Friday, August 13, 2021

The Ganesh Naik saheb - मला समजलेले दादा

टीप : मी नवी मुंबई मध्ये रहात  नाही. नवी मुंबईतील मतदार नाही. हा लेख माझ्या वैयक्तिक अनुभवावर लिहिला आहे. कोणत्याही राजकीय दृष्टीने न वाचता व्यक्ती विशेष म्हणून वाचावे हि नम्र विनंती. 





खरे म्हणजे श्री गणेश नाईकसाहेब (दादा) याना राजकारणी म्हणणे चुकीचे आहे. ते सर्व विशेषणांच्या वरती आहेत. साधारणपणे २००० ते २०१३ या कालखंडात माझा दादांशी नोकरीच्या निमित्ताने जवळून संबंध आला. त्याद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पाहावयाला मिळाले. त्यांच्या विषयीच्या काही आठवणी सांगतो. अर्थात दादांची स्तुती करून किव्हा त्यांच्या विषयी लिहून मला कोणताही फायदा / तोटा नाही. कोणाला घाबरायची किव्हा विचारायची आवश्यकता नाही. मी लिहून ते मोठे अथवा छोटे होणार नाहीत. या सर्वांच्या पलीकडे दादांचे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी ते स्वकष्टाने ,स्वकर्तुत्वाने मिळवले आहे, टिकवले आहे. 

त्यांच्या विषयी लोकांचे अनेक मतप्रवाह असू शकतात पण माझा ज्या राजकारण्यांशी जवळून संबंध आला त्यातील क्रमांक १ वर माननीय श्री शरद पवार साहेब , क्रमांक २ वर श्री गणेश नाईक साहेब नेहमीच राहतील त्यानंतर नितीन गडकरीजी , अजितदादा वगैरे असतील.  माझ्या आठवणींमध्ये मी राजकीय टिप्पणी टाळण्याचा प्रयत्न करीन , कारण राजकीयदृष्ट्या माझा त्यांच्याशी कधी संबंध आला नाही आणि मी काही राजकारणी नाही. तसेच व्हाट्सअप , मीडिया च्या माहितीवरून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल मत बनवून टिप्पणी करण्याचा मूर्खपणा मी करत नाही. 

साधारण २००० साली मी नवी मुंबईमध्ये एका कंपनी मध्ये मॅनेजर म्हणून काम करायचो. तेव्हा आमचे वाशी ला भाड्याने ऑफिस होते. आमच्या कंपनी मध्ये २ पार्टनर होते व त्यांच्या खटके उडत होते. दुसरा पार्टनर माझ्या साहेबाना काम करू देत नव्हता त्यामुळे ऑफिसला येणे तणावपूर्ण होते. कोणाच्यातरी ओळखीने श्री गणेश नाईक याना भेटायला माझे बॉस गेले आणि मी मराठी बोलतो म्हणून मलापण घेऊन गेले. तोपर्यंत श्री गणेश नाईक म्हणजे शिवसेनेत असताना शिवसेनेला मोठ्या प्रमाणात ऍम्ब्युलन्स देणारे नवी मुंबईतील नेते म्हणून मला माहित होते. तेव्हा त्यांनी शिवसेना सोडली होती आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवून ते पराभूत झाले होते. 

त्यांना भेटायला लोकांची प्रचंड गर्दी होती. प्रत्येकाच्या समस्या ते समजावून घेत होते. अधिकाऱ्यांना फोन करून आदेश देत होते. मी मनात म्हटले कि अरे हे आमदार नाहीत तरीपण एवढी गर्दी ? कमाल आहे. माझ्या साहेबाना आणि आम्हाला त्यांनी दुसऱ्या खोलीत बसायला सांगितले आणि जवळपास २०-२५ मिनिटांनी ते आले. साधारण उंची , स्वछ पांढरे कपडे , चेहेऱ्यावर हास्य आणि मनमोकळेपणाने बोलणे हे त्यांचे वैशिष्ठ्य प्रकर्षाने जाणवले. त्यांनी खूप आदराने बॉस ची चौकशी केली. माझे बॉस M.TECH आहेत आणि कंपनी चालवण्याबरोबर संशोधनही करतात असे समजल्यावर ते खूप आनंदले. अजूनही ते माझ्या बॉसना सायंटिस्ट असेच म्हणतात. सध्याच्या कंपनीच्या भांडणांमुळे त्यांना व्यवस्थित काम करता येत नाही असे समजल्यावर ते थोडे गंभीर झाले. मी तुम्हाला मदत करतो असे ते म्हणाले. त्यांनी ताबडतोब त्यांचा सचिव अजय पंडितला सांगितले कि या दोनीही पार्टनरची दोन दिवसात माझ्याबरोबर मीटिंग लाव आणि रामशेठ विचारे (नगरसेवक) यांनादेखील बोलावून घे. 

ठरल्या दिवशी माझे बॉस आणि त्यांचे पार्टनर दादांना भेटायला पोहोचले. अर्थात मी पण होतो. श्री विचारेसाहेब देखील होते. मला वाटले कि दादा त्या पार्टनर ला दमबाजी करतील, पण उलटेच झाले. दादांनी त्याची पण चौकशी केली. तो देखील घाबरला होता पण ५ मिनिटांमध्येच त्याच्या चेहेऱ्यावरचा तणाव निवळला. दादांनी स्पष्टपणे सांगितले कि साथ रहकर झगडा क्यू करते हो ? अलग अलग कंपनी बनवो और अपना अपना काम करो. विचारेसाहेबाना दादांनी सांगितले की दोघांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही या कंपनीचे / assets चे विभाजन करून द्या. बॉस ला सांगितले कि मुझे या किसीको पैसे देनेकी जरुरत नही. ये विशाल को कोऑर्डिनेट करने दो. और मुझे इस बारे मे वापस मिलानेकी जरुरत नाही. नवी मुंबई मे आपका ऑफिस है , अच्छा काम करो. गणेश नाईक अच्छा काम करनेवालों के साथ हमेशा राहता है. मेरा ध्यान राहेगा. 

माझे पहिलेच मत खूप छान झाले. एखादा जटील प्रश्न घरातील वडीलधाऱ्या माणसाने सहजच सोडवावा तसे झाले. मग विचारेसाहेबानी दोनीही पार्टनर ला वेगळे करून वेगवेगळ्या कंपनी स्थापन करून दिल्या. अर्थात हे कटकटीचे काम होते , कारण अनेकदा शुल्लक गोष्टीवरून दोनीही पार्टनर अडून राहायचे. एकमत व्हायचे नाही. त्यात विचारेसाहेब नगरसेवक आणि स्वतः बिल्डर व्यवसायात ,त्यांमुळे ते पण बिझी असायचे. पण त्यांनी शांतपणे आणि वेळप्रसंगी आवाज चढवून कंपन्या वेगळ्या करून दिल्या. विचारेसाहेबांचा यात बराच वेळ जायचा पण दादांनी दिलेली जबाबदारी त्यांनी ७-८ महिन्यात व्यवस्थित आणि कोणावरही अन्याय ना होऊ देता पार पडली. या दरम्यान विचारेसाहेबानी आमच्या ऑफिसमध्ये कधी चहा देखील पिला नाही. 

नवीन कंपनीमध्ये माझे बॉस चेअरमन आणि त्यांच्या पत्नी MD झाल्या. आमच्या आणि दादांच्या भेटीगाठी नियमित व्हायला लागल्या. बॉस पंजाबी होते त्यामुळे ते मला दादांकडे नेत असत, मग मी ट्रान्सलेटरचे पण काम करीत असे. कंपनी वेगळे झाल्यावर आमची झपाट्याने प्रगती होऊ लागली. वाशीच्या भाड्याच्या ऑफिसमधून आम्ही स्वतःचे बेलापूरला मोठे ऑफिस घेतले. बॉस नवी मुंबईमध्ये NRI कॉम्प्लेक्स मध्ये राहायला आले.  कर्मचारी वर्ग हळू हळू वाढायला लागला. महाराष्ट्रात आणि भारतभर आमची कामे चालू झाली. Sewage Treatment Plant , Common Effluent Treatment Plant , Zero Liquid Discharge Plant , Water Treatment Plant आम्ही बनवू लागलो. 

दादांबरोबर माझे वैयक्तिक संबंध आणि संभाषण वाढत होते. अनेकदा ते मला फोन करून बोलावून घ्यायचे.  तिथे नियमित जे १०-१५ जण यायचे त्यात मी असायचो. खूप गप्पा मारायचे. त्यांचे vision ,त्यांचे विचार, माणसाला मदत करण्याची त्यांची वृत्ती , सर्वाना सन्मान देण्याची त्यांची सवय तसेच एखादा विषय समजून घेण्याची त्यांची कला मला खूप आवडायची. एखादा जोक त्यांना आवडला कि ते मला तो SMS पाठवायचे आणि फोन करून सांगायचे कि माझा मेसेज वाच. त्यावेळेला ते विधानसभा निवडणुकीत पराभूत होते. पण त्यांच्याकडे लोकांची अफाट गर्दी असायची. त्याच्या १०% पण लोक विजयी आमदाराकडे नसायचे. यात काय जादू होती काय माहित. कोणाबद्दलही ते कधीही वाईट बोलायचे नाही. कटुता / द्वेष / असूया त्यांच्या मनात किव्हा डोळ्यात मला कधीही कोणाबद्दलही दिसली नाही. 

नवी मुंबई शहर हे कसे बनवायचे याचे vision त्यांच्या डोक्यात फिक्स होते. लोकांना चांगले पाणी , हवा , रस्ते मिळाले पाहिजेत. ज्या चुका मुंबई शहरामध्ये झाल्या त्या त्यांना नवी मुंबई च्या विकासात नको होत्या. महानगर पालिकेमध्ये त्यांचीच सत्ता होती त्यामुळे त्यांनी बहुतेक चुका टाळल्या. २००४-५ ला नवी मुंबई एवढे पसरेल , एवढे पॉश होईल याची मलादेखील कल्पना नव्हती. 

नवी मुंबईला भविष्यात पाण्याची स्वतंत्र व्यवस्था असावी म्हणून त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून मोरबे भरणं महापालिकेला विकत घ्यायला लावले. तेव्हा संजीव नाईक महापौर होते. नाहीतर आज नवी मुंबई ला पाण्यासाठी MIDC किंवा इतर कोणावर तरी अवलंबून राहावे लागले असते. याचा दूरदृष्टीचा फायदा आज सर्व नवी मुंबईकर घेत आहेत. 

माझ्या लग्नाचे निमंत्रण मी दादांना दिले आणि म्हटले कि तुम्ही बिझी असता तसेच नवी मुंबईतून तुम्हाला मुंबईमध्ये खार ला माझ्या लग्नाला येऊन जायला ३-४ तास लागतील तेव्हा तुम्ही येणार नाहीत. दादा बोलले अरे असे कोणी निमंत्रण देते का ? सगळे तूच बोललास. मी नक्की येणार. अजय पंडितला त्यांनी डायरी मध्ये नोंद करायला सांगितली. आई वडिलांचा लोकसंग्रह आणि माझे आजोबा लक्ष्मण फुलपगार यांचे समाजकार्य यामुळे लग्नाला तुफान गर्दी होती. एका मैदानात रिसेप्शन होते. अचानक काहीतरी हालचाल झाली. लोकांच्या गर्दीत दादा आले. शांतपणे स्टेजवर मला भेटले आणि बोलले कि बघ मी बोललो येणार म्हणजे येणारच. मला थोडे लाजल्यासारखे झाले. खूप आनंदपण झाला . त्यांच्या बरोबर जगदीशमामा आणि अजय पंडित पण होते. फोटो काढून दादा लगेचच गेले. 

दादासोबत शशिकांत बिराजदारसाहेब आणि जगदीशमामा माझ्या लग्नात 


मी मनात म्हटले मी एका कंपनीमध्ये जॉब करणारा मॅनेजर . माझ्याकडून याना काहीच फायदा नाही पण तरीदेखील ते एवढे लांब प्रवास करून आले. दादांबद्दलचा आदर रोजच वाढत होता. त्यांचा सचिव अजय पंडीत बरोबर तर खूपच दोस्ती झाली. अजूनही आहे. सर्वाना शांतपणे अटेंड करणारा अजय एक विशेष माणूस आहे. 

नंतर त्यांच्याकडे शीतल नावाचा सचिव आला. तो पण एकदम सज्जन, त्याच्याशीही मैत्री झाली आणि अजूनही आहे. एकदा शीतलने फोन करून सांगितले कि दादांनी नवी मुंबई स्पोर्ट असोसिएशन ला सकाळी ११ वाजता बोलावले आहे. दादांनी बोलावले कि गुपचूप जायचे असा अलिखित नियम होता. ऑफिसमध्ये पण हे माहित होते. तसेच माझे दादांकडे कधीच काहीच वैयक्तिक अथवा कोणतेही काम नसायचे. जाऊन तासभर गप्पा मारणे हेच काम. आणि त्यांनी सांगितले कि निघायचे. कमीतकमी १ तास जायचा . दादांशी बोलणे त्यांचे ऐकणे म्हणजे एक विशेष पर्वणी. खूप मज्जा यायची. त्यांच्या बोलण्यात खूप मोकळेपणा आहे त्यामुळे कधी कधी त्यांना अडचण पण होत असेल. पण त्यांनी त्याची पर्वा केली नाहीय. मनात असेल ते बिनधास्त बोलून मोकळे व्हायचे.

वाशी वरून ते निघाले आणि आम्ही त्यांना सोडायला गाडीपर्यंत आलो. अचानक ते मला म्हटले कि गाडीत बस. कुठे जायचे असे विचारण्याची हिम्मत नव्हती आणि गरज देखील नव्हती. मी खारला लांब राहतो त्यामुळे माझ्या  प्रवासाची त्यांना कल्पना होती. 

आमची गाडी पाम बीच रोड ला लागली. त्यावेळेला आजूबाजूला सर्व काही मोकळे होते. आजच्या सारखे टॉवर नव्हते. सानपाडा सोडला कि नेरुळ पर्यंत काहीच नाही. नेरुळ ला सिडको ची दोन मजल्याची कॉलनी , see breeze टॉवर , सागरदर्शन असे मोजकेच टॉवर होते.  पाम बीच रोड म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे सारखा मस्त रोड. मी सहजच म्हटले कि दादा (मला बोलताना कधी कधी लिमिट क्रॉस करायची सवय आहे.) एवढा चांगला रस्ता आहे पण आजूबाजूला काहीच नाही.संध्याकाळी तर इथे यायला पण भीती वाटते. दादा म्हणाले कि मी हा भाग तुमच्या मरीन ड्राइव्ह सारखा बनवणार आहे , थोडे वर्ष थांब. हा नवी मुंबई मधील बेस्ट एरिया असेल. तेव्हा मला काही पटले नाही. पण आज मात्र ते वास्तव आहे. 

ठाणे बेलापूर हा रोड खूपच वाईट अवस्थेमध्ये होता. एका सभेत त्यांनी जाहीरपणे सांगितले की हा रोड नवी मुंबई महानगरपालिका बनवणार आणि त्यात टोल लावणार नाही. आत्ता हा ३० किमी चा रस्ता बनवायचा म्हणजे मोठा खर्च होता.. त्यामुळे महानगर पालिकेवर खूप आर्थिक भर पडणार होता. त्याशिवाय तेव्हा रोड बनवायचा आणि त्यावर टोल लावायचा अशी संकल्पना होती. महापालिकेचे अंदाजपत्रक कोलमडून पडेल असे सर्वजण बोलत असताना तो  ६ लेन चा काँक्रीट रोड मस्तपैकी  बनवून झाला आणि तो पण टोल शिवाय. नवी मुंबई कडे येणारे रस्ते चांगले असतील तर लोक नवी मुंबईमध्ये नोकरीला येऊ शकतात , त्यात त्यांचा वेळ वाचेल. लोक ऑफिस घेतील,  त्यात लोकांना नोकऱ्या लागतील त्यावर अवलंबून असणारे जोडधंदे म्हणजे हॉटेल, रिक्षा, टॅक्सी ,वीज ,महापालिकेचा टॅक्स यात वाढ होऊन शेवट महानगरपालिकेचे उत्पन्न वाढेल एवढे त्यांचे सोपे म्हणणे होते. त्यामुळे अतिरिक्त कर्ज ना घेता हा एक मोठा रस्ता बनवून झाला आणि तो किती उत्तम प्रतीचा आहे हे आपण बघतोच. यामागे दादांचे व्हिजन आणि दूरदृष्टी आहे. अर्थात महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ज्या प्रकारे रोड आणि इतर व्यवस्था केलीय त्याला तोड नाही. दादांचे व्हिजन आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तत्कालीन सिटी इंजिनिअर मोहन डगावकर साहेब यांच्या टीमचे काम हे सर्व जण अभिनंदनास पात्र आहेत. शहरातील स्वच्छ रस्ते , उत्कृष्ट ड्रेनेज सिस्टिम ,उत्तम प्रशासन यामुळे नवी मुंबई ला दरवर्षी केंद्र शासनाचा पुरस्कार मिळतो. हे केवळ दादांमुळेच. 

गणेश नाईकसाहेबांचा सत्कार करताना मी आणि मागे रिलायन्स चे ग्रुपप्रेसिडेंट चैनीसाहेब 

मध्यंतरी काही लोक उगाचच आमच्या ऑफिस ला येऊन दमदाटी करू लागले ,वर्गणी मागू लागले, अवास्तव मागण्या करू लागले. हि गोष्ट आम्ही  ताबडतोब दादांच्या कानावर घातली. ते म्हटले कि तुम्ही सांगा कि गणेश नाईक ची यात पार्टनरशिप आहे. मी म्हटले अहो असे बोलणे तुम्हालाच अडचणीचे होईल , तुमची बदनामी होईल. ते बोलले की तुम्ही काळजी करू नका तुम्ही सांगा तर. जोपर्यंत तुम्ही चांगले काम करीत आहेत तो पर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे. मला नवी मुंबई मध्ये चांगल्या कंपनी , चांगली माणसे हवीत. त्यानंतर मात्र आम्हाला नवी मुंबई मध्ये काय अक्ख्या महाराष्ट्रामध्ये अवांतर त्रास झाला नाही. सर्वत्र बोंबाबोंब होती कि यात दादांची पार्टनरशिप आहे, पण या काही तथ्य नव्हते. एका रुपयाचाही कधी व्यवहार झाला नाही. 

पुढच्या विधानसभा निवडणुकीत दादा विक्रमी मताधिक्याने निवडून आले . आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले.  तो विक्रम अजूनही अबाधित आहे. मला त्यात काहीच आश्चर्य वाटले नाही. कारण रोज त्यांच्याकडे एवढी लोक भेटायला यायची कि विचारू नका , मग फक्त किती मतांनी निवडून येणार हा एकाच प्रश्न मला असायचा.  

घनकचरा व्यवस्थापन हा नवी मुंबई मध्ये चिंतेचा विषय होता. कारण कितीही प्लांनिंग सिडको ने केले असले तरीही कचरा डम्पिंग ची जागा नवी मुंबई मध्ये नव्हती. मग शासन दरबारी पाठपुरावा करून तुर्भे ला बंद असलेली क्वारी ची जागा मिळवून दिली. सिटी इंजिनिअर डगावकरसाहेब याना सांगितले कि इथे जरी कचऱ्याचे लँडफिलीन्ग/ प्रोससिंग होणार असले तर इथे कोणताही वास येत काम नये आणि पिकनिक स्पॉट वाटलं पाहिजे असे विकसित करा. डगावकरसाहेब व उपअभियंता सुबोध मुळेसाहेब यांनी यांनी एवढा चांगला डंप यार्ड बनवला कि देशभरातून अनेक पालिका अधिकारी याचा अभ्यास कारण्यासाठी  इथे येतात. नवी मुंबई महानगर पालिकेला नवीन मोठे ऑफिस बनवण्यासाठी सिडकोकडून मोक्याचा प्लॉट घेऊन एक उत्कृष्ट मुख्यालय उभे केले. 

मुख्य अभियंता डगावकरसाहेब आणि मी 

नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय 

Jawaharlal Nehru Natinal Urban Renewal Mission (JNNURM) या केंद्र सरकाराच्या योजनेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला कोट्यवधींचा फंड उपलब्ध होऊ शकत होता. हि प्रक्रिया थोडी किचकट असते. संजीव नाईकसाहेब त्यावेळी खासदार होते. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि तत्कालिन कन्सल्टंट यांनी खूप मेहनत घेतले. बराच निधी महानगर पालिकेला उपलब्ध झाला.मोठयाप्रमाणावर infrastructure ची कामे झाली. अर्थात यासाठी बराच पाठपुरावा करावा लागला. 

आठवड्यातून दादांकडे जाणे व्हायचेच. काही विशेष काम नाही. हाय हॅलो म्हणायचे , गप्पा मारायच्या आणि परत यायचे. नवीन काही टेकनॉलॉजी आली असेल तर ते त्याविषयी मला माहिती विचारायचे. किंवा तू माहिती काढून मला नंतर सांग असे म्हणायचे. 

दादांवर जहरी टीका करणारी माणसेपण दादांना भेटायला यायची. दादा त्यांना सर्वतोपरी मदत करायचे. मनात क्लेश ठेवायचे नाही. तो माझा राजकीय विरोधक आहे त्यात वैयक्तिक काय. एवढे माझ्या विरोधात बोलूनदेखील तो माझ्याकडेच येतो ना असे ते म्हणायचे. त्या त्यांना अभिमान ,गर्व नसायचा. 

सर्वांशी त्यांचे चांगलेच संबंध. देशभरात हिंदू मुस्लिम दंगे झाले पण नवी मुंबई मध्ये कधीच नाही. जातीय सलोखा त्यांनी चांगलाच राखला. सर्वांशी ते नियमित संवाद करतात ,भेटतात ,त्याचे लक्ष असते. .पोलीस आणि प्रशासनावर त्यांचा वचक आहे. सर्वधर्मीय ,सर्वपक्षीय लोक त्यांच्याकडे येतात. स्वतः ते कोणताही जातीभेद करत नाहीत. माणसाला माणूस म्हणून ते बघतात. राजकीय जीवनात असूनदेखील त्यांनी कधीच मतांसाठी जातीय समीकरणे मांडली नाहीत. त्याचा विचारच केला नाही. नवी मुंबई हे देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनावे हा त्यांचा ध्यास. आपल्या वागण्या बोलण्याने ते सर्वाना आपलेसे करतात. मनात असेल ते बोलायचे. आत्ताच्या काळात असा मोकळेपणा माझ्यामते केवळ नितीन गडकरीसाहेब आणि अजितदादा पवार यांच्याकडे दिसतो 



एकदा बेलापूरला दुपारी त्यांना भेटायला गेलो तेव्हा दादा म्हटले कि चल पटकन गेट वे ऑफ इंडिया ला जाऊन येऊ. मी मनात म्हटले कि या ट्राफिक मध्ये निघणार कधी पोहोचणार कधी आणि परत बेलापूर ला कधी येणार आणि मग बेलापूरवरून खार ला कधी जाणार ? कारण मी ट्रेन ने खार ला जायचो. त्यामुळे खार बेलापूर प्रवास हा पूर्णपणे हार्बर ट्रेन वर अवलंबून असायचा आणि एखादी ट्रेन चुकली कि माझे वेळापत्रक कोलमडायचे. 

पण आम्ही बेलापूरवरून स्पीड बोट ने गेट वे ऑफ इंडिया ला निघालो. खूप मज्जा आली. मला हा एक सुखद धक्का होता आणि जबरदस्त अनुभव. वाटेत काही स्थानिक मच्छिमाराच्या बोटी लागल्या. दादा त्यांना नावाने ओळखत होते. मग दादांनी समुद्रात त्यांची चौकशी केली. ५ मिनिटे बोलले आणि मग आम्ही निघालो. मी मनात म्हटले कि आपल्याकडे कोणी सोसायटीचा चेअरमन झाला तर एवढा आकडतो आणि याना तर कशाचीच तमा नाही. असो जवळपास २ तासात आम्ही गेट वे ऑफ इंडिया ला जाऊन पुन्हा बेलापूर ला आलो. अश्या अनेक आठवणी आहेत. 

कंपनीचे काम वाढत होते, त्यामुळे माझे पण भारत भर भ्रमण चालू होते. दादा देखील मंत्री मंडळ आणि इतर कामात व्यस्त झाले. त्यामुळे भेटीगाठी कमी होत गेल्या. अनेकदा मीच मुंबई बाहेर असायचो. फोनवर बोलणे खूप कमी झाले. दरम्यान मंत्री झाल्यावर दादांनी महिन्यातून एकदा जनता दरबार भरवणे चालू केले. वाशीच्या विष्णुदास भावे सभागृहात स्टेज वर दादा सर्व खात्याच्या अधिकाऱ्याबरोबर बसायचे. मग स्थानिक लोक त्याचे लिखित निवेदन घेवाण दादांना भेटायचे आणि तिथल्यातिथे अधिकाऱ्यांशी बोलून तो प्रश्न सुटायचा. ते बघायला मी पण कधी कधी जायचो. 

दरम्यान आमच्या कंपनीत नवीन इन्व्हेस्टर आले होते. त्यांच्या बरोबर मला काही जमले नाही. इतरही न सांगता येण्यासारख्या working difficulty होत्या. मी ती नोकरी २०१३ ला सोडली. दादांना मी फोन केला नाही. माझे काहीच काम नव्हते. त्यांनी देखील कधीच फोन केला नाही. 

कालांतराने शीतलच्या जागी त्यांनी नवीन सचिव ठेवला. मला दादांना भेटायची इच्छा झाली. मी त्याला फोन केला. मला याचा रिस्पॉन्स अजिबात आवडला नाही. शिवाय माझे दादांशी संबंध होते ,नवीन माणसाला कसे कळणार. आणि माझ्या आई वडिलांनी मला लहानपणापासून सांगितले होते कि तू आमचा राजपुत्र आहेस , त्यामुळे मी माझ्या राज्यात कायमच खुश होतो. उगाचच कोणाच्या मागे लागून भेटण्याची आवश्यकता नव्हती. 

माझे मामा ऍड. जयदेवराव गायकवाड विधानपरिषदेत आमदार झाले आणि मग मी त्यांच्याबरोबर विधानभवनात येऊ लागलो. तिथे आमदार संदीप नाईक नियमित भेटायचे. सन्मानाने आणि प्रेमाने बोलतात . त्यांच्याशी संभाषण व्हायचे. संदीप नाईकसाहेबांचे सचिव अमोल कोळीसुद्धा आदरपूर्वक बोलतात. त्यांच्याकडून दादांची खुशाली कळायची. तुम्ही काय बाबा दादांची माणसे, असे संदीपसाहेब गमतीने बोलायचे. 

विधानभवनात संदीप नाईक साहेबांबरोबर 
बरे वाटायचे. माझा देखील प्रोफेशनल प्रवास सुरु होता पण त्यात नवी मुंबई नव्हते आणि मी काय out of way जाऊन दादांना भेटणार नव्हतो हे निश्चितच. पण ती संधी अलगद लाभली. 

Mumbai Education Trust च्या सानपाडा येथील शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन गणेश नाईकसाहेबांच्या हस्ते ३० सप्टेंबर २०१७ ला करण्याचे ठरले. मला त्या भूमिपूजनाला संस्थेचे विश्वस्त घेऊन गेले. खूप गर्दी होती. संदीप नाईकसाहेबपण येऊन गेले 

भूमिपूजन कार्यक्रमाला संदीप नाईकसाहेब आणि पंकज भुजबळसाहेब 

एवढ्या गर्दीत इतक्या वर्षांनी दादा मला ओळखतील याची शक्यता कमी होती. एरव्ही कितीही गर्दी असली आणि त्यांची नजर माझ्यावर पडली कि ते लगेचच मला पुढे बोलावून घेत. दादा आले, गलका झाला. त्यांनी मला लांबून बघितले आणि बोलावले. अरे किती दिवसांनी भेटलास आहेस कुठे असे म्हणाले ,हात मिळवला आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. 



त्यांच्या टीम मध्ये माझ्याओळखीचे जगदीशमामा ,शीतल ,बाबू कोणीच दिसले नाही. कार्यक्रम संपल्यावर त्यांना सोडायला गाडीजवळ आलो. एवढ्या गर्दीत त्यांनी मला हात दाखवला आणि ते गाडीत बसून गेले. 

अनेक मित्र म्हणतात कि तू त्यांच्याकडून काहीतरी मागून घ्यायचे होते. एखादे घर , दुकान , चांगली नोकरी, धंदा वगैरे. पण मी काहीच मागितले नाही म्हणून आजही ताठ मानेने त्यांच्याशी बोलू शकतो. काही माणसे हि शब्दांच्या पलीकडची असतात , त्यांच्या आठवणी मनाला आनंद देतात. एवढ्या मोठ्या नेत्यांबरोबर काम केल्यामुळे आत्ता कोणाचीही भीती वाटत नाही. 

नवी मुंबई च्या जडण घडणीत श्री. गणेश नाईकसाहेबांचे अमूल्य योगदान आहे. आजच्या लोकांना ते माहीतही नसेल. पण मी मात्र ठामपणे सांगू शकतो कि जर नाईकसाहेब नसते तर हे  शहर एवढे भव्यदिव्य झाले नसते. अहो, महापालिका सांडपाणी पुनर्प्रक्रिया करून ते स्वच्छ पाणी उद्योगांना विकते आणि त्यातून पण मनपाला पैसे मिळतात आणि सांडपाण्याचे रिसायकलिंग होते. म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यातून महानगरपालिकेला उत्पन्न. अश्या अनेक गोष्टी त्यांनी करून ठेवल्या आहेत. 

आजकालच्या घाणेरड्या राजकारणामध्ये श्री गणेश नाईकसाहेब आपले अस्तित्व कसे टिकवतात हे बघणे फारच इंटरेस्टिंग आहे. कारण त्यांचे राजकारण हे समाजकारणावर आधारित आहे. आणि धर्म ,जात ,पंथ ,वोट बँक, समर्थक ,विरोधक यांच्या पलीकडे आहे. 

कंपनी मालक आणि कामगार या दोघांनाही दादा आवडतात. सर्वांचा विकास व्हावा ,प्रगती व्हावी हे त्यांचे नेहमीच धोरण राहिले आहे. इशा अंबानींच्या लग्नात मुकेशभाईनि मुलीला स्टेजवर दादांच्या पाय पडायला लावले ह्यात सर्व सन्मान आला. 

https://www.youtube.com/watch?v=InS1EZwkbqo

एवढ्या वर्षात खाजगीत किंवा सार्वजनिकरित्या त्यांनी कोणावरच कधी वैयक्तिक टीका केल्याचे माझ्या पाहण्यात ऐकण्यात नाही.अश्या राजकारण्यांची हि शेवटची पिढी आहे. कोणत्याही निवडणुकीचा काहीही निकाल लागो. नाईकसाहेब कोणत्याही पक्षातर्फे निवडणूक लढो, लोक त्यांच्याकडे बघूनच मतदान करतात. शेवटी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले नेते हे जबरदस्तच असतात. माझ्या त्यांना नेहमीच शुभेच्छा राहतील. 

जय गणेश.   


विशाल फुलपगार 

१५ ऑगस्ट २०२१, मुंबई 


5 comments:

  1. Salute to these leaders who are working fo the people of state.
    As usual, fluent story telling.
    Pls write a book sometimes, collection of these blogs.
    All the best.

    ReplyDelete
  2. SupeRB VP. As usual, its simple writing and amazing analysis. Enjoyed your this blog on Naik saheb.

    He is an amazing and simple personality.

    Synonym of Navi Mumbai is Naik saheb !!

    Kudos once again for the wonderful blog !!

    Best Regards
    Sanjesh Jain

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Sanjesh,
      appreciate your kind words

      Delete
  3. Navi Mumbai is fortunate to have Loknete Ganesh Naik Saab as its Guardian.

    His sons Sanjeev ji, Sandeep ji and Nephew Sagar ji all are working hard and are committed to city and people.

    ReplyDelete