओळखीच्या खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू झाला ते खूपच धक्कादायक आणि वाईट होते. कोणीही काहीही म्हटले तरी सर्वच डॉक्टरांनी / रुग्णालय कर्मचाऱ्यांनी ना घाबरता , धीराने या आजाराची तमा ना बाळगता सेवा दिली. यात काही त्रुटी राहिल्या असतील पण आपल्याकडे लोकसंख्या व डॉक्टर यांचे प्रमाण एवढे विषम आहे कि काही खरे नाही. शिवाय आरोग्य /शिक्षण क्षेत्राकडे देशाचे खूप दुर्लक्षच आहे. आपल्या दृष्टीने अचिव्हमेंट्स म्हणजे आकाशात उपग्रह सोडणे , गरीब शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करून MIDC / एक्सप्रेस वे बांधणे यासाठीची झाडांची बेसुमार कत्तल करणे , मोठी मोठी स्मारके , मंदिरे बांधणे. या गोष्टी आवश्यक आहेत पण किती प्रायॉरीटी द्यायची ?

शिवाय हॉस्पिटलची सेवा हा प्रशासकीय व धोरणात्मक नियोजनाचा भाग आहे. एखादे शासकीय रुग्णालय जर चांगली सेवा देऊ शकत नसेल किंवा डॉक्टर overburdened असेल तर मग त्या हजर असलेल्या व विपरीत परिस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टरला शिवीगाळ करणे , मारहाण करणे याला काही अर्थ नाही.         

अनेक न्यूज चॅनेल्स / राजकारणी / आमदार / खासदार / नगरसेवक  यांनी हॉस्पिटल्सवर खूप टीका केली. विडिओ शूटिंग करून एखादी त्रुटी असेल तर तिचे जाहीर प्रदर्शन केले. जनतेला थाळ्या वाजवायला , टाळ्या पिटायला , रात्री लाईट बंद करून दिवे लावायला सांगितले. टीव्ही वर सांगितले कि उन्हाळा सुरु झाला कि उन्हात कोरोना टिकणार नाही. त्यामुळे भारताला धोका नाही. काही ज्योतिषी बोलले कि अमक्या दिवशी , हि ग्रहांची युती होतेय मग कोरोना जाणार. कोणी बोलले कि सर्वानी एकत्र टाळ्या वाजवल्या तर साऊंड एनर्जी ने कोरोना पळून जाईल किंवा एकत्र दिवे लावले तर लाइट एनर्जी ने  कोरोना पळून जाईल. कोरोनाने सर्वाना खोटे ठरवले. देवस्थान बंद केले. देवाच्या नावावर चालणार बाजार बंद केला. मृत्यूनंतरचे बारावे तेरावे बंद केले. कोणाचाही आत्मा अतृप्तपणे भटकला नाही.

आपले डॉक्टर , नर्सिंग स्टाफ, पोलीस , राशन कर्मचारी , गाड्यांचे चालक , महापालिका , शासकीय कर्मचारी यांनी मात्र अहोरात्र काम केले व अजूनही करत आहेत. खरे म्हणजे अनेक लोक प्रतिनिधींनीही अहोरात्र काम केले. अनेक आमदार , मंत्री यांनाही कोरोना झाला. न्यूज चॅनेल व इतर पत्रकार धोका असूनही सर्वत्र फिरले , बातम्या कव्हर केल्या. आता त्या बातम्या दाखवायची पद्धतच चुकीची आहे त्याला ते काय करणार. कोणीही मागे हटले नाही. छोटे मोठे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, वैयक्तिक कार्यकर्ते अनेक अनामिक जणांनी बिनधास्त मदत केली.

अमेरिका , युरोप सारख्या प्रगत देशात उत्कृष्ट आरोग्य व्यवस्था असतानाही तिथे लाखो लोक मृत्युमुखी पडले , हे दुर्दैवी आहे. पण भारतासारख्या देशाने मात्र कमी सुविधा असताना या महासंकटाचा चांगला सामना केला. यात नागरिकांनीही खूप संयम बाळगला. कारण आपण मुळातच लढवय्ये आहोत , सहज सहजी आपण हरत नाही. आपण हरतो ते फक्त आपल्यातील दुफाळीमुळे.

मागे एकदा दिवे घाटामध्ये माऊलीच्या पालखी बरोबर चालल्याचा योग आला होता. तेव्हा देव देवळात नाही पण या वारकऱ्यांमध्ये आहे हे जाणवले. कोरोना आजाराच्या वेळी देव हा परत डॉक्टर , नर्सिंग स्टाफ, पोलीस , राशन कर्मचारी , गाड्यांचे चालक , महापालिका , शासकीय कर्मचारी यांच्या व अनेक अनामिकांच्या रूपात आपल्या संरक्षणार्थ उभा राहिला.

आज माझी पत्नी , तिच्या हॉस्पिटलमधील तिचे सर्व वरिष्ठ , कनिष्ठ डॉक्टर , सर्व स्टाफ , वॉर्डबॉय वगैरे या सर्वांचे खूप खूप आभार. आज यांच्यासारख्या देशभर , जगभर काम करणाऱ्या असंख्य अनामिक देवांचे खूप खूप आभार. आणि हो , सर्व चिल्ली-पिल्ली , लहान मुले गेले तीन महिने तक्रार ना करता घरातच बसली आहेत , त्यांचे तर खरेच कौतुक आहे. त्यांनी देखील जोरदार साथ दिली. अर्थात संकट अजून टाळले नाही. अजून काय होईल हे सांगता येत नाही , पण तूर्तास तरी आपण कोरोनाला बऱ्यापैकी थांबवले आहे हे निश्चित.

यातून बोध घेऊन आपण आरोग्यसेवेकडे अधिक लक्ष देऊ अशी अपेक्षा आहे. मुंबई महानगर पालिका जगातील एकमेव पालिका आहे जिचे स्वतःचे मेडिकल कॉलेज आहे आणि त्यातून जागतिक दर्जाचे डॉक्टर तयार होतात. त्यामुळे मुंबई मनपा ला सॅल्यूट. कोणत्याही वैद्यकीय / शासकीय यंत्रणेमध्ये त्रुटी दाखवून प्रदर्शन करणाऱ्या सर्व न्यूज चॅनेल / राजकीय नेते याना सुबुद्धी प्राप्त होवो अशी अशा बाळगूया. आणि यात सुधारणा करण्यासाठी त्यांच्याकडेच असलेल्या अधिकाराचा ते वापर करतील हि अपेक्षा.

सर्व डॉक्टरांना आणि वैद्यकीय व्यवस्थेला आणि आपण सर्वानाच मानाचा मुजरा.

विशाल फुलपगार
२६ जून २०२०

Thursday, June 18, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ मूर्तीचे जयपूर वरून गाणगापूर आश्रम मध्ये आगमन 7 एप्रिल 2010


प्रत्येक फोटोमागे एक कहाणी असते, खुपश्या आठवणी असतात. एकदा कॉम्पुटरमध्ये काहीतरी शोधत असताना श्रीपाद श्रीवल्लभ यांची मार्बलची मूर्ती गाणगापूर आश्रम मध्ये आली त्याचे फोटो मिळाले आणि जुन्या सर्व आठवणी जागृत झाल्या. कदाचित नुसतेच फोटो दाखवले असते तर त्यामागची कहाणी कळणार नाही , म्हणून अत्यंत रोमहर्षक प्रवासाची हि घटना शब्दांकित करावी असे मनात आले. 

असो , ऑफिसच्या कामाने माझे भारतभर भ्रमण होत असे. राजस्थानमध्ये २०१० साली काही प्रोजेक्ट चे टेंडर भरले होते व त्या दृष्टीने जयपूर ला RUIDP (Rajasthan Urban Infrastructure Development Corporation) या राज्य सरकारी ऑफिस मध्ये २ वेळा जाऊन आलो. ऑफिसचे दौरे असल्यावर गाढवासारखे काम करावे लागते. सकाळी लवकर दिवस सुरु होतो. मग प्रोजेक्ट साईट व्हिजिट करणे , इंजिनिअरसोबत चर्चा करणे, प्रोजेक्ट समजावून घेणे, मुंबईमध्ये माझ्या ऑफिस बरोबर कोऑर्डिनेट करणे, रिपोर्ट पाठवणे, स्ट्रॅटेजी बनवणे, या कामात दम आहे का? स्थानिक काय issue आहेत? आपल्याला इथे काम करता येईल का? अश्या बऱ्याच प्रश्नाची उत्तर शोधणे चालू असते. माझ्या फीडबॅक वर कंपनी टेंडर भरायचे कि नाही हा निर्णय घ्यायची किंवा बऱ्याच वेळा मीच याबाबत ठरवायचो. खरे म्हणजे यात विशेष काहीच नाही. It was my job. सर्वच कंपनीमध्ये अशीच पद्धत असते ,पण मी स्वतःचे थोडे कौतुक करून घेतले. 
 
राजस्थानमधील बारमेर, सीकर, नागौर या ठिकाणी Sewage Treatment Plant चे तीन टेंडर होते व तिघांची मिळून किंमत अंदाजे १२५ करोड होती. कंपनीच्या दृष्टीने हि ऑर्डर खूप मोठी व महत्वाची होती. त्यामुळे काम मिळवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती व जर काम मिळाले तर ते करायला आमची प्रोजेक्टची टीम येणार होती. एकदा रात्री जयपूरला मुक्काम करण्याचा प्रसंग आला, मग काम आटोपल्यावर तिथून कारने अजमेर शरीफ दर्गा व ब्रह्मदेवाचे मंदिर बघून आलो. जयपूरपासून अंदाजे १४० कि मी अंतर पण रस्ता छान असल्यामुळे काही प्रवास सुखद आणि on duty  झाला. बरोबर स्थानिक liasoning चा माणूस होताच, त्यामुळे काहीही अडचण नव्हती. जयपूरमध्ये मी लक्ष्मी मिष्ठान्न भांडार (LMB) या जुन्या व प्रसिद्ध हॉटेलमध्ये राहायचो. याचे महत्वाचे कारण म्हणजे जेवण शुद्ध शाकाहारी आणि खूप चविष्ट. या शिवाय हे हॉटेल जुन्या जयपूरमध्ये मुख्य बाजारपेठेत होते. 

असो , गुरुजींशी बोलताना ते एकदा म्हणाले कि जयपूरला संगमरवरी मूर्ती खूप छान व स्वस्त मिळतात तू कधी वेळ मिळाला तर बघून ये. पुढच्या जयपूर दौऱ्यात मी त्या मार्बल मार्केटमधील एका मूर्तिकाराकडे ओळखीने गेलो. व त्याला म्हटले कि मला १ फूट उंचीची श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती मार्बलमध्ये बनवून दे. त्याने अनेक मूर्ती बनवल्या होत्या पण श्रीपादांची मूर्ती कधीच बनवली नव्हती. त्याने माझ्याकडे फोटो मागितला. मी त्याला म्हटले कि तुला २-३ फोटो ई-मेल ने पाठवतॊ (त्यावेळी व्हाट्सएप नव्हते ) व माझ्याजवळील छोटा फोटो दाखवला. त्याने मागितलेले सर्व पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले व महिन्याभरात मूर्ती बनवतो असे तो म्हणाला. त्याप्रमाणे मुंबईला जाऊन २-३ फोटो ई-मेल केले. अंदाजे फेब्रुवारी २०१० ची हि गोष्ट असावी. 

तीनही टेंडरचे काम चालू होते व ते तिन्ही टेंडर आम्ही भरले. ६ एप्रिल २०१० ला सकाळी ११ वाजता याचे price bid  ओपनिंग होते. या साठी मी जाणार होतो. खरे म्हणजे मी ठरवले होते की मूर्ती घेऊन मुंबईला गुरुजींना दयायची मग ते गाणगापूरला घेऊन जातील. परंतु त्या दरम्यान गुरुजी गाणगापूरला होते म्हणजे मूर्ती आणली तर ती मुंबईला ठेवावी लागणार व गाणगापूरला कोण व कधी नेणार हा प्रश्नच होता. मग मी असा निर्णय घेतला की  मीच मूर्ती घेऊन गाणगापूरला जाईन. जयपुरवरून गाणगापूरला जाण्याचे विविध पर्याय बघता जयपूर ते मुंबई विमान, मग मुंबई ते गाणगापूर हुसेनसागर ट्रेन व येताना मात्र ट्रेनने परत मुंबईला यायचे हाच पर्याय होता. माझा मुलगा तेव्हा दीड वर्षाचा होता व आम्ही तिघे तेव्हा भाभा हॉस्पिटल, बांद्रा, मुंबई येथील कर्मचारी निवास स्थानात राहत होतो व आई वडील जवळच खारला राहत होते. 

सोलापूर ते  मुंबई हि विमानसेवा तेव्हा नुकतीच सुरु झाली होती. म्हणजे त्याने एक तासात मुंबई ला सोलापुरवरून पोहोचणार. पण ती सोलापूरहून दुपारी २ वाजता सुटायची म्हणजे १ वाजता सोलापूर विमानतळावर पोहोचायचे, म्हणजे सकाळी १० वाजता गाणगापुरवरून निघायचे असे ठरवले. एकंदरीत हा प्रवास किती रोमहर्षक व मिनिट ते मिनिट तणावाचा होणार हे नक्कीच. पण जेव्हा युनिव्हर्स तुम्हाला सपोर्ट करते तेव्हा गोष्टी कित्ती सहजपणे घडून येतात हे मला नंतर कळले व तुम्हालाही कळेल. 

६ एप्रिल २०१० ला सकाळी ७च्या विमानाने जयपूर ला जायचे व ११ वाजताची RUIDP ,जयपूर ला pricebid ओपनिंगला हजर राहायचे . जर टेंडर मिळाले तर अधिकाऱ्यांशी चर्चा , कोणी subcontractor मिळाले तर त्याला  भेटणे, मूर्तीवाल्याकडून मूर्ती घ्यायची, मग ५ वाजताच्या विमानाने जयपूर वरून निघायचे, संध्याकाळी ७ वाजता मुंबई, तिथून डायरेक्ट CST स्टेशनला जाऊन हुसेनसागर हि रात्री ९. ५० ची ट्रेन पकडायची व दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता गाणगापूर स्टेशनला पोहोचायचे, गाणगापूर स्टेशन वरून गाडीने आश्रमात जायचे, तिथे गुरुजींना ती मूर्ती दयायची व सकाळी १० वाजता गाणगापूरवरून निघून दुपारी १ वाजेपर्यंत सोलापूर एअरपोर्ट , तिथून २ च्या विमानाने ३ वाजता मुंबईमध्ये यायचे व दुपारी ४ वाजता घरी पोहोचायचे असा कागदोपत्री व्यवस्थित वाटणारा व अजिबात प्रॅक्टिकल नसणारा प्रोग्राम मी बनवला व सर्व बुकिंग केल्या. सोलापूर मुंबई विमानाची तिकीट काढली हुसेनसागर ट्रेन ची तिकीट काढली. ऑफिसला सांगितले कि मी जयपूरमध्ये एक रात्र मुक्काम करून दुसऱ्या दिवशी येणार आहे. म्हणजे सुट्टी घ्यायची आवश्यकता नाही. खरी गम्मत तर पुढे होती. कश्या अडचणी निर्माण होतात व कसा मार्ग निघतो हि मी अनुभव घेतला. 

जयपूरला जाण्याआधी २/३ दिवस बायकोला खूप ताप होता त्यामुळे ती कामाला गेली नाही. व मला म्हटली की कदाचित तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागेल तेव्हा तू जाऊ नकोस. मी सांगितले कि हे टेंडर खूप महत्वाचे असून मला जावेच लागेल. तुला जर जास्तच झाले तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन जा मी ६ एप्रिलला सकाळी जाऊन ७ एप्रिल ला संध्याकाळी ४ वाजेपर्यंत येतोच. 

ठरल्याप्रमाणे ६ एप्रिल २०१० ला सकाळी ७च्या विमानाने मी जयपूरला निघालो व ८. ३० ला जयपूर ला पोहोचलो. सर्वप्रथम मूर्तीकाराला फोन केला तो म्हणाला कि थोडा पेंटिंग बाकी है वो दोपहर १ बजेतक हो जायेगा, आप चिंता मत करो. एयरपोर्ट  घ्यायला आमचा लोकल माणूस आलाच होता. नाश्ता करून आम्ही सकाळी १०ला RUIDP च्या ऑफिसला पोहोचलो. माझ्याप्रमाणे अजून ३ कंपन्यांचे प्रतिनिधी आले होते. बरोबर ११ वाजता सर्वासमक्ष सर्वांचे pricebid ओपन केले. त्यात माझी कंपनी lowest ठरल्यामुळे आम्हाला ते टेंडर मिळाले. खूप आनंद झाला. संबंधित अधिकारी आणि इंजिनिअरला भेटलो. असे करता करता दुपारचे १. ३० वाजले. मग आम्ही डायरेक्ट मूर्तीकाराकडे गेलो. रंग अजून सुकला नव्हता त्यामुळे त्याने अजून थांबायला सांगितले. त्याने त्याच्या स्किल प्रमाणे मूर्ती बनवली होती. जेवून परत आलो व मग मूर्तीचे पॅकिंग केले. आणि जयपूर एअरपोर्टला मी आलो. खरी गम्मत पुढेच होती. कारण विमान वेळेत सुटले पाहिजे . मुंबईमध्ये वेळेत पोहोचले पाहिजे, कारण संध्याकाळी ६ ते ८ मध्ये मुंबई ला उतरणारी विमाने खूप.  ट्रॅफिक मुळे हमखास लेट असतात. मग विलेपार्ले विमानतळावरून टॅक्सीने CST स्टेशनला जायचे म्हटले तर ट्रॅफिकमध्ये अडकल्याची भीती मग त्यापेक्षा विले पार्ले स्टेशनवरून हार्बर ट्रेन ने CST स्टेशनला जाणे योग्य. पण सर्व काही अनिश्चित. 

मूर्तीचे वजन जास्त होते पण एअरपोर्टच्या काउंटरला सांगितले की आतमध्ये मूर्ती आहे मग त्यांनी केबिन बॅग म्हणून नेण्याची परवानगी दिली. विमान संध्याकाळी ५. ३० ला म्हणजे अर्धा तास उशिरा सुटले. घरी फोनवर संपर्क होताच.  बायकोचा ताप उतरत नव्हता आणि आज रात्री जर ताप उतरला नाही तर मात्र उदया सकाळी तिला बांद्रा येथील होली फॅमिली हॉस्पिटलला ऍडमिट करायचे ठरले.

अंदाजे संध्याकाळी ७:०५ ला मी मुंबई विमानतळावर उतरलो व रिक्षा पकडून विलेपार्ले स्टेशनला आलो. फर्स्ट क्लासचे तिकीट काढले आणि ८. २० च्या हार्बर ट्रेन ने अंदाजे रात्री ९ वाजून १० मिनिटांनी CST स्टेशन ला उतरलो व चालत चालत अंदाजे रात्री ९. ३० ला हुसेनसागर ट्रेनच्या माझ्या डब्यात सेकंड AC मध्ये बसलो. ट्रेन नुकतीच आली होती. 

CST रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे अधिकारी श्री. संजय पाटील हे आमचे जवळचे मित्र आणि पाठक गुरुजींवर यांचे खूप प्रेम (संजय पाटील या नावाचे माझे दोन जवळचे मित्र आहेत). मग गुरुजी जेव्हा केव्हा गाणगापूरला CST वरून जायचे तेव्हा CST रेल्वे पोलीस स्टेशनचे बरेचसे पोलीस गुरुजींना भेटायला संजय पाटीलबरोबर ट्रेन मध्ये यायचे. एवढे पोलीस आल्यामुळे सहप्रवाशांना पण कळायचे की पाठक गुरुजी कोणीतरी VIP आहेत. गुरुजींना बिस्लेरीच्या बाटल्या ते प्रवासासाठी ते द्यायचे. हि पाठक गुरुजींची सेवा CST रेल्वे पोलीस स्टेशन ने शेवटपर्यंत न सांगता केली. 





तर मी रात्री ९. ३० ला ट्रेन मध्ये बसलो आणि रात्री ९. ५० ला ट्रेन सुटणार होती. हातात सामान असल्यामुळे आणि tight schedule असल्यामुळे काही खायला घेऊ शकलो नाही. ट्रेनमध्ये काही मिळाले तर खाऊ असा विचार केला. गुरुजींना फोन करून सांगितले की ट्रेनमध्ये बसलो आहे, उदया येतो. अचानक दोन पोलीस माझ्या जागेवर आले आणि त्यांनी मला वेज बिर्याणी, फ्रुटी, पाण्याच्या बाटल्या दिल्या व पाटीलसाहेबानी पाठवले आहे असे ते म्हणाले व नमस्कार करून गेले. मी लगेचच संजय पाटील याना फोन लावला. ते हसले आणि म्हणाले की मित्रा थोडी सेवा आमचीपण होऊ द्या. मी म्हणालो अरे तुला कसे कळले की मी काही खाल्ले नाही. ते म्हणाले अरे आम्ही पोलीस आहोत आमचा अंदाज सहसा चुकत नाही , मला तुझा प्रोग्रॅम आधीच माहित होता. २/३ दिवसापूर्वी त्याने माझा बोगी नंबर आणि सीट नंबर का विचारला ते मला आत्ता कळले. त्याला थँक यु म्हणून त्याच्या तोंडून भ ची बाराखडी मला ऐकायची नव्हती. त्यामुळे त्याला मी काही बोललो नाही.  गुरुजींना सांगितले कि मला गाणगापूर स्टेशनला घ्यायला येणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरचा नंबर पाठवा व त्याच गाडीने मी सोलापूर एअरपोर्टला जाईन. आणि सकाळी १० वाजता आश्रमातून मला निघायलाच लागेल. गुरुजी म्हटले की चिंता करून नकोस. त्यांनी काय व्यवस्था केली होती ते मला नंतर कळले. 

आत्ता पुढची कसरत म्हणजे हि ट्रेन गाणगापूर स्टेशनला सकाळी ७ वाजता पोहोचते पण अनेकदा अर्धा तास तरी उशिरा असते. माझ्या दृष्टीने हा अर्धा तास पण महत्त्वाचाच होता. म्हणजे ट्रेन वेळेतच पोहोचली पाहिजे. भूक खूप लागल्यामुळे मी मस्त जेवलो व झोपलो , म्हणजे पाठ टेकली. विमानांप्रमाणे ट्रेनमध्ये सुद्धा माझे पाय मावत नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या अँगल मध्ये झोपण्याचा प्रयत्न करत रात्र काढली. 

सोलापूर आल्यावर मी उठलोच व गाणगापूर यायची वाट बघू लागलो. पाठक गुरुजींना फोन केला व त्यांना सांगितले, ट्रेन वेळेत आहे तुम्ही गाडीच्या ड्रायव्हरचा नंबर पाठवा, गुरुजी म्हणाले तू चिंता करू नकोस. ड्रायव्हर तुझ्या डब्याजवळ बरोबर येईल. आयला म्हटले हे नंबर का देत नाहीत. आधीच वेळ कमी आणि आमची चुकामुक झाली तर अजून वेळ जायचा. तिथे घरी बायकोचा ताप कमी होत नव्हता म्हणजे आज नक्कीच ऍडमिट करावे लागणार ते एक वेगळेच टेन्शन. बरोबर ७ वाजून ५ मिनिटांनी म्हणजे वेळेतच ट्रेन गाणगापूर स्टेशनला आली. मी दारातच होतो. कोण घ्यायला येत आहे ते गुरुजींनी सांगितले नाही. ड्रायव्हरचा नंबर दिला नाही. त्यामुळे त्याला ओळखायचे कसे ते कळेना. ट्रेन थांबली आणि समोरच गुरुजी दिसले. मला जोरदार धक्का बसला. खूप आनंदपण झाला.  गुरुजींच्या कपाळावर गंध होते म्हणजे ते सकाळीच स्नान करून आले होते. 
गुरुजीं गाणगापूर स्टेशनला मला घ्यायला आले मी ट्रेनमधून फोटो काढला 

ट्रेन मधून उतरून गुरुजींच्या पाया पडलो. उन्मेशची गळाभेट घेतली. गुरुजींच्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडून जात होता. वास्तविक ते महाराजांच्या मूर्तीला recieve करायला आले होते. तरीपण येवढ्या सकाळी त्यांनी एवढा त्रास करून यायची आवश्यकता नव्हती. गुरुजींच्या प्रत्येक कृतीत त्यांच्या बद्दलचा आदरभाव वाढत असे , हि त्यापैकी एक घटना. गुरुजी म्हणाले की तुम्ही एवढ्या लांबून श्रीपाद महाराजांना घेऊन आलात मग मी स्टेशनला आलो तर बिघडले कुठे? रस्त्यात आम्ही खूप गप्पा मारल्या. त्यांना सगळा प्रवास सांगितला. मुंबईला बायकोची परिस्थिती सांगितली. गुरुजी म्हटले, काळजी करू नकोस. आत्ता मला टाइम मॅनॅजमेण्ट करायचे नव्हते ती सूत्रे पाठकगुरुजींकडे होती. सकाळी दहा वाजता गाणगापुरवरून सोलापूर विमानतळाकडे निघायचे मी ठरवले होते गुरुजींनी सांगितले सकाळी ९. ४५ ला निघायचे. 

४० मिनिटात, म्हणजे अंदाजे सकाळी ८ वाजता आम्ही आश्रमात पोहोचलो. मूर्ती माझ्या हातातच होती. 
 मूर्ती  आश्रमात आणतानाचा फोटो 

मूर्तीचा मान सन्मान झाला. औदुंबराजवळ मूर्ती ठेवून तिची पूजा केली. अत्यंत सन्मानाने व विधिपूर्वक हि मूर्ती म्हणजे श्रीपाद महाराज आश्रमात आले. एवढा मोठा कार्यक्रम होईल असे मला वाटले नव्हते मला वाटले की मला फक्त डिलिव्हरी करायची आहे. 
पाठक गुरुजीसोबत आश्रमाच्या दरवाज्यात 

आश्रमाच्या दरवाज्यात 

मला उगीचच मान मिळाला 


गुरुजींनी मूर्ती हातात घेतली 

औदुंबराजवळ मूर्तीची पूजा केली. तेव्हा आश्रमाची कंपाऊंड वॉल नव्हती. 

महाराज स्थानापन्न झाले 


आश्रमात महाराजांच्या स्वागतासाठी रांगोळी 

महाराज त्यांच्या पूर्ण टीम सोबत 
आश्रमात ताबडतोब मी अंघोळीला गेलो आणि नंतर गुरुजींनी मला मंदिरात पाठवले. आज गर्दी कमी असल्यामुळे लगेचच दर्शन झाले. पुन्हा आश्रमात आलो नाश्ता केला. मुंबई ला घरी फोन करून सांगितले कि दुपारी ४ पर्यंत येतो. बायकोचा ताप उतरत नव्हता पण ती म्हणाली, तू जयपूरहून संध्याकाळी आल्यावर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊया. तिच्या दृष्टीने मी जयपूरलाच होतो. जर तिला कळले असते की मी गाणगापूरला गेलोय तर तिचा विश्वासच बसला नसता किंवा तिने मला मुंबईला आल्यावर एका क्षणात सर्व देव दाखवले असते. 

नाश्ता करेपर्यंत मला सोलापूरला न्यायला सुमो गाडी आली होती. आत्ता पटपट सोलापूरला पोहोचणे व तिथून विमान पकडणे महत्वाचे. ठरल्या वेळेप्रमाणे सकाळी ९. ४५ ला मी गाडीत पुढे बसलो. तर मागे गुरुजी, उन्मेष आणि गुरुजींचे भाऊ प्रभुकाका पण बसले व म्हणाले की आम्ही तुला सोडायला सोलापूर विमानतळावर  येतो. त्यावर मी म्हणालो कि, असे करून नकॊ मला सवय आहे. का तुम्ही एवढा प्रवास करताय. ३ तास oneway म्हणजे ६ तास प्रवास कशाला करताय ? पण गुरुजींनी काही ऐकले नाही. मग आम्ही आधी कल्लेश्वर मंदिरात गेलो. तिथून गाणगापूर संगमावर गेलो व तिथून सोलापूर दिशेने प्रवास सुरु (गाणगापूर निर्गुण पादुका मंदिर , कल्लेश्वर आणि संगम या तीन ठिकाणी दर्शन घेतले म्हणजे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात.) ऑफिसचे फोन चालूच होते, ऑफिस च्या दृष्टीने मी जयपूर ला होतो. रस्ता खराब असल्यामुळे विशेष वेग नव्हता, पण आम्ही वेळेत होतो. अक्कलकोट रस्त्यातच असल्यामुळे तिथे थांबून दर्शन घेतले. खाण्यासाठी जेवणाचा डबा मला गुरुजींनी आश्रमातूनच दिला होता, त्यामुळे दुपारच्या जेवणाची सोय झाली होती. गाडीतच आम्ही जेवण केले.  बरोबर १ वाजता आम्ही सोलापूर एअरपोर्टला पोहोचलो. हे एक अत्यंत  छोटे एअरपोर्ट होते. विमान अजून आले नव्हते त्यामुळे आम्ही बाहेर गप्पा मारत उभे राहिलो. गुरुजींबरोबर कितीही बोललो तरी विषय काही संपायचे नाहीत आणि  गप्पा जास्तच रंगायच्या. दुपारी १. २० ला विमान आले मग मी विमानतळाच्या आतमध्ये गेलो.  
सोलापूर एअर पोर्ट वर मी , उन्मेष पाटील, पाठकगुरुजी , प्रभुकाका 
एवढा लांबचा आणि वेडा वाकडा प्रवास tight schedule मध्ये केल्यामुळे गुरुजी खूपच खुश होते. आणि म्हणूनच ते गाणगापूर स्टेशनपासून सोलापूर एअरपोर्ट पर्यंत माझ्याबरोबर होते. वास्तविक पाहता त्यांनी असे करण्याची गरज आणि अपेक्षा नव्हती व कदाचित मी त्यांच्या जागी असतो तरी मी असे केले नसते पण पाठक गुरुजींची गोष्टच वेगळी. त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. मोठी माणसे खरोखरच खूप मोठीं असतात. श्रीपाद महाराजांची मार्बलची मूर्ती , माझा विचित्र प्रवास हा इतका महत्वाचा नाही पण यातून शेवटी जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे. खूप मज्जा आली. 

असो, विमान बरोबर दुपारी २ वाजता उडाले व दुपारी ३ वाजता मुंबईला उतरलो . घरी फोन केला. ऑफिसला फोन करून सांगितले कि आत्ताच जयपुरवरून मुंबईला पोहोचलो. उद्या ऑफिसला येईन. गुरुजींना फोन केला , त्यांना आश्रमात पोहोचायला अजून वेळ होता. म्हणजे ते सोलापुरवरून गाणगापूरला पोहोचायच्या आधी मी मुंबई ला पोहोचलो. त्यांना सांगितले कि महाराजांचे स्वतःचे काम होते म्हणून ट्रेन, विमान कुठेच लेट झाले नाही. आमचे काम असते तेव्हा काहीच वेळेत होत नाही. ते हसले.   संध्याकाळी ४. १५ मिनिटांनी मी घरी आलो. बायको,  आई, सासू आणि बायकोच्या काही डॉक्टर स्टुडन्ट घरी होत्या. मी सामान ठेवले आणि ताबडतोब बायकोला होली फॅमिली हॉस्पिटल, बांद्रा मध्ये ऍडमिट केले.

सर्व प्रवास माझ्याकडून यंत्रवत झाला. माझ्याने एवढे शक्य नव्हते पण युनिव्हर्सने ठरवले आणि मला प्रत्येक ठिकाणी मदत झाली. कुठेही उशीर झाला नाही. एवढे करूनही माझ्यावरच्या सर्व जबाबदाऱ्या म्हणजे व्यावहारिक - ऑफिसच्या , अध्यात्मिक - गाणगापूर व सांसारिक - बायकोला ऍडमिट करणे हे सर्व माझ्याकडून पूर्ण झाल्या. मुंबई - जयपूर - मुंबई - गाणगापूर - अक्कलकोट - सोलापूर - मुंबई  हा ३४ तासाचा प्रवास मी विमान, रिक्षा, ट्रेन, कारने अविश्वासनीयरित्या पूर्ण करू शकलो आणि महत्त्वाचे म्हणजे कमी वेळ असूनही खुपसा वेळ मी पाठक गुरुजींबरोबर होतो. आयुष्यात लक्षात राहिलेल्या काही ठळक घटनांपैकी हि घटना. 


विशाल फुलपगार 
१८ जुन २०२०

दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 

https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s






  












Sunday, June 14, 2020

पाठकगुरुजी - व्यक्तिविशेष

१४ जुन २०२०

दत्तलिन श्री. जगन्नाथ चिंतामण पाठक (पाठकगुरुजी / अण्णा) (३ नोव्हेंबर १९२८ ते २० ऑगस्ट २०१४) यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. मला त्यांच्याबरोबर वावरण्याची संधी (१९९६ ते २० ऑगस्ट २०१४) मिळाली आणि त्या कालावधीत माझ्या दृष्टीने त्यांचे भौतिक व अध्यात्मिक जीवन व त्यातील काही गोष्टी शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न करतो. 


आधीची दोन मुले अल्पावधीतच देवाघरी गेली म्हणून पाठकगुरुजींच्या आईने एरंडोल च्या कागदीपुरा येथील दत्तमहाराजांकडे पुत्रप्राप्तीसाठी नवस केला व जळगाव जिल्ह्यातील कासोदा या गावी पाठकगुरुजींचा जन्म झाला (3 नोव्हेंबर 1928) सर्वसाधारण मुलाप्रमाणे पाठकगुरुजी लहानपणी (लहानपणी काय शेवटपर्यंत) वैयक्तिक जीवनात मस्तीखोर आणि खोडकर होते. त्यांच्या बालपणीचे काही किस्से त्यांच्यावरील "जगन्मित्र " या पुस्तकात आले आहेत , त्यामुळे त्याचा उल्लेख टाळतो . गुरुजींना मी जेव्हा पहिल्यांदा बघितले तेव्हाच ते खूप हॅंडसम होते , मग बालपणी / तरुणपणी ते किती हॅंडसम असतील ?. मी त्यांना विचारायचो कि तुम्ही तुमच्या तरुणपणी मुलींना कसे इंप्रेस करायचा? म्हणजे त्यावेळी तरुण मुले कशी वागायची ? त्यांनी सांगितले आमच्या वेळी सर्वाना समान आणि सन्मानाची वागणूक होती. गावात सर्वजण एकमेकांना चांगलेच ओळखत त्यामुळे संपूर्ण गाव हे कुटुंबासारखेच होते. शिवाय आई वडिलांचा , वडीलधारी व्यक्तींचा खूप धाक होता. त्यामुळे मुलींना इंप्रेस करणे हा कधी विचारच यायचा नाही आणि असा ऑपशन पण नव्हता. परंतु मुले खूप व्यायाम करायची व शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मुले हातावर शिर्षासन पद्धतीने चालायची. 

गुरुजींचे वडील त्यावेळी सर्वाधिक दंड बैठक मारायचे व मारुतीची एक छोटी मूर्ती त्यांना बक्षिसे म्हणून मिळाली होती. त्यानंतर गुरुजींच्या पिढीत गुरुजी , मला वाटते ५०० दंड व ५०० बैठक एका दमात मारायचे व बक्षिसे त्यांना मिळायचे. शेवटपर्यंत नियमित व्यायाम , योगासने , प्राणायाम गुरुजी करत असत. त्यामुळे त्यांचे शरीर पिळदार व स्टॅमिना प्रचंड होता. त्यांचे रिफ्लेक्स खूपच quick होते. ते कधीच थकायचे किंवा कंटाळायचे नाही. नजर व स्मरणशक्ती शेवटपर्यंत अतिशय तीक्ष्ण होती. त्यांच्या माहीम मुक्तिधाम सोसायटी मध्ये त्यांचे घर ५व्या मजल्यावर होते. व दिवसातून अनेकदा ते ५ मजले न थांबता , न थकता आणि न कंटाळता चढ उतरायचे  . त्यांची चालण्याची पद्धत अत्यंत जलद होती. पोलीस खात्यात नोकरीत असताना ते गिरनार ला गेले असताना तिथेच त्यांनी पादत्राणे घालायचे सोडले आणि अखेरपर्यंत ते अनवाणीच वावरले. फक्त भारतभर नव्हे तर दुबई , इंग्लंड , अमेरिका या देशातंपण ते अनवाणीच फिरले परंतु याचा त्यांनी गाजावाजा केला नाही.
गुरुजी अमेरिकेत
अमेरिकेत पूजा सांगताना गुरुजी 
अनवाणी चालूनदेखील त्यांच्या गतीने चालायला आपली दमछाक व्हायची. जेवण लिमिटेड होते व ते जगण्यासाठी खायचे, आपण खाण्यासाठी जगतो. ते फक्त २ तास रात्री झोपायचे आणि पहाटे २. ३० ला उठून बसायचे कारण गाणगापूरला त्यावेळी आरती होते. शेवटची अनेक वर्ष ते दिवसातून एकदाच जेवायचे. एवढे असूनसुद्धा त्यांच्यात ताकद / शक्ती खूप होती. एकंदरीत त्यांनी शरीराची उत्तम निगा राखली होती. त्यांना विशेष आजार नव्हता , थोडा दम्याचा त्रास होता. आणि अर्थात नॉर्मल सर्दी ,खोकला ,ताप असायचा पण गंभीर काहीच नाही. He was healthy person. आजारपण आणि हॉस्पिटलबरोबर T २० मॅच ते शेवटचे ८ महिन्यातच खेळले. 

व्यायाम , योगासन , सात्विक आहार , उपासनेतील  सातत्य, शुद्ध व स्वच्छ विचारसरणी , दत्त महाराजांवर अपार श्रद्धा , वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील स्वच्छ चारित्र्य त्याचबरोबर जन्मतः गोरा रंग , पाणीदार डोळे ,अंदाजे ५ फूट १० इंच उंची , व्यायामाने कमावलेले शरीर ते खूपच हँडसम दिसायचे. कोणत्याही बाबतीत व्यवहार स्वच्छ असल्यामुळे ते कधीच कोणापुढेही मिंधे झाले नाहीत तसेच त्यांनी कोणापुढेही कधीही हात पसरला नाही. त्यांना पेन्शन होती त्यामुळे त्यांचा कोणावर भार नव्हता. 

पोलीस खात्यातून ते DIG ऑफिस ला क्लास १ अधिकारी म्हणून निवृत्त झाले. त्याकाळी मुंबई पोलीस इन्स्पेक्टरच्या बदल्या त्यांच्या कडे होत्या परंतु कामातील सचोटीमुळे त्यांनाही पगाराव्यतिरिक्त कोणताही पैसे घेतला नाही. बदलीसाठी त्यांना अनेक इन्स्पेक्टर आमिष दाखवायचे पण ते कधीच भुलले नाहीत. वाईट मार्गाने पैसे कमावण्यापेक्षा सन्मार्गाने पोलीस खात्याचा पगार घेणे त्यांनी पसंद केले व त्याबाबतीत ते प्रसिद्धही होते.

गुरुजी नोकरीत असताना त्यांच्या कार्यालयात 
साहजिकच ऑफिसमधील सहकारी विशेषकरून महिला सहकारी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी यायच्या परंतु त्यांनी स्वतःचे चारित्र्य कायम जपले. सर्वानाच ते वडिलांसारखे वाटत व तसाच सल्ला / उपासना ते येणाऱ्या प्रत्येकाला देत. आयुष्यभर ते निष्कलंक जीवन जगले. अनेकांचे त्यांच्याशी मतभेद असतील किंवा या माणसाकडे कसा कायम लोकांचा गराडा असतो. याची असूया अनेकांना असेल पण त्यांच्या चारित्र्यावर कधीच कोणीही संशय घेतला नाही. गुरुजींना विचारले तर ते खरे बोलायचे त्यामुळे त्यांना सर्व जण दचकून असायचे (घाबरायचे हा शब्द योग्य राहील )

कडक शिस्त व वेळेचा सदुपयोग हा त्यांच्या जीवनसरणीचा अविभाज्य भाग होता. स्वच्छता / टापटीपपणा तसेच त्यांनी कोणाला लेखी सूचना दिल्या तर त्या self explanatory असायच्या . 

गुरुजींच्या सूचना  

गुरुजींचे अक्षर 
पैशाचा हिशोब ते पै आणि पै द्यायचे. आर्थिक व्यवहार त्यांचा स्वच्छ व पारदर्शक होता. पोलीस खात्यात असल्यामुळे शिव्या देणे हा एक अविभाज्य अंगअसतोच , ते कधी कधी भोस... च्या असे म्हणत पण नंतर त्यांनी ते बंद केले. 

ब्राम्हण असूनही किंवा पूजा अर्चा / भिक्षुकी करूनही त्यांची संचय करण्याची वृत्ती नव्हती. गुरुवारी माहीमच्या घरी त्यांच्याकडे दरबार असायचा आन दत्त महाराजांसाठी अनेकजण पेढे , मिठाई , नारळ , हार वगैरे घेऊन यायचे व ते तिथल्यातिथे वाटले जायचे. घरात अन्न धान्य साठा मात्र चांगला असायचा. त्यांच्या घरून कोणी कधी रिकाम्या हाताने किंवा उपाशी गेले असे मला आठवत नाही. अर्थात याचे श्रेय त्यांची पत्नी माई याना जाते. माणसांचा कायम राबता असायचा. भृगु संहितेचा आधार घेऊन गुरुजी पत्रिका बघून उपासना सांगायचे पण ज्योतिष हा त्यांचा विषय नव्हता. कधीतरी प्रश्न कुंडली मांडायचे. दत्त महाराज , नवनाथ , देवी उपासना ते उपाय म्हणून देत.

गुरुजींनी मांडलेली पत्रिका




जप कसा करावा याबाबत स्पष्ट सूचना गुरुजींच्या हस्ताक्षरात 

अमेरिकेतील एका मुलींसाठी जप केला आणि चमत्कार झाला



त्यांनी कधी कोणाकडून पैसे मागितले नाहीत व तशी अपेक्षाही केली नाही आणि घेतलेही नाहीत. गाणगापूरला आश्रम बांधण्यासाठी त्यांनी ट्रस्ट स्थापन केला होता त्यासाठी ते देणगी घ्यायचे व ताबडतोब रिसीट द्यायचे. लोकसंग्रह त्यांना आवडायचा किंबहुना तीच त्यांची ताकद होती. त्यांनी कधीच कोणालाही दुखावले नाही. हि बाब आम्ही अजून शिकलो नाही. 

माझे पत्र वाचून गुरुजींनी लाल पेन ने माझे सुंदर वर्णन केले आहे. 
त्यांची compatibilty खूप छान होती त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांशी त्यांचे पटायचे व त्या पद्धतीने ते गप्पा मारायचे. विनाकारण ते कोणाला सल्ला द्यायचे नाहीत. माहित नसलेल्या विषयाची ते माहिती घ्यायचे. असंख्य गुरुचरित्र पारायणे , २ गायत्री मंत्राचे अनुष्ठान , असंख्य जप , वेगवेगळ्या खडतर उपासना त्यांनी केल्या परंतु त्याची वाच्यता किंवा मार्केटिंग त्यांनी कधीच केले नाही. कारण सूर्य हा तेजस्वी असतो त्याला स्वतःची ओळख सांगायला लागत नाही. आपले मात्र तसे नाही. प्रचंड उपासना , अनुभव ,समाजात मान त्यांना होता. पण ते चांगले वक्ते मात्र नव्हते. कधी जास्त बोलायचे नाहीत. भाषण करणे हा त्यांचा पिंड नव्हता, अर्थात सूर्याप्रमाणे ते उभे राहिले कि प्रकाश पडायचाच. अत्यंत साधेपणाने बोलूनदेखील ते आपल्यावर भुरळ घालायचे. त्यांच्या बोलण्यात स्वच्छपणा होता. डोक्यातून न बोलतात ते डायरेक्ट हृदयातून बोलायचे त्यामुळे ते आपल्या थेट हृदयात पोहोचायचेच.
गुरुजी भाषण करताना 

धुळे येथे गुरुजींना जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार झाला ९ जुलै २००८
जीवन गौरव पुरस्कार 
धुळे येथे आम्हीपण गेलो होतो 


जातीवादाला त्यांच्याकडे थारा नव्हता. माणूस वर्नाने नाही तर कर्माने ब्राम्हण असतो हे त्यांचे ठाम मत. त्यामुळे सर्वधर्मीय लोक त्यांच्याकडे प्रेमाने , आपुलकीने यायचे. सर्वाना सामान वागणूक होती. त्यांची स्मरणशक्ती तीव्र होती. त्यामुळे कोणाशी काय आणि कधी बोललो हे त्याना चांगलेच आठवायचे. तसेच ते कधी तणावात आलेले मी पहिले नाही. 

दत्तमहाराज हे त्यांचे आराध्य दैवत , याचा जप ते कायम करायचे व लोकांना पण जप / नामःस्मरण करायला सांगायचे. असंख्य गुरुचरित्र पारायणे त्यांनी केली होती. अनमोल प्रकाशनाचे गुरुचरित्र त्यांना आवडायचे व ते नित्य वापरायचे. त्यांच्याकडे गुरुचरित्र पोथी आली व त्यांनी ती वाचली कि एखाद्या मास्तराप्रमाणे त्यातील व्याकरण , शुद्धलेखन चुका ते दुरुस्त करायचे. एवढे त्यांना गुरुचरित्र पाठ होते. 


ओवी २१ मध्ये गुरुजींनी दुरुस्ती केली आहे 

ओवी ५७ मध्ये गुरुजींनी दुरुस्ती केली आहे  
ओवी ७५ मध्ये गुरुजींनी दुरुस्ती केली आहे 

ओवी ५८मध्ये गुरुजींनी दुरुस्ती केली आहे 

गायत्री मंत्राचे २७ लक्ष चे एक असे दोन पुनश्चरण त्यांनी केले आणि तिसरे चालू आहे. संकल्पित असेल तर ते जप संख्या लिहून ठेवायचे आणि मोजायचे. मला तर त्यांनी सांगितले कि तू जप मोजत जाऊ नकोस , तूला कोणाला दाखवायचा आहे ? ज्याचा जप करतोस तो पक्का हिशोब ठेवतो. अर्थात काही विशिष्ठ कारणाने त्यांनी जप आणि संकल्पित जपसंख्या सांगितली असेल तर आठवडा / पंधरा दिवसाला कधी किती जप केला , किती बाकी आहे याचा हिशोब त्यांना द्यायला लागायचा. याबाबत ते फारच पर्टिक्युलर  होते.  एरवी ते कितीही मित्रत्वाने वागत असले तरी उपासनेच्या बाबतीत खूप कडक होते त्यात नो मैत्री. अर्थात त्यांनी सांगितलं आणि मी केला नाही असे कधीच घडले नाही. परंतु एकंदरीत त्यांचे बारीक लक्ष असायचे. कधीतरी अचानक फोन करून ते मंत्र म्हणायाला सांगायचे ,जप संख्या विचारायचे. त्यावेळेला अटक करायला आलेल्या पोलिसासारखे ते बोलायचे. समाधान झाले कि मग हसायचे आणि म्हणायचे मी तुझी तयारी बघत होतो. त्यामुळे त्यांचा फोन आला कि मी थोडा विचार करूनच फोन उचलायचो , आणि त्यावेळेला मनात विचार असायचे कि आत्ता हे काय विचारणार ?

दत्तचरणी प्रचंड  श्रद्धा / निष्ठा असूनदेखील त्यांनी कधीच अंधविश्वास केला नाही. कर्म करण्यावर त्यांचा भर असायचा. त्यांचे निर्णय हे प्रॅक्टिकल व ताबडतोब असायचे. त्यांचा सल्ला हा neutral असायचा. मोठे मोठे राजकारणी ,अधिकारी त्यांच्याकडे यायचे पण त्याचा त्यांनी कधी फायदा घेतला नाही. I dont have Godfather but God is my father म्हणून मला काही चिंता नाही असे ते म्हणायचे. 

गुरुजी गुरुपौर्णिमा , दत्तजयंती घरी साजरी करायचे . पण भक्तसंप्रदाय वाढल्यावर त्यांनी दादरला हॉल मध्ये साजरी करणे चालू केले. यात त्यांचे नियोजन , वेळेचा काटेकोरपणा जबरदस्तच होता. आता तो कोणालाही शक्य नाही. बारीक सारीक गोष्टीतील विचार ते नियोजन करताना करायचे. मी त्यांना नेहमी म्हणायचो कि तुम्ही एक चांगले event manager आहेत. खुपश्या गोष्टी करून देखील त्यांचा मानपान नसायचा. मानपान , अहंकार , मोठेपणा त्यांच्या जवळपासही नसायचा. जे काही आहे ते दत्तमहाराजांचे आहे अशी त्यांची कायम भावना असायची.

गुरुजी आणि त्यांची बहीण 

२०१२ सालची गुरुजींनी दादरला शेवटची गुरुपौर्णिमा साजरी केली 
२०१२ गुरुपौर्णिमा दादर येथे हॉल मध्ये 
ते कधीच कर्तेपणा  घ्यायचे नाहीत. प्रत्येक गोष्टींमध्ये involve पण असायचे  आणि याच वेळेला ते detach पण असायचे. एकाच वेळेला attach आणि detach असणे हि अध्यात्मातील एक मोठी पायरी त्यांनी स्वकष्टाने  आणि स्वआचरणाने प्राप्त केली होती. म्हणजे ते आपल्यात असायचे पण आणि नसायचे पण (difficult to explain ). 



श्री. विजय पाटील यांच्याबरोबर गुरुजी 

श्रीगुरुचरित्र या ग्रंथावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. गुरुचरित्र पारायण करण्याची उपासना / उपाय ते अनेकांना सांगत. गाणगापूरला गुरुचरित्र परायणाची सोया व्हावी म्हणून त्यांनी तिथे आश्रम बांधला ज्यात आज अनेक जण जातात , राहतात आणि पारायण करतात. 

गुरुजींनी बांधलेला जय गुरुदेव आश्रम गाणगापूर 

गाणगापुरात देखील एक सचोटीचे गुरुजी म्हनून त्यांची ओळख व ख्याती अजूनही आहे. श्रीगुरुचरित्र पारायण हे पुढील पिढीला सर्व नियमात राहून या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात करता येणार नाही हे त्यांनी केव्हाच ओळखले होते. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्याला नियमांची सवलत होती. अर्थात ब्रम्हचर्य , अपेयपान , व्हेज जेवण यात तडजोड नव्हती. परंतु बाकी सर्व फ्लेक्सिबिलिटी होती. महत्वाचे म्हणजे श्रीगुरुचरित्र पारायण स्त्रियांनी करू नये अशी सर्वसाधारण प्रथा आहे पण गुरुजींकडे मात्र स्त्रिया सात दिवसांचे श्रीगुरुचरित्र पारायण नियमात राहून करत. माझ्या परिचयाच्या एका गुजराती स्त्री ने पारायण केले होते. व अशी अनेक उदाहणे मी पहिली होती. कोण काय बोललो तर मी जबाबदारी घेतो असे ते म्हणायचे आणि त्यांच्या निर्णयावर ते ठाम होते. आणि निश्चितच त्यांच्याशी कोणी या विषयावर कधी वाद घातला नाही. थोडक्यात म्हणजे श्रीगुरुचरित्र पारायण यावर ते एक ऑथॉरिटी होते. 

देव हा सर्वाना सहज accesible व्हावा असा त्यांचा कायम प्रयत्न असायचा. दत्तभक्ती प्रचारार्थ आणि प्रसारार्थ त्यांनी आयुष्य वेचले. आयष्याभर श्रीगुरुचरित्र पारायणाची माहिती त्यांनी सर्वाना सांगितली. अनेकांनी पारायणे गुरुजींमुळेच केली. अजुन्हि अनेकजण हि सेवा करत असतील. हे सर्व करताना त्यांनी कधीच कर्तेपणा स्वतःकडे घेतला नाही. दत्त महाराजांना ते सर्व श्रेय देत. "परमपूज्य पाठकगुरुजी यांनी त्यांच्या आयुष्यात हि दत्तमहाराजांची पालखी काढली आहे. त्यात अनेकजण सहभागी झाले. काहींनी पालखी उचलण्यात सहभाग घेतला , काहींनी पालखीला हात लावला. अनेकजण पालखीबरोबर चालले , असंख्यांनी दर्शन केले , अनेकांनी नमस्कार केला. हि संधी दिल्याबद्दल आपण सगळेच पाठकगुरुजींचे कायम ऋणी आहोत. गुरुजींच्याच शब्दात  सांगायचे तर हा जगन्नाथाचा रथ सर्वानी मिळून ओढला."     

बाहेर जाताना ते खांद्याला एक चामड्याची बॅग लावायचे . त्यात त्यांच्या वापरातील वस्तू असायच्या, राजा खैनी तंबाखू ते खायचे ती कायम सोबत असायची , पैसे असायचे  , यात प्रत्येक प्रकारची नोट असायची. वायफळ खर्च ते कधीच करत नसत. अनेक मंदिरात त्यांच्या ओळखी असायच्या पण ते नेहमीच रांगेतून दर्शन घ्यायचे. कधी कोणी ओळखले तर मात्र गुरुजी आले , गुरुजी आले असे म्हणत लोकांची धावपळ व्हायची व त्यांना आत नेले जाई. मानपान केला जाई. एका अत्यंत सामान्य व्यक्तीसारखी राहणीमान त्यांनी शेवटपर्यंत ठेवले. अर्थात सूर्याला स्वतःची ओळख कधीच सांगावी लागत नाही. तो स्वयंप्रकाशी असतो.

आश्रमातील बेसिन धुताना गुरुजींचा गुपचूप काढलेला फोटो

 एवढ्या असामान्य माणसाने पुढील प्रवासाला जाण्यापूर्वी आपली सर्व संपत्ती , जबाबदाऱ्या वाटून टाकल्या होत्या. फक्त त्यांचेपेन्शन बँक अकाउंट चालू होते. त्यावंतिरिक्त काहीही नाही. आश्रमाचे कामकाज सोपवले होते. आपण सर्वजण प्रवासी आहोत आपलं प्रवास संपला कि आपल्याला सर्व मोह माया सोडून जायचेच आहे ते त्यांनी आधीच सोडले होते. आणि प्रवास संपताच सहजपणे ते पुढे निघून गेले. एकंदरीत गुरुजींचे जीवन म्हणजे एका सामान्य माणसाच्या असामान्य कर्तृत्वाची , अपरिमित कष्टाची , अखंड दत्तसेवेची , अढळ विश्वासाची अविश्वसनीय कहाणी आहे. 

अनेक सत्पुरुषाबद्दल आपण वाचतॊ ऐकतो. तेव्हा आपल्याला असे वाटते कि आपण याना पाहिले असते / भेटलो असतो तर ? पण मी खात्रीने / अभिमानाने सांगतो कि एका अश्या अनामिक सत्पुरुषबरोबर आम्ही वावरलो/ बागडलो. अर्थात त्या कालखंडात ते आमचे सहप्रवासी असल्यामुळे त्यांचे एवढे मोठे व्यक्तिमत्व मला पूर्ण कळाले नाही.२० ऑगस्ट २०१४ ला ते पुढच्या प्रवासाला गेले आणि त्यांनी वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टींचे वेगवेगळे / खोल अर्थ आत्ता उलगडू लागलेत. म्हणूनच हे लिहिण्याचा प्रयत्न. 

कालांतराने मला वाचन करता यावे म्हणौन हे लिहून काढले आहे. आता ते सोनेरी दिवस आठवले तरी मन रोमांचित होते. गुरुजी आज आपल्यात नाहीत हे सत्य मी स्वकारले आहे पण माझ्यावर त्यांचा प्रभाव आहे हे निश्चितच आणि त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि यातून तुम्हाला जर गुरुजी कळले तर तुम्हीपण निश्चितच भाग्यवान आहात .  

गुरुजींवर  मी एक कविता लिहिली होती त्याने या लेखाची समाप्ती करूया. 

मला समजलेले गुरुजी 

 

गुरुजी म्हणजे प्रेमळ माउली । गुरुजी म्हणजे दत्ताची सावली ।

गुरुजी म्हणजे जय गुरुदेव आश्रम ट्रस्टचा ध्यास  गुरुजी म्हणजे जय गुरुदेव आश्रम ट्रस्टचा श्वास 

गुरुजी म्हणजे निष्काम कर्मयोग  गुरुजी म्हणजे सहज भक्तियोग 

गुरुजी म्हणजे अखंड नामस्मरण  गुरुजी म्हणजे सतत श्रीगुरुचरित्र पारायण 

गुरुजी म्हणजे जय गुरुदेव  गुरुजी म्हणजे "महाराज सांभाळतील

गुरुजी म्हणजे स्वच्छता आणि टापटीपपणा  गुरुजी म्हणजे वक्तशीरपणा 

गुरुजी म्हणजे आपले श्रद्धास्थान  गुरुजी म्हणजे आपले आशास्थान 

गुरुजी म्हणजे आपली समस्यांची तक्रारपेटी  गुरुजी म्हणजे आपल्या समस्यांचे निवारण 

गुरुजी म्हणजे जगन्नाथ चिंतामण  गुरुजी म्हणजे प्रतिभा जगन्नाथ 

गुरुजी म्हणजे आपली ८४ पायऱ्या  गुरुजी म्हणजे आपले मुक्तिधाम 

गुरुजी म्हणजे पाचलेगावकर महाराजांकंदील बालपण  गुरुजी म्हणजे दंडवतेबाबांचे शिष्यपण 

गुरुजी म्हणजे उत्कृष्ट पौरोहित्य  गुरुजी म्हणजे उपासनेत सातत्य 

गुरुजी म्हणजे गायत्री पुनश्चरण  गुरुजी म्हणजे दत्तयागाचे आयोजन 

गुरुजी म्हणजे निरंतर उत्साह  गुरुजी म्हणजे उपासनेवर श्रद्धा 

गुरुजी म्हणजे फल प्राप्तीसाठी सबुरी  गुरुजी म्हणजे "श्रीराम " आणि  "शुभं भवातु "

गुरुजी म्हणजे अनवाणी देशभरामन  गुरुजी म्हणजे अनवाणी परदेशगमन 

गुरुजी म्हणजे पारदर्शक हिशोब  गुरुजी म्हणजे पारदर्शक आणि निष्कलंक चारित्र्य 

गुरुजी म्हणजे दिवसातले २२ तास काम  गुरुजी म्हणजे आयुष्यभर कायम कष्ट 

गुरुजी म्हणजे कडक मास्तरांचा राग ।गुरुजी म्हणजे आईचा वात्सल्यपूर्ण धाक 

गुरुजी म्हणजे उत्कृष्ट "Event manager " गुरुजी म्हणजे सर्वमान्य " Arbitorator " 

गुरुजी म्हणजे योगासने , जोर अशी बलोपासना  गुरुजी म्हणजे अनंत दत्त उपासना  

गुरुजी म्हणजे सामान्य राहणी उच्च विचारसरणी   गुरुजी म्हणजे शून्य अहंकार  

गुरुजी म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त   गुरुजी कायम प्रसन्नचित्त  

गुरुजी म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आणि भक्कम आधार  


 [हि कविता ताम्रपत्रावर लिहुन पाठकगुरुजींना "जगन्मित्र " या पुस्तकाच्या प्रकाशन दिनी दि. २५ डिसेंबर २०१२ ला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. सध्या हे ताम्रपात्र आपल्या गाणगापूर आश्रमात आहे. ]

विशाल फुलपगार


दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा.