Tuesday, July 7, 2020

माझी पाठकगुरुजींशी ओळख कशी झाली

७ जुलै २०२० 

पाठकगुरुजींशी माझी ओळख कशी झाली हे "जगन्मित्र " पुस्तकात लिहिलेच आहे. आत्त्ता जरा सविस्तरपणे लिहितो. यातून गुरुजींच्या स्वभावाबद्दल अजुन काही माहिती मिळावी हा उद्देश आहे. 

तर, सौ साल पुरानी  बात है जब मे २३ साल का था...... 
गुरुजी व माई 
मी तसा देवावर अजिबात विश्वास नसणारा व्यक्ती, अजूनही खूप विश्वास आहे अशातला भाग नाही. संजय हा माझा शालेय वर्गमित्र म्हणजे brother  फ्रॉम another  पेरेंट्स. माझ्या आणि पाठकगुरुजींच्या भेट होण्याला आणि पुढे मैत्री होण्यासाठी हा मुख्य आरोपी म्हणजे आरोपी नंबर १ आहे. सुभाष हा पण आमचा शाळेतला घनिष्ट मित्र. पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर हे एका कॉलेजला आणि मी दुसरीकडे गेलो. पण संपर्क मात्र कायम असायचा. पंकजभाऊ हे संजय आणि सुभाषच्याच्या बरोबर कॉलेजमध्ये आणि त्यांची घनिष्ट मैत्री. आम्ही चौघे नियमित भेटायचो.  संजयचे वडील पांडुरंग पाटील (नाना), हे पोलीस खात्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि खूप मोठे साधक व नवनाथ उपासक. नोकरी सांभाळून ते नियमित उपासना करायचे. रोजचा त्यांचा ३०,००० श्रीराम जप असायचा. आमचे पण ते खूप लाड करायचे, अजूनही करतात. बऱ्याच भेटीगाठी संजयच्या घरी व्हायच्या. 

नानांचे गुरु हे पेडर रोड, मुंबईला रहायचे व त्यांच्याबद्दल आम्ही ऐकून होतो, पण कधी भेटायचा योग आला नाही. ते २० मार्च १९८६ला पुढे गेले.  तिथेच पुष्पाताई सामंत (निवृत्त महानगरपालिका शाळा मुख्याध्यापिका ) या पण मुख्य साधक होत्या व त्या नानांच्यापण ओळखीच्या होत्या. एकदा आम्ही चौघे (या पुढे आम्ही म्हणजे मी, सुभाष, संजय आणि पंकजभाऊ) पुष्पाताईंकडे दादरला गेलो. गप्पा मारता मारता त्या म्हणाल्या की जाताना दादरला स्वामी समर्थ मठामध्ये जाऊन मग पुढे जा. मी म्हटले मी बाहेरच थांबतो. त्यांनी सांगितले कि तू एक नारळ घेऊन आत जा, स्वामीना नारळ अर्पण कर, थोडा वेळ बस. जर बरे वाटले तर ठीक अन्यथा कधीच जाऊ नकोस. मग आम्ही मठात गेलो. मला बरे वाटले. शांतता वाटली , तो अनुभव चांगला होता. हळूहळू आम्ही दर गुरुवारी पुष्पाताईंकडे जात असू, त्या स्वामींच्या उपासक होत्या आणि गप्पा पण छान रंगायच्या. काहीतरी खायला द्यायच्या, आणि गरम दुधात साखर घालून द्यायच्या. त्यांच्या व नानाच्या गप्पामधून त्यांच्या पेडर रोडच्या गुरुजींबद्दल खूप ऐकायला मिळायचे. ते मात्र २०/३/८६ला गेल्यामुळे भेट झाली नाही , म्हणजे तेव्हा आम्ही शाळेत ८वी ला असू.

पुष्पाताई सामंत यांच्याबरोबर पाठकगुरुजी 


संजयचे वडील नाना बरोबर पाठकगुरुजी 
आम्ही देखील पुष्पाताईना उत्सुकतेने विचारात असू कि आत्ताच्या वेळेला अशी कोणी अधिकारी व्यक्ती आहे का ? त्या काहीच उत्तर देत नसत. मला वाटते कि एक दिड वर्षांनी त्यांनी आम्हाला सांगितले कि पेडर रोडच्या गुरुजींकडे एक फाटक गुरुजी यायचे, ते खूप सात्विक आहेत, गायत्री उपासक आहेत, त्यांना तुम्ही भेटा. ते माहीमला रहेजा हॉस्पिटल समोरच्या कोणत्यातरी बिल्डिंगमध्ये टॉप फ्लोरला कोपऱ्याच्या खोलीत राहतात. एवढा पत्ता त्यांनी सांगितला. एवढी माहिती आणि चुकीचे आडनाव घेऊन गुरुजींकडे आम्हाला पाठवणाऱ्या पुष्पाताई सामंत या आरोपी नंबर २ आहेत.

मग आम्ही रहेजा हॉस्पिटलच्या समोर, आजूबाजूला असलेल्या सर्व बिल्डिंगच्या खाली जिन्यात असलेल्या नावाच्या पाट्या वाचल्या. तिथे कोणत्याही मजल्यावर फाटक अशी नावाची पाटी आढळली नाही. आम्हाला वाटले की कदाचित गुरुजी घर विकून दुसरीकडे राहायला गेले असतील. पण मुख्य आरोपीने असे फर्मान काढले कि आपण सर्व बिल्डिंगच्या टॉप मजल्यावर आणि त्याखालील मजल्यावर जाऊन चौकशी करायची. ते आम्ही सुरु केले. आणि माहीम मुक्तिधाम सोसायटी च्या ५व्या मजल्यावरील त्यांच्या शेजाऱ्याने सांगितले कि इथे पाठकगुरुजी राहतात फाटक नाही. आणि ते गायत्री उपासक आहेत का ते माहित नाही पण दत्तभक्त आहेत. सध्या ते नवरा बायको नाशिकला त्यांच्या मोठ्या मुलाकडे म्हणजे राजूदादा कडे असतात , त्याचा पत्ता आमच्याकडे नाही. पण कधीतरी एक दोन दिवसासाठी येतात आणि लगेच जातात. चला म्हणजे हेच ते असणार असा कयास आम्ही बांधला. आत्ता गुरुजी मुंबई ला येणार कधी व आम्हाला कळणार कसे हे काहीच कळायला मार्ग नाही.

मग पंकजभाऊ यांनी सांगितले कि आपण गुरुवारी संध्याकाळी दादर मठातून बांद्रा ला येताना या रस्त्याने येऊ आणि घरातली लाईट चालू असेल / खिडकी उघडी असेल म्हणजे ते आलेत असे समजू. हे आम्हाला पटले. पुढच्या गुरुवारी ताईना आम्ही सांगितले कि त्यांचे आडनाव फाटक गुरुजी नाही तर पाठकगुरुजी आहे.  तो पर्यंत इतकी वर्षे त्या फाटक गुरुजी असे बोलायच्या. मग असे अनेक गुरुवार संध्याकाळी रात्री आम्ही आशेने त्या घराची लाईट चालू आहे का बघायचो. तिथून फेरी मारायचो. तो पर्यंत आमच्या आणि गुरुजींच्या मैत्रीच्या रस्त्यावर अंधार होता.

एकदा १९९६ का ९७च्या दत्तजयंतीला आम्ही दादर मठातून संध्याकाळी उशिरा निघालो. नेहमीच्या रस्त्यावरून परतलो. आज गुरुवार नसल्यामुळे, किंवा गप्पांच्या ओघात आम्ही त्या इमारतीकडे लक्ष दिले नाही. उशीर झाल्यामुळे थोडे घाईतच होतो. घाईतच गुरुजींची माहीम मुक्तिधामची इमारत ओलांडून पुढे गेलो आणि सुभाष बोलला कि त्याने कदाचित गुरुजींच्या घराची लाइट चालू आहे असे बघितली. आम्ही लगेच गाडी बाजूला लावली. घरी जायला उशीर झाला होता , पण सुभाषने सांगितले कि त्याने नक्की पाहिले. इतके दिवस ती लाइट बंद बघायची आम्हाला सवय होती. आणि आम्ही गाडी फिरवली आणि विश्वासच बसेना,  माहिम मुक्तिधाम इमारतीतील पाचव्या मजल्यावरील पाठक गुरुजींच्या घराची लाईट चालू होती आणि खिडकी उघडी होती, म्हणजे नक्की गुरुजी घरात होते. 

विजय पाटील, पाठकगुरुजी , मी आणि संजय पाटील 
घरी जाऊन त्यांना भेटायचे ठरवले. हातात पेढे, फुले असे काहीच नव्हते व तसा विचारही मनात आला नाही. त्यावेळी २३-२४ वय असेल. त्यांना भेटून त्यांना काय सांगायचे हा पहिला प्रश्न आणि यांनी काही विचारले तर काय उत्तर द्यायचे हा दुसरा प्रश्न आमच्या समोर होता. 

संजयच्या वडिलांचे गुरुजी परिचयाचे होते त्यामुळे आमच्या टीमचे नेतृत्व त्यानेच करायचे आणि बाकीच्यांनी गप्प बसायचे अशी स्ट्रॅटेजि आम्ही ठरवली. गुरुजी पहिल्या भेटीत काही परीक्षा घेतील का ? कोणता मंत्र, रामरक्षा types म्हणायला सांगतील का ? का आलात असे विचारतील का ? माझी वेळ न घेता आलात असे बोलतील का ? असे असंख्य प्रश्न मनात येत असताना आम्ही ५ मजले चढून त्यांच्या घराच्या दारात पोहोचलो. दत्त जयंती असल्यामुळे अनेकजण येत जात होते. घराबाहेर आणि जिन्यात खूप चपला होत्या, सर्वांकडे पेढे, फुले,नारळ वगैरे होते. आम्ही मात्र "खाली हात आया है तू , खाली हात जायेगा" या कव्वालीप्रमाणे रिकाम्या हाताने दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो.

आरोपी क्र १ पुढे आणि आम्ही त्याच्या मागे असा क्रम होता. घर खूपच छोटे होते. एका कोपऱ्यात एका देव्हाऱ्यासमोर एक अत्यंत साधे पण तेजस्वी गृहस्थ मस्तपैकी गंध लावून बसले होते. घरात फुलांच्या सुवासाचा घमघमाट होता. खरे म्हणजे मला असे वाटले कि गुरुजी म्हणजे गळ्यात खूप रुद्राक्ष माळा, हातात खूप अंगठ्या वगैरे अशा प्रकारचे व्यक्ती असतील पण हे तर आजोबांसारखे सामान्य व्यक्ती होते. सर्व जण त्यांच्या पाय पडत, त्यांच्याशी बोलत, मग गुरुजी त्याना प्लॅस्टीकच्या छोट्या पिशवीतून पेढ्यांचा, प्रसादाचा शिरा देत, अशा प्रकारे रांग पुढे सरकत होती. मी मात्र मनातल्या मनात गुरुजींच्या पाया कसे पडायचे याची उजळणी करत होतो. आमचा नंबर आल्यावर आम्ही पण पाया पडलो, प्रसाद घेतला. त्यांनी प्रेमाने विचारले कोणाकडून आलात. संजयने पुष्पाताई आणि नानाची ओळख सांगितली. ते खूप आनंदित झाले , पेडर रोडचे गुरुजी गेल्यानंतर त्यांची देखील कोणाशीही भेट नव्हती. ते म्हटले तुम्हाला महाराजांनीच पाठवले, आम्ही परत म्हटले कि आम्हाला पुष्पाताईंनी पाठवले, त्या दिवशी तरी महाराज म्हणजे दत्त महाराज आहेत हे आम्हाला माहित नव्हते. गुरुजी फक्त हसले आणि त्यांनी माईना आवाज दिला व आमची ओळख सांगितली.

माईच्या आम्ही पाया पडलो. त्यांनी खूप प्रेमाने पाठीवर हात फिरवला आणि म्हणाल्या, हि भूत इथे कुठे आलीत. आम्ही सगळे bandra boys म्हणजे कपडे एकदम टकाटक आणि बाकी सर्वजण एकदम साध्या कपड्यात, म्हणजे आम्ही तिथे एकदमच उठून दिसत होतो. म्हणून ती आम्हाला भूत म्हटली असावी असे वाटले.  पण ती अनेकांना प्रेमाने दत्ताची भूत म्हणायची असे कालांतराने कळाले. तिने आम्हाला चहा आणि खिचडीचा प्रसाद दिला. घरात जागा नसल्यामुळे आम्ही गॅलरीमध्ये बसलो होतो. एवढी बारीक आणि म्हातारी बाई एकटे एवढे काम जोशात कसे करू शकते याचे आम्हाला आश्चर्य वाटले. आम्ही मात्र खाण्यावर concentrate करत येणाऱ्या जाणाऱ्यांना observe करत होतो. या गर्दीत आम्हाला पाठक गुरुजींबरोबर निवांतपणे बोलायला मिळणार नव्हते, त्यामुळे काय करावे हा प्रश्न होताच. मग निघताना आम्ही परत गुरुजींच्या पाया पडलो व संजय म्हणाला कि तुम्हाला वेगळे आणि निवांत कधी भेटता येईल. त्यांनी त्यांच्यामागील कॅलेंडर वर बघून सांगितले कि उद्या रात्री १० वाजता या मग निवांत बोलू , नंतर मी नाशिक ला जाणार आहे. वेळेत या असा दम / सल्ला त्यांनी आम्हाला दिला. वेळेच्या बाबतीत गुरुजी कडक आहेत हे पुष्पाताईंनी आम्हाला आधीच सांगितले होते.

गुरुजींबद्दल आमचे पहिले ओपिनियन खूप चांगले झाले. काहीही मोठेपणा नाही, देखावा नाही. सर्व शांत आणि शिस्तीत. शिवाय त्यांच्या vibrations होत्या त्या जाणवल्या. माई तर गुरुजींपेक्षा खूप आवडल्या व शेवटपर्यंत त्यांच्याबद्दल आम्हाला गुरुजींपेक्षा जास्त प्रेम होते. निघताना माईना भेटलो, त्यांच्या पाया पडलो. त्या म्हणाल्या उद्या नक्की या, मी वाट बघते. कोणीतरी आपली वाट बघतय हा खूपच आनंदाचा आणि जबाबदारीचा अनुभव आहे. माई आणि गुरुजी एवढ्या प्रेमाने बोलले कि जणू काही गेली ५००-१००० वर्ष आमची  ओळख आहे. काहीच दुरावा नाही, कुठेही खोटेपणा नाही. एकंदरीत दोघांना भेटून एवढा आनंद झाला कि काही विचारूच नका. बिल्डिंगखाली उतरून आम्ही पुन्हा गाडीत गप्पा मारल्या. गुरुजी आणि माईंची पॉसिटीव्हिटी क्षणोक्षणी जाणवत होती. 
माहीम घरातील देव्हाऱ्यासमोर गुरुजी आणि माई 
उद्या गुरुजींबरोबर काय बोलायचे यावर चर्चा केली, पण काहीच सुचले नाही. मग आज रात्री विचार करून,  उद्या दुपारी ४ वाजता भेटून काय ते ठरवायचे असे ठरले.  मग आम्ही परत दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता भेटलो. कोणाकडे काहीच प्लॅन नव्हता. आम्ही असे ठरवले कि आपण काहीतरी बोलण्यापेक्षा पाठक गुरुजी काय बोलतात ते ऐकू. काय असते, बोलण्यापेक्षा ऐकणे चांगले , कारण आपण बोललो तर आपले ज्ञान expose होते, म्हणून श्रवणभक्ती करावी असे ठरले. गुरुजी वेळेचे पक्के असल्यामुळे व वेळ पाळा असा सल्ला/ दम दिल्यामुळे, आम्ही रात्री ९. ३० ला म्हणजे वेळेच्या अर्धा तास आधी त्यांच्या बिल्डिंग खाली पोहोचलो व बरोबर १० वाजता त्यांच्या घराची बेल वाजवली. गुरुजींनीच दार उघडले, तेव्हा ते धोतर आणि बनियान वर होते, माई पण होत्या. खूप आनंदाने आमचे स्वागत केले. गुरुजी त्यांच्या आसनावर बसले व आम्ही नमस्कार केला. या वेळी मात्र आम्ही चाफ्याची फुले, पेढे आणले होते. माईनी आम्हाला काहीतरी खायला दिले.

माई पण येऊन बसल्या. नाव ओळख झाली. आज एक्दम रिलॅक्स वातावरण होते. मग गुरुजींनीच बोलायला सुरुवात केली. अगदी सामान्यपणे ते बोलत होते व आम्ही ऐकत होतो. मध्ये मध्ये जोक्स पण व्हायचे. मित्राप्रमाणे आणि खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे त्यांनी गप्पा मारल्या. एवढी तरुण मुले आल्याचे त्यांनापण कौतुक असावे. आम्ही त्यांचा नाशिकचा पत्ता विचारला. फोन नंबर घेतले. पंकजभाऊचे नासिकला फार्महाउस आहे तिथे आम्ही नियमित जात असतो. तुम्हाला भेटायला आले तर चालेल का? ते म्हणाले नासिकला मी निवांत असतो. कधीपण फोन करून या. गप्पा मारता मारता कधी रात्रीचे १२. ३० वाजले कळलेच नाही. आम्ही जेवून आलो होतो. त्यांनी सांगितले कि ते नंतर जेवणार. आम्हाला वाईट वाटले कारण आमच्यामुळे त्यांना जेवायला उशीर झाला. नाशिकला भेटू, असे म्हणून आम्ही निघालो व त्यांच्या बिल्डिंगच्या खाली उभे राहून परत १० मिनिटे गप्पा मारल्या. सहजच वरती बघितले तर गुरुजी आणि माई आम्हाला टाटा करायला खिडकीत उभे होते. आम्ही चपापलोच. त्यांच्या हातातला टॉवेल हलवून त्यांनी आम्हाला टाटा केले. लांबून त्यांचा टाटा दिसावा म्हणून हातात टॉवेल होता. आम्ही तडक निघालो. म्हणजे केवळ आम्हाला टाटा करण्यासाठी ते १० मिनिटे आम्ही वर बघण्याची वाट बघत शांतपणे उभे होते. हि गोष्ट आमच्या अजूनही लक्षात आहे आणि अजूनही त्याचे वाईट वाटते. 


नंतरच्या गुरुवारी पुष्पाताईंना सांगितले की आम्ही पाठक गुरुजींना भेटलो, त्यांनापण खूप आनंद झाला. आत्ता आमच्याकडे गुरुजींचा फोन व पत्ता होता. पुढच्या आठवड्यात आम्ही पंकजभाऊ कडे नाशिकला राहायला जाणार आहे आणि तेव्हा गुरुजींना भेटू असे त्यांना सांगितले.

नाशिकला गुरुजींना फोन करून सांगितले कि आम्ही या शुक्रवारी रात्री ८ -९ वाजता नाशिक ला पोहोचू, मग शनिवारी सकाळी तुम्ही सांगाल तेव्हा येतो. ते म्हणाले त्यांचा मुलगा, राजू पहिल्या मजल्यावर राहतो. तिथे तळ मजल्याला त्यांच्या परिचयाच्या व्यक्तीचा (श्री. कामत) फ्लॅट रिकामा आहे. तिथे मी कधी कधी राहतो. मी रात्री उशिराच झोपतो. मग तुम्ही रात्री या, आपण गप्पा मारू. आम्ही म्हटले हे छान आहे. आम्ही रात्रीच तुमच्याकडे येतो. त्या दिवशी रात्री ८ वाजता नाशिकला पोहोचलो. पंकजभाऊ कडे जेवलो आणि गुरुजींना फोन करून सांगितले, ते म्हटले मी इथेच आहे तुम्ही या. .

युनिव्हर्स तुमच्यासाठी सर्वकाही आधीच जुळवून ठेवते पण आपली वेळ आल्याशिवाय आपल्याला ते कळत नाही. पंकजभाऊचे  नाशिकचे घर हायवेच्या या बाजूला आणि गुरुजींचे घर पलीकडे , म्हणजे दोघांच्या घरामध्ये चालत जेमतेम १० मिनिटांचे अंतर होते. इतक्यांदा आम्ही नाशिकला आलो होतो, पाठक गुरुजींच्या शोधात होतो. ते नाशिकला रहातात हे पण माहित होते. आणि आम्ही फक्त त्यांच्या घरापासून १० मिनिटावर राहायचो. पण कोणालाच माहित नाही. 

रात्रीची वेळ असल्यामुळे गाडी आणि ड्राइवर घेऊन गेलो आणि जेमतेम ५ मिनिटात गुरुजींकडे पोहोचलो. थंडीचे दिवस आणि नाशिकची थंडी म्हणजे काही विचारू नका. गुरुजी मस्तपैकी फुल्ल हाताचे स्वेटर आणि कानटोपी घालूंन बसले होते. नंतर ज्या गप्पा चालू झाल्या ते काही विचारूच नका. रात्री १. ३० ला आम्ही तिथून निघालो. सकाळी १० वाजता पुन्हा राजूदादाकडे भेटायचे असे ठरले. त्याप्रमाणे सकाळीच नास्ता करून आम्ही राजूदादाकडे पोहोचलो. तिथे माई, गुरुजी, सुचेतावहिनी व त्यांची लहान मुले ओमकार, गायत्री भेटले. अगदी घरच्यासारखे फ्री वागलो. तिथेपण आम्हाला चहा आणि पोहे हा नास्ता मिळाला. अन्न हे पूर्णब्रह्म असते आणि त्याला कधीच नाही म्हणू नये या पवित्र भावनेने आम्ही भरपेट नास्ता केला. माईंनी सांगितले की जेवल्याशिवाय जायचे नाही. मग गप्पा मारत मारत जेवलोही. विशेष आठवण म्हणजे जेवताना माईने वरण भातावर खूप तूप वाढले. जेवढे वरण तेवढे तूप असा हिशोब असावा. निदान माझ्या घरी तरी मोजून मापून तूप वाढायची पद्धत होती. ते पण रोज नाहीच. इथे तर ताटात तुपाचा महापूर  आला  होता. एवढे मनापासून आणि भरपेट वाढणारी माईची आमची तिसरी, तर सुचेतावहिनीची पहिलीच भेट होती असे वाटतच नव्हते.

वेळ कुठे गेला कळालेच नाही. मग मात्र निघालो आणि रात्री परत गुरुजींना भेटायला आलो. दिवसा राजूदादाकडे भेटायचे आणि रात्री गुरुजींशी तळमजल्यावरील फ्लॅटवर उशिरापर्यंत गप्पा मारायच्या असा कार्यक्रम आमचा प्रत्येक नाशिक भेटीत असायचा. महिन्यातून किमान एकदा नाशिकला आम्ही जायचो. गुरुजींकडे कधीच बुवाबाजी, भंपकपणा, शोऑफ नव्हता. अत्यंत साधेपणा, विचारात आणि बोलण्यात स्वछता होती. मोठेपणा कुठेच नाही. अत्यंत मैत्रीपूर्ण ते आमच्याशी बोलायचे आणि मनापासून बोलायचे. त्यामुळे वेळ कुठे जायचा हे कळायचेच नाही. हेच पाठक पती पत्नी नंतर आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतील हे तेव्हा माहित नव्हते.

काही काळाने दर वेळी नाशिकला जाऊन गुरुजींना भेटणे यापेक्षा गुरुजीच जर नाशिकवरून मुंबई ला शिफ्ट झाले तर मात्र नियमित भेटता येईल असा विचार आम्ही मित्रांनी केला. शिवाय गुरुजींशी संबंधित बहुतेक जण मुंबई , ठाणे ला होते. माहिमचे घर बंद असल्यामुळे गुरुजींचा जनसंपर्क बराचसा कमी झाला होता. तसे नाशिकला त्यांना उपासनेला खूप वेळ मिळायचा हे मात्र खरे. 

त्यावेळी त्यांनी नुकतीच गाणगापूरला आश्रम बांधण्यासाठी जमीन घेतली होती. परंतु त्यासाठी निधी नाशिकला राहून जमा करणे शक्य नव्हते. शिवाय गुरुजी म्हणजे one man show, त्यामुळे सर्वजण गुरुजींकडे बघूनच मदत करायचे.  मग आम्ही हळूहळू गुरुजींना पटवून दिले कि नाशिकला राहून तुमचा आश्रम काही बांधून होणार नाही, त्यासाठी तुम्हाला मुंबईलाच यावे लागेल. शिवाय नाशिकवरून गाणगापूरला जायला डायरेक्ट ट्रेन नव्हती. कालांतराने गुरुजींना ते पटले, मग पाठक पती पत्नी दोघेही मुंबई ला नाशिकवरून शिफ्ट झाले. आमची तर खूप मज्जा झाली. गुरुजींचा गुरुवारचा दरबार चालू झाला. विविध जाती धर्माचे लोक गुरुजींकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले. आमच्या भेटीगाठी तर खूपच वाढल्या. 

आणि हो आम्ही जेव्हा गुरुजींना भेटत तेव्हा पुष्पाताईना फोन लावून देत. तेव्हा त्या दोघांचा एकच डायलॉग गुरुजी जाईपर्यंत चालायचा. गुरुजी म्हणायचे "पुष्पा तुझी भूत माझ्याकडे पोहोचली बर का ?" आणि पुष्पाताई म्हणायच्या "ती भूत तुमचीच होती , म्हणून तुमच्याकडे आली ". 



अशी माझ्या गुरुजींबरोबरच्या पहिल्या भेटीची कहाणी. लिहायला बसलो तेव्हा असे वाटले नाही कि हि आठवण एवढी मोठी लिहून होईल. डोळ्यासमोर सर्व प्रसंग उभे राहिले 

विशाल फुलपगार 


दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 




2 comments:

  1. खूप छान लिहिलंय तुम्ही.. अजून पुढे काय झाले जाणून घेण्यास खूप उत्सुक आहे..पुढचा भाग लवकर लिहा..वाट पाहत आहे..

    ReplyDelete