Wednesday, May 27, 2020

G A Kulkarni primary & preprimary शाळेची आठवण


दोन रुपये बक्षिस 

माझे शालेय शिक्षण खार येथील , मुंबई सबअर्बन एजुकेशन सोसायटी च्या  G A Kulkarni primary & preprimary  शाळा (मॉंटेसरी ते ४थी ) व बी पी एम हायस्कूल माध्यमिक शाळेत (५वी  ते १०वी ) मराठी माध्यमातून  SSC बॊर्डातून झाले. हि एक त्यावेळेची नावाजलेली शाळा होती. एकाच कंपाऊंड मध्ये  G A Kulkarni primary & preprimary शाळा हि दोन मजली छोटी इमारत मध्यभागी मोठे मैदान व समोरच U शेप मध्ये बी पी एम हायस्कूल हि दोन मजली मोठी इमारत आहे. दोन्ही शाळेला प्रवेश करण्याचे गेट वेगळे होते. G A Kulkarni १७वा रास्ता वरून व बी पी एम हायस्कूल  १६ वा रास्ता वरून प्रवेश होता. माझ्या घरापासून ५ मिनिटे अंतरावर शाळा असल्यामुळे मी चालताच जायचो. इतर सर्वे मुलेदेखील चालतच यायची. आज आपण G A Kulkarni primary & preprimary  शाळेबद्दल बोलूया. 


शाळा सुटायच्या ५ मिनिटे आधी आम्ही शाळेच्या मुख्य दरवाजावर रांग लावायचो. या रांगेला खूप महत्व, सर्व मुले रांग लावून , पाठीमागे दप्तर अडकवून , हात मागे अशी रांग लावायचो. सर्व जण शाळेत रांग लावूनच प्रवेश करायचा आणि शाळा सुटताना देखील रांग लावून प्रत्येक वर्गातील मुले बाहेर येत असत. दुपारी साधारण १२. ३० ते ५. ३० पर्यंत शाळा असायची. खूप मज्जा यायची. परुळेकरबाई , करमरकर बाई , चाचड बाई , कारखानीसबाई , निरगुडकरबाई , वाडियाबाई अश्या अनेक प्रेमळ व उत्कृष्ट शिक्षक आम्हाला होते. त्यात शिक्षिकांचे प्रमाण जास्त होते. जेव्हा शिक्षण शाळेमध्ये मिळायचे ,शिकवणी मध्ये नाही असा तो काळ होता. तेव्हाचे वर्ग खूप मोठे वाटायचे. एका वर्गाला दोन तुकड्या होत्या व प्रत्येक तुकडीत जवळपास ४०-४५ विद्यार्थी. मी १९८२ ला ४थी पास झालो 

समोरची बी पी एम शाळा बघून छाती दडपायची ,कारण ती उंच व मोठी शाळा होती व मुले पण खूप मोठी वाटायची. त्यांचा युनिफॉर्म पण वेगळा होता. अर्थात तेव्हा बी पी एम मध्ये जाण्याचा कधीच संबंध आला नाही. G A Kulkarni  मध्ये आमचे जीवन खुपच सुरक्षित होते. सर्व स्टाफ नावानिशी ओळखत असे. वास्तू ओळखीची होती. ५वीला मात्र आम्ही त्याच कंपाउंड मधील बी पी एम  जाणार होतो. 

मला अजून आठवते कि मी ४थी ब मध्ये होतो.  दरवर्षीप्रमाणे हे वर्षही खूप आनंदात गेले. अभ्यासात हुशार असल्यामुळे परीक्षा व निकालाचे कधीच टेन्शन नव्हते. आयुष्य फार स्टिरीओ टाईप होते. रांगेत शाळेत जाणे , वर्गात जाऊन बसने , सुरुवातीला  सरस्वती वंदना "या कुंदेन्दू तुषार हार धवला " ,मग हजेरी , मग वर्ग सुरु होत असे, बसण्याची जागा फिक्स होती, व शक्यतो उंचीप्रमाणे बसण्याची जागा ठरत असे. मी उंच असल्यामुळे शेवटच्या बाकावर बसण्याचा मान मला नेहमीच मिळत असे. सुटताना "वंदे मातरम" होत. प्रत्येक वर्गात एक स्पीकर होता. यातून सर्व ऐकायला येत असे. रविवारी सुट्टी , तसेच सणाच्या फिक्स सुट्ट्या असत. दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास मिळत असे व तो बहुधा सुट्टी संपायच्या दोन तीन दिवस आधी सुरु करून पूर्ण केला जाई .  

शिक्षक सर्वांच्या पालकांना नावानिशी ओळखायचे व शिक्षक ओरडले तर पालकच मुलांना धोपटून काढायचे. एखाद्या विद्यार्थ्याची तक्रार झाली आणि जर त्याच्या पालकाना शाळेत बोलावले तर ती एक खूप मोठी घटना असायची आणि पालकांसाठी शरमेची बाब. शाळेच्या मुख्याध्यापकांचा राऊंड होणे म्हणजे शाळेत खूप शांतता असायची आणि आम्ही घाबरायचो. 

वर्ष सुरु होताना नवीन पुस्तके घेणे , त्याला कव्हर लावणे, नावाची लेबल लावणे , नवीन वह्या ,पुस्तकांचा वास , काही जोडलेली पाने वेगळी करणे , हा कार्यक्रम असायचा आणि मला तो खूप आवडायचा. आणि मला तो अजुनपण मला स्पष्टपणे आठवतो. 

४थी ब मध्ये मला करमरकर बाई वर्गशिक्षिका होत्या, त्यांचा मी लाडका विद्यार्थी होतो. चौथी पास होऊन मी माध्यमिक शाळेत जाणार हे निश्चितच होते. खरे म्हणजे मला हि शाळा सोडायची नव्हती. कारण इथे मी चांगला रुळलो होतो. , शिवाय सर्वजण ओळखीचे होते , बी पी एम हि एक मोठी शाळा होती. व त्यात मोठी मुले होती. 
करमरकर बाई सोबत २री किंवा ३री मध्ये असतानाच फोटो १९८० किंवा १९८१
४-ब आमचा वर्ग करमरकर बाई सोबत १९८२ अमूल्य आठवण 

स्नेहसंमेलनामध्ये मी नाटकात एक भूमिका केली होती 

करमरकर बाई

२०१० मध्ये करमरकर बाईंचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला 

उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही नाशिकला मावशीकडे राहायला जायचो. चौथी चा निकाल लागला त्यादिवशी सकाळी नाशिकला मावशींकडून निघालो व नेमकी ट्रेन लेट असल्यामुळे एक तास उशिरा शाळेत पोहोचलो. तो पर्यंत सर्व वर्गमित्र निकाल घेऊन गेले होते. व शाळेत शिक्षकांचे प्रशासकीय काम चालू होते. मी लगबगीने करमरकर बाईना भेटायला गेलो. त्यांनी विचारले कि उशिरा का आलास. मग त्यांनी मला प्रगतीपुस्तक दिले. मी त्यांच्या पाया पडलो. चांगले मार्क मिळालेत असे त्या म्हणाल्या. आत्ता तू बी पी एम मध्ये जाणार ,तिथे जास्त अभ्यास करावा लागेल असे त्या म्हणाल्या. कधीतरी भेटायला तुम्ही मुले मुली येत जा असे त्या म्हणाल्या. खरे म्हणजे बी पी एम शाळा समोरच होती पण आम्ही कधी बाईंना भेटायला पुन्हा G A Kulkarni  मध्ये गेलो नाही. 

अजून मी प्रगती पुस्तक बघितले नव्हते . माझा क्रमांक पहिला नव्हता हे मला माहित होते , पण मी टॉप मुलांमध्ये असणार हे निश्चित. मी निघालो, वडील पण सोबत आले होते. अचानक बाईनी मला थांबवले व स्वतःच्या पर्स मधून काढून मला २ रुपयाची नोट बक्षिस दिली व मला नजरेनेच निरोप दिला. मला अजूनपर्यंत तरी एवढी मोठी नोट मिळाली नाही. त्यावेळेला पहिला क्रमांक आला असता त्यापेक्षा हा आनंद मोठा होता. मी लगेच ती नोट आणि प्रगती पुस्तक वडिलांकडे दिले व आनंदात घरी आलो. मोठ्या शाळेत जायची स्वप्ने व दडपण मनात होतेच. 

१९८२ साली २ रुपये म्हणजे मोठी रक्कम होती. १५ पैसे ला चटणी पाव आणि २५ पैसे ला वडा पाव मिळायचा व तो मी क्वचितच खाल्ला असेल. वडापाव खाताना , चटणी पाव खाताना  खूप श्रीमंत असल्याचे फिलिंग यायचे. बंधे पैसे देऊन सुट्टे पैसे हिशोबाने घेणे तिथे शिकायला मिळायचे. आज पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून / जेवून , परदेशात फिरून देखील हा आनंद मिळत नाही. खरेच आयुष्यातले आनंदाचे क्षण नेहमीच छोटया  छोटया प्रसंगात असतात हे मात्र खरे. 

आत्ता विचार करतो कि काय हे मॉंटेसरी , प्राथमिक शिक्षकांचे आयुष्य आहे ? खरे म्हणजे हेच शिक्षक आपल्याला घडवतात. शाळेत बसण्याची ,अभ्यास करायची , ग्रुप ऍक्टिव्हिटी करायची , शिस्त लावायची अशी महत्वपूर्ण कामे ते करतात. शिक्षणाची पायवाट ते तयार करतात आणि त्या पायवाटेवर आपल्याला सक्षमपणे चालायला शिकवतात.  या वाटेवरूनच आपल्या शिक्षणाचा , वागणुकीचा , संस्काराचा पाय घडतो. व त्यावरच आपल्या आयुष्याची पुढील जडणघडण होते. प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे कार्य आपण नेहमीच विसरतो.  त्या शिक्षकांना देखील खूप भाग्य लाभते. निर्मल, निरागस , निष्पाप "मुले देवघराची फुले " अश्या लहान मुलाबरोबर वावरण्याची , त्यांना घडवण्याची संधी त्या शिक्षकांना मिळते. अर्थात हीच मुले मोठी झाली कि जरा डांब्रट बनतात हा भाग वेगळा 

आज उदाहरण म्हटले तर करमरकर बाईनी व त्यांच्या सारख्या शिक्षकांनी कितीतरी मुले घडवली , शिकविली असतील याची त्यांना देखील मोजदाद नाही. कदाचित बरेचसे विद्यार्थी त्यांना विसरले देखील असतील. अनेक उच्चशिक्षित असतील, परदेशात असतील किंवा कुठेही असतील. पण आपल्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका अजून तिथे असतील. ते अशीच मुले शिकवण्याचे कार्य अखंड करत असतील , त्यांना त्याचे क्रेडिट मिळावे अशी अपेक्षासुद्धा नसेल आणि नसतेच. हीच मुले पुढे डॉक्टर , इंजिनीयर , उच्च अधिकारी असतील. काही जण खूप शिकले नसतील , कदाचित अजून गरिबीतच असतील , पण एक उत्तम पती/ पत्नी , आई / बाबा , एक उत्तम नागरिक नक्कीच असतील. 

शेवटी काय, यशाचे मोल आपण पैशात करतो ,इथेच सगळी गफलत होते आणि भेदभाव सुरु होतो. आज आमचे शिक्षक कुठेतरी पेन्शन वर जगत असतील. , कदाचित त्यांना कोणी भेटायला जात नसेलही. किव्हा त्यांनी ऐकलेलं तो मुलांचा स्वर्गीय किलबिलाट ते कोणापुढे व्यक्त करू शकत नसतील. पण निश्चितच भारताची एक चांगली पिढी त्यांनी घडवली याचाच निश्चितच अभिमान त्यांना असेल. अजूनही आम्ही त्यांना भेटलो तर ते प्रेमाने , ताठ मानेने आणि अभिमानाने आम्हाला भेटतात व आमची नजर आपोआप त्यांच्या प्रेमाच्या ओझ्याने / आठवणीने त्यांच्या समोर नेहमीच झुकलेली असते. 

आज कालानुरूप शाळेत खूप बदल झालेत . मराठी माध्यमाची शाळा तर बंद झाली आहे. आत्ता फक्त इंग्रजी माध्यम शाळा चालतात. पण नक्कीच त्या भिंती , ते वर्ग , ते क्रीडांगण जिथे आम्ही बागडलो ,त्या निर्जीव वास्तूलापण आमची आठवण येत असणारच व त्यांची नजर आम्हाला शोधत असणारच यात काही वादच नाही.

अनेकदा मी करमरकर बाईना ला २रुपयाचा प्रसंग आठवतो का विचारले , त्यांना काहीच आठवले नाही. 

आज माझ्या मुलाला त्याच्या एकातरी शिक्षकाने किमान १०/२० रुपयाची नोट त्याच्या निकालानंतर द्यावी कि मी समजेन कि माझा मुलगा आत्ता खूप श्रीमंत झाला आहे.  आजच्या पॅरेण्ट टीचर मीटिंग , ओपन हाऊस मीटिंग यात शिक्षण कुठेतरी हरवले आहे.  हा प्रसंग खूप जुना असला तरीदेखील माझ्या चांगलाच लक्षात आहे आणि दरवेळेला तो क्षण आठवला कि मला त्यामागील नवीन अर्थ , भावना समजतात. 

अर्थात मला शिकवलेल्या सर्व शिक्षकांचा मी कायम ऋणी राहीन व हे ऋण मला निश्चितच प्रेरणादायक व अभिमानास्पद असेल. याचे जास्तीत जास्त व्याज वाढो हि मी प्रार्थना करतो. आज  G A Kulkarni primary & preprimary  शाळा (मॉंटेसरी ते ४थी ) व बी पी एम हायस्कूल माध्यमिक शाळा (५वी  ते १०वी ) या शाळेचे व या संस्थेचे मी खूप आभार व्यक्त करतो. बी पी एम हायस्कूल शिक्षकांबद्दल देखील याच भावना  आहेत ते नंतर कधीतरी व्यक्त करू.





अर्थात सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , मॉंटेसोरी चे शिक्षक याना एकत्र बोलावून "आनंद सोहोळा " हा खूप मोठा स्नेह संमेलन व सत्कार सोहोळा आम्ही २०१० साली आयोजित केला होता त्याबद्दलही कधीतरी लिहीन. मी ठामपणे सांगतो कि "आनंद सोहोळा " यासारखा कार्यक्रम कधीच कोणीही केला नसेल. 

असो, २ रुपयाची नोट मी वडिलांकडे दिली व काही काळ ती सांभाळून देखील ठेवली. नंतर मात्र ती सापडली नाही. परंतु तिचा विचार/ आठवण /  त्यामागची भावना अजून माझ्या मनात स्वच्छ कोरल्या गेल्या आहेत. 

करमरकर बाई आज अंधेरी पूर्वेला राहतात. त्या २००० मध्ये मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या.त्यांना कदाचित आठवत नसेलही कि अशी कितीतरी विद्यार्थी त्यानी व त्या शाळेने घडवले असतील. अनेकांना त्यांनी काहीतरी प्रोत्साहनपर दिले असेल पण मी ते प्रातिनिधिक स्वरूपात लिहून काढले. आयुष्यात काही जण पॉसिटीव्ह बदल घडवून आणतात ,त्यापैकी हि एक घटना. 


विशाल फुलपगार - 98215 32033
२७ मे २०२० 

25 comments:

  1. Replies
    1. मित्रा खूप छान लिहिले आहे.आमच्या भावना तू समर्पक शब्दात व्यक्त केल्या आहेस.असच लिखाण चालू ठेव.आम्ही 1982 ला 1 ली ब ला होतो.राजवाडे बाई पंडित बाई आठवतात.

      Delete
    2. धन्यवाद. मी पंडित बाईंच्या संपर्कात आहे

      Delete
  2. Vishal, I read your article with teary eyes. We are very fortunate to have had such dedicated teachers and the school which stood for its values. Very well written write up.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Prerana. I wrote on all of us behalf. Good you liked this

      Delete
  3. नेमक्या शब्दात तू खूप छान विचार मांडलेस.जसे प्रत्येक पिढी बदलली की विचारात ,संस्कारात,शिस्तीत बदल होत जातो तसा विद्यार्थ्यांमध्येसुद्धा बदल होताना आम्हा शिक्षकांना दिसून येतो.या पार्श्वभूमीवर हा लेख वाचून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.परूळेकर बाई आज आपल्या नाहीत.पण त्यांनी मुलांकडून घेतलेल्या नाटकाच्या तालमी आठवल्या.सातवीतला उमेश कामत आठवला.सर्व आठवले.मी १९८७साली शाळेत रुजू झाले होते.पूर्वाश्रमीच्या आग्रेबाई,आताच्या लहाने बाई.आठवले का? काही हरकत नाही.भावना महत्त्वाच्या.मन पुन्हा थोडा वेळ भूतकाळात गेले.मन भरून आले.खूप छान लेख. Thanks to you Vishal.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. बरेचसे आठवते. नावात गोंधळ होइल पन भावना महत्वाच्या आहेत आनि त्या आपल्याला आवडल्या म्हणून आनंद झाला.

      Delete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. भाऊ लेख वाचून मज्जा आली , ह्या वेळीस खूपच बदल जाणवला लिखाणात विचारात सुद्धा ... मला राहून राहून वाटतंय की तू असेच लिहीत राहीलास तर नक्कीच एक उत्कृष्ठ लेखक होऊ शकशील .... मांडणी अगदीच कालबद्ध आहे ... खूप सुरेख.... Sanjay patil

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भाऊ. सध्यातरी लिखाण एंजोय करुया

      Delete
  6. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  7. विशाल,खूप छान लिहीले आहेस.सगळ्या आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या.खूप मज्जा आली वाचताना.असेच लिहीत जा. साधं,सरळ तरीही मनाला भावणारं....

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच. तुझ्या मनात देखील याच भावना असतील

      Delete
    2. Snehal WalawalkarMay 29, 2020 at 5:22 PM

      विशाल तू शाळेबद्दच्या व शिक्षकांबद्दलच्या आठवणी साध्या सोप्या भाषेत मांडल्यास पण भावपूर्ण आणि
      प्रत्यक्षात पवित्र अशी शाळेची वास्तू आणि वंदनीय
      शिक्षक डोळ्यासमोर उभे केलेस.आपल्या शाळेने
      आम्हां शिक्षकांना तुम्हां विद्यार्थ्यांना भरभरून अनेक
      अविस्मरणीय गोष्टीची शिदोरी दिली आहे ती आपल्याला
      कधीच कमी पडणार नाही विशाल तुला माझ्या कडून
      म्हणजे सौ.स्नेहल आ.वालावलकर 1987 पी.टी
      शिक्षिका यांजकडून तुझ्या भावी वाटचालीस खूप खूप
      हार्दिक शुभेच्छा. खूप खूप मोठा हो. हीच मन:पूर्वक
      सदिच्छा.

      Delete
    3. धन्यवाद वालावलकर बाई. तुमचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत.

      Delete
  8. शालेय जीवन हे खरंच पुढील आयुष्यासाठी महत्वाचे ठरते, तुमच्या लेखातून शाळेविषयी असलेली ओढ व शिक्षकांबद्दल असलेला आदर ह्यातून आजच्या पिढीला छान संदेश मिळाला आहे.

    ReplyDelete
  9. Vishal, the blog is excellent. We met in Pune when you all came to invite Dhairyawan Teacher for your Anandmela in 2010. Today unfortunately Dhairywan Teacher is not their to read your spontenous emotions and sentiments. On her behalf i send you best wishes.

    ReplyDelete
  10. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete