Thursday, May 21, 2020

माउली

साधारणपणे जुलै २००३ सालचा  हा अनुभव आहे. आयुष्यात काही अनुभव / प्रसंग ठळकपणे लक्षात राहतात त्यातलाच हा एक. 

माझे ऑफिस तेव्हा बेलापूर , नवी मुंबई येथे होते. मी राहायला खार (प) , मुंबई. ऑफिसच्या कामानिमित्त कायम फिरतीवर असायचो. आठवड्यातून एक दोनदा विमान प्रवास व्हायचा सकाळी उठलो कि सर्वप्रथम डोळे उघडून बघायचे , म्हणजे पंखा फिरताना दिसला म्हणजे घरी आहे आणि पंखा नाही पण AC चालू असेल म्हणजे हॉटेलच्या खोलीत झोपलो आहे असे मी समजायचो. अनेकदा पहाटे उठून मी एअर पोर्ट वर जायच्या तयारीला लागत असे तेव्हा बायको म्हणायची अरे आज तुला कुठेच जायचे नाही, गप्प झोप आत्ता. मग नि पुन्हा झोपायचो. यात अतिशयोक्ती नाही.पहाटे ६चे विमान पकडायचे म्हणजे सकाळी ४.३० ला घरून निघावे लागायचे व सर्व काम करून रात्री उशिरा परत यायचो. सकाळी सकाळी रस्त्यावर फक्त दूधवाले , पेपरस्टॉल , रखवालदार अशी लोक दिसायची. त्यांना वाटत असेल काय मज्जा आहे माझी. आधी आधी मलापण मज्जा वाटायची पण नंतर मात्र मी कंटाळलो होतो. एवढेच काय तर एअरपोर्ट वर मॉर्निंग शिफ्ट चे एअरलाईन्स चा स्टाफ ,सीक्युरिटी स्टाफ सगळे चेहेर्याने ओळखीचे झाले होते.  याव्यतिरिक्त रोज घरून ऑफिस ला जायचे म्हणजे दीड तास पोहोचायला लागायचे.  

साधारणपणे जुलै २०१३ मध्ये ऑफिस ची एक मीटिंग मोरगाव जवळ एका फॅक्टरीमालकाबरोबर ठरली होती. कधी नव्हे ते कंपनी डायरेक्टर मला म्हणाली कि मी पण येते. तिचे वय ६५ असले तरी उत्साह दांडगा होता. ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी ७ वाजता बेलापूरवरून निघालो , म्हणजे ११ वाजता ठरल्या वेळेला मोरगाव जवळ पोहोचता येईल व तासाभरात मीटिंग आटोपून संध्याकाळी परत असा नेहेमीप्रमाणे टाईट कार्यक्रम होता. मी , सिंगमॅडम , आमचा पवार ड्राइवर व स्कोडा गाडी असे आम्ही निघालो. पवार हा वारकरी/ माळकरी त्यामुळे निर्व्यसनी तसेच गाडी छान व सेफ चालवायचा त्यामुळे मला तो आवडायचा. 

त्याने मला विचारले किया आपण कसे जायचे. मी म्हटले कि बघ आपण पहिल्यांदा धनकवडी , पुणे येथील शंकर महाराज मठात जाऊन दर्शन घेऊ तेव्हा मॅडम झोपलेल्या असतील त्यांना सांगू कि हे on the way आहे. तिथून सासवड , जेजुरी मार्गे मोरगावला पोहोचू. वारकरी असल्यामुळे त्याने सांगितले कि आज माऊलीची पालखी सासवडहून जेजुरीला मार्गस्थ होईल व जेजुरी मुक्कामी असेल त्यामुळे आपल्याला कदाचित माउली पालखी दर्शन होईल.  

पंढरपूर विठ्ठल हे उभ्या महाराष्ट्राचे दैवत. लाखो वारकरी चालत जाऊन आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात हे टीव्हीवर  ऐकले / पहिले होते. कधीतरी थोडे अंतर का होईना यांच्याबरोबर चालावे , तो अनुभव घ्यावा हि सुप्त इच्छा होतीच. अशी कोणती शक्ती आहे , काय  ओढ आहे , काय प्रेम आहे कि घरदार टाकून तहान भूक विसरत हि लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चालत पंढरपूरला येतात आणि बरोबर आषाढी एकादशीला पोहोचतात असे अनेक प्रश्न मनात होतेच. 

सकाळी वेळेत निघालो , मुंबई पुणे एक्सप्रेस वे संपल्यावर एक ब्रेक घेतला आणि निघालो. मी आणि पवार पुढे आणि मॅडम मागे बसल्या होत्या. तिथून आम्ही डायरेक्ट शंकर महाराज मठ, धनकवडी ला आलो. मॅडम ला सांगितले कि एक चांगले मंदिर आहे आपण दर्शन घेऊ आणि निघू. गर्दी नसल्यामुळे ५ मिनिटात दर्शन झाले. तिथे प्रसाद म्हणून मुगाच्या डाळीची खिचडी मिळते आणि विशेष म्हणजे लहानपणापासून मुगाच्या डाळीची खिचडी माझी फेविरेट. पण ती मिळणार १२ नंतर त्यामुळे मी मनोमन नमस्कार करून मनात म्हटले कि आज घाईत आहे , मुगाची खिचडी नेक्स्ट टाइम. असे म्हणून लगेच निघालो. खर म्हणजे धनकवडी on the way नाही पण.... 

सासवड - जेजुरी - मोरगाव आसा आमचा प्रवास म्हणजे अजून जास्तीतजास्त दीड तास म्हणजे आम्ही ठरल्या वेळेपेक्षा १५ मिनिटे आधीच पोहोचणार. सासवड वरून जेजुरीला जायला घाटरस्ता आहे. तो ओलांडला कि जेजुरी. व तिथून २०-२५ किमी वर मोरगाव. हा घाट ओलांडायला दोन रस्ते एक दिवेघाट मार्गे जो प्रशस्त आणि रहदारीचा रास्ता आहे व दुसरा बोपदेव घाट मार्गे जो अरुंद आणि कमी रहदारीचा आहे. दिवेघाटातून जायचे आमचे आधीच ठरले होते. दिवेघाटाच्या सुरुवातीलाच आम्हाला काही जणांनी सांगितले कि सकाळीच माऊलीची पालखी येथून मार्गस्थ झाली असून अजून ती घाटातच आहे त्यामुळे तुम्हाला वारकरी , पालखीमुळे येथून उशीर होईल. मॅडम बोलल्या कि आपण जाऊ , गाडी जाण्यासाठी ते आपल्याला साईड ने रास्ता देतील , तसेच त्यांना सांगू कि आमची एक तातडीची मीटिंग आहे. पवार ने सांगितले कि मॅडम असे काही होणार नाही. पालखी चालत असेल तर आपल्याला थांबावेच लागेल. मॅडम ने काही ऐकले नाही. व आम्ही निघालो.

पवार मात्र गालातल्या गालात हसत होता. तो मला म्हटलं साहेब पालखी मार्गस्थ असेल तर वारकरी आपल्याला पालखीपुढे जाऊ देणार नाहीत आणि एवढी गर्दी असेल कि आपण सांगायचे कोणाला ? तोपर्यंत आम्हाला पालखी बरोबर चालणारे वारकरी किती असतात याचया अजिबात अंदाज नव्हता. थोडे अंतर गेल्यानंतर तुरळक वारकरी लागले आणि पुढे जात जात ती संख्या प्रचंड वाढली. मुंग्यासारखी माणसे होती. चालायला पण जागा नव्हती. पोलीस आले त्यांनी गाड्या थांबवल्या होत्या , त्यामागे आमची गाडी पण थांबली. पोलिसानी सांगितले कि आम्ही मार्ग काढतो , तुम्ही येथेच थांबा , हॉर्न वाजवू नका. , शांतपणे बसा. मॅडम अस्वस्थ झाल्या , पण पर्याय नव्हता . आम्ही टेलिफोन करून सांगितले कि आम्हाला उशीर होईल. हिरवागार निसर्ग, पावसाळी वातावरण व त्यात पांढरे कपडे घातलेले लाखो वारकरी माउली नामाचा जयघोष करत चालत होते / नाचत होते. 


आमच्या गाडीच्या दोन्ही बाजूने वारकरी चालत पुढे जात होते. शेवटी मी म्हटले कि मी थोडा वारीबरोबर चालतो गाडीत बसून काय करणार ? एक तर पाय लांब त्यामुळे असेपण बसायची अडचण होतीच. पवार देखील गाडीबाहेर उभा राहिला , मॅडम गाडीतच बसून होत्या. आम्ही घाटाच्या जवळपास टॉप वर होतो, त्यामुळे उतरण आणि चढण असे दोन्ही स्पष्टपणे दिसत होते. खरे म्हणजे रस्ते दिसलेच नाही दिसली फक्त पांढरे कपडे घालून बेभानपणे परंतु शिस्तीने चालणारी , नाचणारी , माउली नामाचा जयघोष करणॆ माणसे. दूरदूरचे माणसे म्हणजे केवळ पांढरे ठिपकेच , या असंख्य ठिपक्यांमधील मी पण एक ठिपकाच. आपले पृथ्वीवरचे अस्तित्वदेखील असेच आहे.

अनेक दिंड्या मिळून एक वारी बनते. प्रत्येक दिंडीत ५० -१०० वारकरी असतात व प्रत्येक दिंडी ला एक क्रमांक असतो. त्या त्या दिंडीचा एक टेम्पो असतो. त्यात जेवण बनवायची सामुग्री असते. हा टेम्पो मुक्कामाच्या किंवा विश्रांतीच्या ठिकाणी आधीच जाऊन थांबतो व त्या त्या क्रमांकामधील वारकरी त्या त्या टेम्पोजवळ येतात आणि विश्रांती घेतात / जेवतात. त्याव्यतिरिक्त गाव वाले देखील खाण्याची व्यवस्था करतात.


एवढी गर्दी असून देखील अत्यंत शिस्तबद्ध रीतीने हे लाखो वारकरी चालत येत होते. ऊन पाऊस याची पर्वा नाही ध्येय फक्त पंढरपूर.  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व वारकरी आत्ममग्न असतात. कोणी छोटा  - मोठा असा भेदभाव नाही. कोण कोणाकडे बघतही नाही. सर्वे जण एकमेकांना माउली या नावानेच बोलावतात म्हणजे कोणाला नाव नाही. आपण माउली बोललो कि समोरचा देखील आपल्याला हसून माउली बोलतो. जात पात , धर्म , गरीब श्रीमंत वगैरे कसलाही भेदभाव नाही. संपूर्ण समानतेचा अनुभव येथे आला. 

काही शहरी भागातील दिंड्या दिसल्या , काही परदेशी सुद्धा दिसले , सर्व जण एकमेकांशी एकरूप त्यामुळे काहीच फरक नाही. सर्व जण अत्यंत शिस्तीत चालत होते. लाखो लोकांबरोबर आपण चालतोय , अंगावर तुरळक तुषार पडतायत , सर्वत्र पावसाळी वातावरण , निसर्गाने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अंथरलेली हिरवी चादर , थंड वाऱ्याची सतत येणारी झुळूक, वातावरण अत्यंत भक्तिमय , पांडुरंगमय. 


मी विचार केला कि याच रस्त्याने गेले अनेक शतके वारकरी याच सुमाराला नित्यनेमाने चालत जात असतील आणि त्यांची पाऊले उमटलेली असतील. पुढच्या वेळी नवी पाऊले उमटतील आणि असे चालूच राहणार. यावेळी मला ते भाग्य मिळाले. 

कोणती श्रद्धा , काय विश्वास , याना पंढरपूर वारी करून काय मिळते? ,  हे एवढे का व कशाला चालतात ? , यांच्या जेवण अंघोळीची काय व्यवस्था ? , हे तहानभूक आजारपण विसरून कसे चालतात ?, यांच्या घरी कोण असेल ?, अनेकांकडे मोबाईल नाहीत त्यामुळे ते संपर्कात कसे असतील ?. यात काय पुण्य आहे ? एवढा शिस्तबद्ध प्रवास कसा करतात ?, नियोजन कोण करते ?, याना खरंच देव पावत असेल का ? देव आहे का ?, असे अनेक प्रश्न मनात येत होते. 

विशेष म्हणजे वारकरी हा नेहमीच काटक असतो. जाड , पोट पुढे आलेला , बेढब किंवा overweight वारकरी निदान मी तरी इथे पहिला नाही. स्त्री पुरुष , लहान मुले , तरुण , म्हातारे असे सर्वच चालत होते , कुठलाही भेदभाव नाही. कोणाचीही ओळख नाही. ओळख फक्त माउली. साधारण दीड तास चालून मी पुन्हा माझ्या गाडीकडे आलो व गाडीत बसलो. मला वाटले कि उशीर झाला म्हणून मॅडम वैतागतील पण त्यापण कौतुकाने हे सर्व बघत होत्या. मला खूप भूक लागली होती. पण काय करणार खिशात पैसे होते पण उपयोग नाही. शांतपणे गाडीत बसलो होतो , काचा खाली केल्या होत्या. 

अचानक एक माणूस आला आणि माउली हे घ्या म्हणून आम्हा तिघांना ३ फूड पॅकेट देऊन हसून गेला. पुढे पण काही जणांना त्याने दिले. मला खूप भूक लागल्यामुळे मी लगेचच त्याचे मनोमन आभार मानून पाकीट खोलले तर त्यात मुगाच्या डाळीची खिचडी आणि ती पण पोटभर. साधारणपणे १ वाजले असावेत नक्की आठवत नाही. सकाळी शंकर महाराज मठात मुगाच्या डाळीची खिचडी खाता आली नाही पण वारीमध्ये मात्र अगदी सेम तो सेम खिचडी मिळाली. याला चमत्कार म्हणावे कि योगायोग हे मात्र कळत नव्हते. इथे जेवणाआधी हात धुणे हा प्रकार नव्हता . खूप भूक लागल्यावर जेव्हा अनपेक्षितपणे चविष्ट व आवडणारे जेवण मिळते त्याचा आनंद स्वर्गीय असतो आणि तो मला अनुभवयास मिळाला.  जेवणाचा प्रश्न सुटला आणि डोळ्यातले अश्रू पावसात एकरूप झाले. . 

थोड्या वेळाने माउली पालखी विश्रांतीसाठी थांबली व त्याचबरोबर वारकरी देखील त्यांच्या दिंडीच्या ठिकाणी थांबले. घाटात गर्दी होतीच. आमच्या पुढे व मागे गाड्याची रांग होती. पोलिसानी आम्हाला एका बाजूने सोडले व म्हटले कि हळू हळू जा , हॉर्न वाजवू नका , प्रेमाने माउली म्हणा म्हणजे वारकरी रास्ता देतील. त्याप्रमाणे आम्ही निघालो.  वाटेत माऊलीची पालखी विश्रांतीसाठी थांबलेली दिसली त्यापुढे नकळत नतमस्तक झालो. या वारकऱ्यांची शिस्त व श्रद्धा पाहून कळले कि देव देव्हाऱ्यात नाही , माणसातच आहे.

अशा प्रकारे आम्ही दोन  तास उशिरा मीटिंग ला पोहोचलो.  तासाभरात मीटिंग आटोपून निघालो तेव्हा माउली जेजुरी मुक्कामी होती. येताना मात्र दिवेघाटात गर्दी नव्हती. भक्तिमार्गातला दिवेघाट ओलांडताना मी नतमस्तक झालो. वारकर्यांविषयी आदर शतपटीने वाढला होता. एकंदरीत वारी हि संकल्पना सामाजिक समानतेचे उत्तम उदाहरण आहे. मॅडम आमच्या कंपनी मध्ये डायरेक्टर होत्या तसेच पंजाबी होत्या पण त्यांनी देखील या वारीचे खूप कौतुक केले. 

या रम्य व अलौकिक आठवणींच्या हिंदोळ्यावर परतीचं प्रवास झाला. आजही हि आठवण आली कि मन गहिवरून येते. दीर्घकाळ स्मरणात राहिलेली हि आठवण मी आज लिहून काढली. लिहिताना देखील , वारीत दिवेघाटात चालल्याचा अनुभव आला. श्रद्धा आणि भक्तिभावाने पुनश्च वारकरी संप्रदायाला नमन केले. 

माउली नामाचा जयघोष अजूनही कानात ऐकू येतो.  

विशाल फुलपगार - २१ मे २०२०









6 comments:

  1. मज्जा आली लेख वाचताना तुझे प्लांनिंग बाईंना कळाला तर अजून सुद्धा फोन करतील आणि कदाचित धन्यवाद सुद्धा देतील . प्रत्येक वाक्यागणिक वारी चा अनुभव आला खरोखर फारच सुंदर - Sanjay Patil

    ReplyDelete
  2. कृतिकाMay 21, 2020 at 5:56 PM

    धन्यवाद विशाल दादा तुमचा अनुभव वाचताना मीही वारी अनुभवते असे वाटले खूपच सुंदर
    कृतिका संखे

    ReplyDelete
    Replies
    1. मलाही वारीमधे चालत चालत लिहित आहे असेच वाटले

      Delete
  3. Woww किती सुंदर आणि सहज लिखाण.. सगळे काहिद्गी डोळयांसमोर घडतंय असंच वाटलं.. जय हरी विठ्ठल!!🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मलापण अजून सर्व काही डोळ्यासमोर आहे. वाचन केल्याबद्दल धन्यवाद

      Delete